“एकीकडे आपण एकल वापराच्या प्लास्टिकवर बंदी आणली असून दुसरीकडे प्लास्टिक कचऱ्यावर प्रक्रिया करणे आपण अनिवार्य केले आहे”
“हवामान बदल आणि पर्यावरण संरक्षण यांच्या संदर्भातील अत्यंत स्पष्ट आराखड्यासह एकविसाव्या शतकातील भारताची आगेकूच ”
“पूर्वीच्या काळाच्या तुलनेत गेल्या 9 वर्षांत, भारतातील पाणथळीच्या जागा तसेच रामसर स्थळांच्या संख्येत जवळजवळ तिप्पट वाढ ”
“जगातील प्रत्येक देशाने निहित स्वार्थापलीकडे जाऊन जागतिक हवामानाच्या संरक्षणाबाबत विचार करायला हवा”
“ भारताच्या हजारो वर्षांच्या प्राचीन संस्कृतीमध्ये निसर्ग आणि प्रगती या दोन्हींचा समावेश आहे”
“जगात बदल घडवून आणण्यासाठी आपल्या स्वभावात बदल घडविणे हे लाईफ अभियानाचे मूलभूत तत्व आहे”
“हवामान बदलाप्रती ही जाणीव केवळ भारतापुरती मर्यादित राहिलेली नाही तर संपूर्ण जगातून या उपक्रमाला मिळणारा जागतिक पाठींबा सतत वाढतो आहे”
“लाईफ अभियानाच्या दिशेने टाकलेले प्रत्येक पाऊल हे येणाऱ्या काळात पर्यावरणासाठी ढाल बनेल”

नमस्कार.

जागतिक पर्यावरण दिनाच्या तुम्हा सर्वांना, देशभरातील आणि जगभरातील नागरिकांना खूप खूप शुभेच्छा.  यंदाच्या पर्यावरण दिनाची संकल्पना एकल वापराच्या प्लास्टिकपासून मुक्ती मिळवण्याचे अभियान ही आहे.  आणि मला आनंद आहे की आज जग ज्याबाबत बोलत  आहे त्यावर भारत गेली 4-5 वर्षे सातत्याने काम करत आहे. 2018 मध्येच, भारताने एकदा  वापरल्या जाणार्‍या प्लास्टिकपासून मुक्त होण्यासाठी दोन स्तरांवर काम करण्यास सुरुवात केली होती. एकीकडे आम्ही एकल वापराच्या प्लास्टिकवर बंदी घातली आहे आणि दुसरीकडे प्लास्टिक कचऱ्यावर प्रक्रिया करणे अनिवार्य करण्यात आले आहे. यामुळे, भारतात सुमारे  30 लाख  टन प्लास्टिक पॅकेजिंगचा  पुनर्वापर करणे अनिवार्य झाले आहे. भारतात दरवर्षी निर्माण होणाऱ्या एकूण प्लास्टिक कचऱ्याच्या 75 टक्के हे प्रमाण आहे. आणि आज सुमारे 10 हजार उत्पादक, आयातदार आणि ब्रँड मालक त्याच्या कक्षेत आले आहेत.

मित्रहो,

आज 21व्या शतकातील भारत हवामान बदल आणि पर्यावरण संरक्षणासंदर्भातील अत्यंत स्पष्ट आराखड्यासह   पुढे  मार्गक्रमण करत आहे. भारताने सध्याच्या गरजा आणि भविष्यावर नजर  यांचा समतोल साधला आहे.

एकीकडे आम्ही गरीबातील गरीबांना आवश्यक ती मदत केली आहे, त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत आणि दुसरीकडे भविष्यातील ऊर्जेच्या गरजा लक्षात घेऊन मोठी पावले उचलली आहेत.

गेल्या 9 वर्षांमध्ये भारताने हरित आणि स्वच्छ ऊर्जेवर अभूतपूर्व लक्ष केंद्रित केले आहे. सौरऊर्जा असो, एलईडी बल्ब अधिकाधिक घरांपर्यंत पोहोचवणे असो,

यामुळे  देशातील जनतेचा, आपल्या गरीब आणि मध्यमवर्गीयांच्या पैशांची बचत झाली आहे आणि पर्यावरणाचेही रक्षण केले आहे. वीज बिलात सातत्याने घट होत आहे. या जागतिक महामारीच्या काळातही भारताचे नेतृत्व जगाने पाहिले आहे. या जागतिक महामारीच्या काळात भारताने मिशन ग्रीन हायड्रोजन सुरू केले आहे. याच जागतिक महामारीच्या काळात, भारताने माती तसेच पाणी यांचे रासायनिक खतांपासून संरक्षण करण्यासाठी नैसर्गिक शेती पद्धतीचा स्वीकार करण्याच्या दृष्टीने  मोठी पावले उचलली.

