
महंत श्री राम बापू जी, समाजाचे अग्रणी लोक, लाखोंच्या संख्येत आलेले सर्व श्रद्धाळू बंधू आणि भगिनींना नमस्कार, जय ठाकर।
सर्वप्रथम, मी भरवाड समुदायाच्या परंपरेला आणि सर्व पूजनीय संत, महंत आणि संपूर्ण परंपरेसाठी आपले जीवन समर्पित करणाऱ्या सर्व लोकांना आदरपूर्वक वंदन करतो. आज आपला आनंद अनेक पटींनी वाढला आहे. यावेळी झालेला महाकुंभ केवळ ऐतिहासिकच नसुन तर आपल्यासाठी अभिमानाचा क्षण पण आहे कारण महाकुंभाच्या शुभ प्रसंगी महंत श्री राम बापू जी यांना महा मंडलेश्वर ही उपाधी मिळाली. ही फार मोठी घटना आहे आणि आपल्या सर्वांसाठी आनंदाचा प्रसंग आहे. राम बापूजी आणि समाजातील सर्व कुटुंबियांना माझ्या शुभेच्छा.
गेल्या आठवड्यात भावनगरची भूमी भगवान श्रीकृष्णाचे वृंदावन बनल्यासारखी वाटली आणि सोन्याहून पिवळे व्हावे तशी आमच्या भाईजींची भागवत कथा होती. ज्या प्रकारची भक्ती वाहत होती, वातावरण असे होते की लोक कृष्णामध्ये न्हाऊन गेले होते. माझ्या प्रिय नातेवाईकांनो, बावलिया धाम हे ठिकाण केवळ धार्मिक स्थळ नाही तर ते भरवाड समाजासह अनेकांसाठी श्रद्धा, संस्कृती आणि एकतेचे प्रतीक आहे.
नगा लखा ठाकर यांच्या कृपेने या पवित्र स्थानाला, आणि भरवाड समुदायाला नेहमीच खऱ्या मार्गदर्शनाचा आणि महान प्रेरणेचा मोठा वारसा मिळाला आहे. आज या धाममधील श्री नगा लखा ठाकर मंदिराच्या पुनर्प्राणप्रतिष्ठेची सुवर्णसंधी आपल्याला मिळाली आहे. गेल्या एका आठवड्यापासून धूमधडाका सुरू आहे असे दिसते. समाजाचा उत्साह आणि जोश... मला सर्वत्र टाळ्यांचा कडकडाट ऐकू येत आहे. मला वाटतं की मी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचायला हवे, पण संसद आणि कामामुळे बाहेर जाणे कठीण आहे. पण जेव्हा मी आमच्या हजारो बहिणींच्या रासलीलेबद्दल ऐकतो तेव्हा मला वाटते, व्वा, त्यांनी वृंदावनला तिथेच जिवंत केले आहे.
श्रद्धा, संस्कृती आणि परंपरा यांचा मेळ आणि संगम मनाला आणि आत्म्याला आनंद देणारा आहे. या सर्व कार्यक्रमांमध्ये कलाकार बंधू-भगिनींनी सहभागी होऊन कार्यक्रमाला चैतन्यमय बनवले आणि समाजाला समयोचित संदेश दिला. मला खात्री आहे की भाईजी वेळोवेळी कथेच्या माध्यमातून आपल्याला संदेश देतील. यासाठी त्यांचे कितीही अभिनंदन केले तरी ते कमीच पडेल. या शुभ प्रसंगाचा भाग बनवल्याबद्दल मी महंत श्री राम बापूजी आणि बावलिया धाम यांचे आभार मानतो. या पवित्र प्रसंगी मी तुमच्यासोबत असू शकलो नाही म्हणून मला माफी मागितली पाहिजे. तुम्हा सर्वांचा माझ्यावर समान अधिकार आहे. भविष्यात जेव्हा केव्हा मी तिथे येईन तेव्हा मी नक्कीच डोके टेकण्यासाठी येईन.
माझ्या प्रिय कुटुंबियांनो,
भरवाड समाज आणि बावलियाधाम यांच्याशी माझा संबंध अलिकडचा नाही; तो खूप जुना आहे. भरवाड समाजाची सेवा आणि त्यांचे निसर्गावरील प्रेम, गायीची सेवा यांचे शब्दात वर्णन करणे कठीण आहे. आपल्या सर्वांच्या तोंडून एकच गोष्ट बाहेर पडते,
नगा लाखा माणूस चांगला आहे,
पश्चिमेकडील भूमीचा पीर.
खारट पाणी गोड करतो,
कोरड्या कोरड्या नद्यांमध्ये पाणी वाहवतो.
हे केवळ शब्द नाहीत. त्या काळात सेवाभाव, कठोर परिश्रम (नेवा के पानी मोभे लगा लिए - गुजराती म्हण आहे), सेवेच्या कामात नैसर्गिकरण दिसून येत असे, सेवेचा सुगंध प्रत्येक पावलावर पसरत होता आणि आज शतकानुशतकांनंतरही लोक त्याची आठवण ठेवत आहेत, ही एक मोठी गोष्ट आहे. पूज्य इसु बापूंनी केलेल्या सेवांचा मी प्रत्यक्ष साक्षीदार आहे, मी त्यांची सेवा पाहिली आहे. आपल्या गुजरातमध्ये दुष्काळ ही काही नवीन गोष्ट नाही. एक काळ असा होता की दहापैकी सात वर्षे दुष्काळ पडत असे.
गुजरातमध्ये असे म्हटले जात असे की धंधूकामध्ये (दुष्काळग्रस्त भागात) तुमच्या मुलीचे लग्न लावू नका. (गुजराती - बंदूक देजो पण धंधूके न देता म्हणजे तुमच्या मुलीचे लग्न धंधूकात (दुष्काळग्रस्त भागात) करू नका, गरज पडल्यास तिला गोळ्या घाला (बंदूक देजो). याचे कारण म्हणजे त्यावेळी धंधूकात वारंवार दुष्काळ असायचा. धंधूका, राणपुर ही पाण्यासाठी तळमळणारी ठिकाणे होती. आणि त्या काळात, पूज्य इसू बापूंची निःस्वार्थ सेवा स्पष्ट दिसून आली. त्यांनी ज्या पद्धतीने पीडित लोकांची सेवा केली ते आजही स्मरणात आहे. फक्त मीच नाही, संपूर्ण गुजरातमधील लोक त्यांचे कार्य देवाचे कार्य मानतात. लोक त्यांचे कौतुक करणे थांबवत नाहीत. स्थानांतरित जातीतील बंधू-भगिनींची सेवा असो, त्यांच्या मुलांना शिक्षण देण्याचे काम असो, पर्यावरणासाठी समर्पण असो, गीर-गायींची सेवा असो, कोणतेही काम घ्या, त्यांच्या सर्व कामांमध्ये आपल्याला सेवाभावाची परंपरा दिसते.
माझ्या प्रिय नातेवाईकांनो,
भरवाड समाजाचे लोक नेहमीच कठोर परिश्रम आणि त्यागाच्या बाबतीत पुढे राहिले आहेत. तुम्हाला माहिती आहे की मी तुमच्यामध्ये आलो तेव्हा मी मोकळेपणाने गोष्टी बोललो आहे. मी भरवाड समुदायाला सांगितले की आता काठ्या चालवण्याची वेळ नाही, तुम्ही लोक काठ्या घेऊन पुरेसे फिरला आहात, आता पेन चालवण्याची वेळ आली आहे. आणि मी अभिमानाने सांगतो की जेव्हा जेव्हा मला गुजरातमध्ये सेवा करण्याची संधी मिळाली तेव्हा तेव्हा भरवाड समाजाच्या नवीन पिढीने माझा मुद्दा स्वीकारला आहे. मुले शिक्षण घेऊन पुढे जाऊ लागली आहेत. आधी मी म्हणायचो, काठी सोडा आणि पेन उचला. आता मी म्हणतो की माझ्या मुलींच्या हातातही संगणक असावेत. बदलत्या काळात आपण खूप काही करू शकतो. तेच आपले प्रेरणास्थान बनते. आपला समाज निसर्ग आणि संस्कृतीचा रक्षक आहे. 'अतिथी देवो भव' ही म्हण तुम्ही खरोखरच जिवंत केली आहे. येथे लोकांना मेंढपाळ आणि बलवा समाजाच्या परंपरांबद्दल फार माहिती नाही. भरवाड समाजातील वडीलधारे वृद्धाश्रमात सापडणार नाहीत. संयुक्त कुटुंब, वडीलधाऱ्यांची सेवा म्हणजे देवाची सेवा अशी भावना त्यांच्यात असते. वृद्धांना वृद्धाश्रमात पाठवले जात नाही, ते त्यांची सेवा करतात. नवीन पिढीला दिलेली ही मूल्ये खूप मोठी गोष्ट आहेत. भरवाड समाजाच्या सामाजिक जीवनातील नैतिक मूल्ये आणि त्यांच्यातील कौटुंबिक मूल्ये बळकट करण्यासाठी नेहमीच पिढ्यानपिढ्या प्रयत्न केले गेले आहेत.