बंधू आणि भगिनींनो,

हरित भविष्य, हरित अर्थव्यवस्था ही मोहीम सुरू ठेवत आज आणखी दोन योजना सुरू करण्यात आल्या आहेत. मागील 9 वर्षांत, भारतातील पाणथळ जागा आणि रामसर ठिकाणांची संख्या पूर्वीच्या तुलनेत जवळपास तिपटीने वाढली आहे. आज अमृत धरोहर योजना सुरु झाली आहे.  या योजनेच्या माध्यमातून लोकसहभागातून या रामसर स्थळांचे संवर्धन होणार आहे. भविष्यात, ही रामसर स्थळे इको-टूरिझमचे केंद्र बनतील आणि हजारो लोकांसाठी रोजगाराचे माध्यम बनतील.  दुसरी योजना देशाच्या लांबलचक किनारपट्टी आणि तिथे राहणाऱ्या लोकसंख्येशी संबंधित आहे. 'मिष्टी योजने'च्या माध्यमातून देशाच्या खारफुटीच्या परिसंस्थेचे पुनरुज्जीवन तसेच संरक्षण केले जाईल. यामुळे देशातील 9 राज्यांमध्ये खारफुटीचे आच्छादन पूर्ववत केले जाईल . यामुळॆ  समुद्राची वाढती पातळी आणि चक्रीवादळासारख्या आपत्तींमुळे किनारपट्टीवरील लोकांच्या जीवनाला तसेच त्यांच्या उपजीविकेच्या साधनांना असलेला धोका कमी होण्यास मदत होईल .

मित्रहो,

जागतिक पातळीवर हवामान रक्षणासाठी जगातील प्रत्येक देशाने निहित स्वार्थापलीकडे  जाऊन विचार करणे अत्यंत आवश्यक आहे. दीर्घ काळापासून, जगातील मोठ्या आणि आधुनिक देशांमध्ये जे विकासाचे मॉडेल बनवले गेले ते खूप विरोधाभासी आहे.  आधी स्वत:च्या देशाचा विकास करण्याबद्दल विचार करायचा आणि त्या नंतर पर्यावरणाची चिंता करायची हाच विचार  पर्यावरण संदर्भात या विकास मॉडेलमध्ये होता.  यामुळे अशा देशांनी विकासाची उद्दिष्टे साध्य केली, परंतु संपूर्ण जगाच्या पर्यावरणाला त्यांच्या विकासाची किंमत मोजावी लागली. आजही काही विकसित देशांच्या चुकीच्या धोरणांचा फटका विकसनशील आणि गरीब देशांना बसत आहे. कित्येक दशके काही विकसित देशांची ही वृत्ती थांबवणारे कोणी नव्हते, रोखणारे कोणी नव्हते, कोणताही देश नव्हता. मला आनंद आहे की आज भारताने अशा प्रत्येक देशासमोर हवामान न्यायाचा मुद्दा उपस्थित केला आहे.

मित्रहो,

भारताच्या हजारों वर्षांच्या प्राचीन संस्कृतीच्या तत्त्वज्ञानात निसर्गाबरोबरच विकासही येतो. या प्रेरणेमुळे आज भारत अर्थव्यवस्थेकडे जितके लक्ष देतो तितकेच पर्यावरणाकडे देतो. आज भारत आपल्या पायाभूत सुविधांमध्ये अभूतपूर्व गुंतवणूक करत आहे तसेच पर्यावरणावरही तितकेच लक्ष केंद्रित करत आहे. एकीकडे भारताने 4 जी आणि 5 जी संपर्क वाढवला आहे, तर दुसरीकडे वनक्षेत्रातही वाढ केली आहे.

एकीकडे भारताने गरिबांसाठी 4 कोटी घरे बांधली आहेत, तर दुसरीकडे भारतातील वन्यजीव आणि वन्यजीव अभयारण्याच्या संख्येत विक्रमी वाढ केली आहे. आज भारत एकीकडे जल जीवन मिशन राबवत आहे, तर दुसरीकडे भारताने जल सुरक्षेसाठी 50 हजारांहून अधिक अमृत तलाव बांधले आहेत. आज एकीकडे भारत ही जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली आहे, तर दुसरीकडे अक्षय ऊर्जेच्या बाबतीतही भारताचा समावेश आघाडीच्या देशांमध्ये झाला आहे.

आज एकीकडे भारत कृषी निर्यातीत वाढ करत आहे, तर दुसरीकडे पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिसळण्याची मोहीम राबवत आहे. आज एकीकडे, भारत कोलिशन फॉर डिझास्टर रेझिलियंट इन्फ्रास्ट्रक्चर (सीडीआरआय) या सारख्या संस्थांचा आधार बनला आहे, तर दुसरीकडे, भारताने इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्सचीही (आयबीसीए) घोषणा केली आहे. हे एक मोठे पाऊल आहे. वाघ, सिंह, हिमबिबट्या अशा वाघांच्या जातींचा नैसर्गिक अधिवास असलेल्या देशात त्यांच्या संवर्धनासाठी उचललेले हे एक मोठे पाऊल आहे.

मित्रहो,

मिशन लाईफ म्हणजेच पर्यावरणासाठी जीवनशैली आज संपूर्ण जगात एक सार्वजनिक चळवळ, एक जनचळवळ बनत आहे, हे माझ्यासाठी वैयक्तिकरीत्या दिलासादायक आहे. गेल्या वर्षी जेव्हा मी गुजरातमध्ये केवडिया- एकता नगर येथे मिशन लाइफचे उद्घाटन केले तेव्हा लोकांमध्ये उत्सुकता होती. हवामान बदलाचा सामना करण्यासाठी जीवनशैलीतील बदलांसाठी ही मोहीम नवा उत्साह पसरवत आहे. महिनाभरापूर्वी मिशन लाइफ संदर्भात मोहीमही सुरू झाली. एका महिन्यापेक्षा कमी कालावधीत या मोहिमेत सुमारे 2 कोटी लोक सामील झाल्याची माहिती मला मिळाली आहे.

गिव्हिंग लाईफ टू माय सिटी या भावनेने काही ठिकाणी रॅली काढण्यात आल्या, तर काही ठिकाणी प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आल्या. इको-क्लबच्या माध्यमातून लाखो शाळकरी मुले, त्यांचे शिक्षक या मोहिमेत सामील झाले. लाखो सहकाऱ्यांनी त्यांच्या दैनंदिन जीवनात -रिड्यूस, रियूज, रिसायकल- या मंत्राचा अवलंब केला आहे. आपला स्वभाव बदललात तर जग बदलेल, हे मिशन लाईफचे मूळ तत्व आहे. संपूर्ण मानवजातीच्या उज्ज्वल भविष्यासाठी, आपल्या भावी पिढ्यांसाठी मिशन लाइफ तितकेच महत्त्वाचे आहे.

मित्रहो,

हा उत्साह केवळ आपल्या देशापुरता मर्यादित नाही, तर जगभरातून भारताच्या या उपक्रमाला पाठिंबा वाढत आहे. गेल्या वर्षी पर्यावरण दिनी मी जागतिक समुदायाला आणखी एक विनंती केली होती. व्यक्ती आणि समुदायांमध्ये हवामान अनुकूल वर्तनात्मक बदल घडवून आणण्यासाठी नाविन्यपूर्ण उपाय सामायिक करण्याची विनंती मी केली होती.

आवाक्यातील, व्यवहार्य उपाय शोधायचे होते. जगभरातील सुमारे ७० देशांतील हजारो मित्रांनी याविषयीचे विचार मांडले ही अतिशय आनंदाची बाब आहे. यामध्ये विद्यार्थी, संशोधक, विविध क्षेत्रातील तज्ञ, व्यावसायिक, स्वयंसेवी संस्था आणि सामान्य नागरिक यांचा समावेश आहे. यातील काही मान्यवर सहकाऱ्यांच्या कल्पनांना थोड्या वेळापूर्वी पुरस्कारही दिले गेले. त्या सर्व पुरस्कार विजेत्यांचे मी अभिनंदन करतो.

मित्रहो,

मिशन लाइफच्या दिशेने टाकलेले प्रत्येक पाऊल आगामी काळात जगाच्या पर्यावरणासाठी एक मजबूत ढाल बनेल. लाइफसाठी थॉट लीडरशीप हा संग्रह देखील आज प्रकाशित झाला आहे. मला खात्री आहे की अशा प्रयत्नांमुळे हरित विकासाचा आपला संकल्प आणखी मजबूत होईल. पुन्हा एकदा सर्वांना पर्यावरण दिनाच्या अनेक अनेक शुभेच्छा, मनापासून शुभेच्छा.

धन्यवाद!

 

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
'India Delivers': UN Climate Chief Simon Stiell Hails India As A 'Solar Superpower'

Media Coverage

'India Delivers': UN Climate Chief Simon Stiell Hails India As A 'Solar Superpower'
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
PM Modi condoles loss of lives due to stampede at New Delhi Railway Station
February 16, 2025

The Prime Minister, Shri Narendra Modi has condoled the loss of lives due to stampede at New Delhi Railway Station. Shri Modi also wished a speedy recovery for the injured.

In a X post, the Prime Minister said;

“Distressed by the stampede at New Delhi Railway Station. My thoughts are with all those who have lost their loved ones. I pray that the injured have a speedy recovery. The authorities are assisting all those who have been affected by this stampede.”