आपला समाज आपल्या परंपरा जपतही आहे आणि जलदगतीने आधुनिकतेकडे वाटचाल देखील करत आहे याचे मला समाधान वाटते. स्थलांतर करणाऱ्या जमातीमधल्या कुटुंबातील मुलांनी शिक्षण घ्यावे, त्यांच्यासाठी वसतिगृहाची सोय व्हावी ही देखील एका प्रकारे फार मोठी सेवा आहे. समाजाला आधुनिकतेशी जोडण्याचे कार्य करणे, देशाला जगाशी जोडण्याच्या नव्या संधी निर्माण होणे हे देखील फार सेवाभावी कार्य आहे.आता माझी अशी इच्छा आहे की आपल्या मुली खेळांमध्ये देखील चमकाव्या, यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. मी गुजरातमध्ये होतो तेव्हा क्रीडा महाकुंभामध्ये बघायचो, लहान लहान मुली शाळेत जात आणि विविध खेळांमध्ये बक्षिसे मिळवत. आता त्यांच्यात सामर्थ्य आहे, देवाने त्यांना विशेष शक्ती दिली आहे, तेव्हा आता आपण त्यांचीही काळजी घ्यायला हवी. आपण पाळलेल्या प्राण्यांची काळजी घेतो, आपल्याकडच्या जनावरांना काही झाले तर त्यांना बरे करण्यासाठी प्रयत्न करतो. आता आपल्या मुलांची सुद्धा अशाच भावनेने काळजी घ्यायची आहे. बावलीया धाम पशुपालनाच्या बाबतीत एकदम परिपूर्ण आहेच पण येथे गीर गाईंच्या जातींची विशेष काळजी घेतली जाते आणि त्याचा संपूर्ण देशाला अभिमान आहे. जगभरात आज गीर गाईंना नावाजले जाते.
माझ्या प्रिय कुटुंबियांनो,
बंधु-भगिनींनो, आपण वेगळे नाही, आपण सर्वजण सोबती आहोत, मला नेहमीच वाटते की आपण एकाच कुटुंबातील सदस्य आहोत. तुमच्यामध्ये मी नेहमीच कुटुंबातील सदस्याप्रमाणेच राहिलो आहे. आज बावलीया धाम येथे इतके कुटुंबीय आलेले आहेत, लाखो लोक येथे बसलेत, तेव्हा माझा हा हक्कच आहे की तुमच्याकडे काही मागावे. मला तुमच्याकडे मागणी करायची आहे, आणि मी आग्रह धरणार आहे. तुम्ही मला निराश करणार नाही असा विश्वास आहे मला. आता आपल्याला आहोत तसे राहायचे नाही, तर एक झेप घ्यायची आहे आणि येत्या 25 वर्षांमध्ये भारताला विकसित करायचेच आहे. तुमच्या मदतीशिवाय माझे कार्य अपूर्ण राहील. संपूर्ण समाजाला या कामामध्ये सहभागी व्हायचे आहे. तुमच्या लक्षात असेल की लाल किल्ल्यावरून मी सांगितले होते, सबका प्रयास....सर्वांचे प्रयत्न ही आपली सर्वात मोठी ठेव आहे. भारताला विकसित भारत बनवण्यासाठी पहिली पायरी म्हणजे आपल्या गावांना विकसित करणे. निसर्ग आणि पशुधन यांची सेवा हा आपला स्वभावधर्म आहे. हे लक्षात घेऊन, आपल्याला आणखी एक महत्त्वाचे काम हाती घ्यावे लागेल.भारत सरकारची एक योजना सुरु आहे आणि ती संपूर्णपणे मोफत आहे- जनावरांमधील फूट अँड माऊथ डिसीज- ज्याला आपल्याकडे लाळ्या खुरकूत रोग असे म्हटले जाते. आता या रोगासाठी वारंवार लस घ्यावी लागते तेव्हाच आपली जनावरे या आजारातून बाहेर येऊ शकतात. हे भूतदयेचे कार्य आहे. सरकारकडून आता ही लस मोफत मिळते. आपण आता अशी खात्री करून घ्यायची आहे की आपल्या समुदायातील जनावरांना ही लस नक्की दिली जाईल, नियमितपणे दिली जाईल. तरच आपल्याला भगवान श्रीकृष्णांचे अखंड आशीर्वाद मिळतील, आपले ठाकर आपल्या मदतीला धावून येतील.