Quote"तामिळनाडू हा भारतीय राष्ट्रवादाचा बालेकिल्ला आहे"
Quote"अधिनम आणि राजा जी यांच्या मार्गदर्शनाखाली प्राचीन तामिळ संस्कृतीतून एक पवित्र मार्ग सापडला - सेंगोलच्या माध्यमातून सत्ता हस्तांतरणाचा मार्ग"
Quote“1947 मध्ये थिरुवदुथुराईच्या अधिनम यांनी खास सेंगोल तयार केले. आज त्या काळातील चित्रे तामिळ संस्कृती आणि आधुनिक लोकशाही म्हणून भारताची नियती यातील घट्ट भावनिक बंधाची आठवण करून देत आहेत”
Quoteशेकडो वर्षांच्या गुलामगिरीच्या प्रत्येक प्रतीकातून भारताला मुक्त करण्यासाठी अधिनमने तयार केलेला सेंगोल ही सुरुवात होती.
Quote"सेंगोलनेच स्वतंत्र भारताला गुलामगिरीपूर्वी अस्तित्वात असलेल्या राष्ट्राच्या युगाशी जोडले"
Quote" लोकशाहीच्या मंदिरात सेंगोलला त्याचे योग्य स्थान मिळत आहे"

नअनैवरुक्कुम् वणक्कम्

ऊँ नम: शिवाय, शिवाय नम:!

हर हर महादेव!

सगळ्यात आधी मी विविध अधीनमशी (तामिळनाडूमधील मंदिरांतील अनुवांशिक विश्वस्त/ शिवभक्त) जोडल्या गेलेल्या तुम्हा सर्व पूज्यनीय संतांपुढे नतमस्तक होतो. तुमचे पाय माझ्या घराला लागले ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. भगवान शिवाच्याच कृपेमुळे एकाच वेळी तुम्हा सगळ्या शिवभक्तांच्या दर्शनाची संधी मला मिळाली. नव्या संसद भवनाचे लोकार्पण करताना तुम्ही सगळे समक्ष आशीर्वाद देणार आहात याचाही मला आनंद आहे.

आदरणीय संत,

आपल्या स्वातंत्र्यलढ्यात तामिळनाडूने बजावलेली महत्त्वाची भूमिका आपल्या सर्वांना माहीत आहे. वीरमंगाई वेलू नचियारपासून ते मरुडू बंधू यांच्यापर्यंत, सुब्रह्मण्य भारती यांच्यापासून ते नेताजी सुभाषचंद्र बोस यांना साथ देणाऱ्या अनेक तामिळांपर्यंत ही यादी आहे. तामिळनाडू हा भारतीय राष्ट्रवादाचा बालेकिल्ला आहे. तामिळ लोकांमध्ये नेहमीच भारतमातेची, भारताच्या कल्याणाची भावना असते.

असे असूनही भारताच्या स्वातंत्र्यालढ्यात तामिळ लोकांच्या योगदानाला जे महत्त्व द्यायला हवे होते ते दिले गेले नाही, हे अत्यंत दुर्दैवी आहे. आता भाजपने हा मुद्दा ठळकपणे मांडण्यास सुरुवात केली आहे. महान तामिळ परंपरा आणि देशभक्तीचे प्रतीक असलेल्या तामिळनाडूचे काय झाले हे आता देशातील जनतेलाही जाणवू लागले आहे.

स्वातंत्र्याची वेळ समीप आली तेव्हा सत्ता हस्तांतरणाच्या चिन्हाबाबत प्रश्न निर्माण झाला. यासाठी आपल्या देशात वेगवेगळ्या परंपरा आहेत. वेगवेगळ्या प्रथाही आहेत. पण त्यावेळी राजाजी आणि अधीनम यांच्या मार्गदर्शनाखाली प्राचीन तामिळ संस्कृतीतून एक सदाचारी, पवित्र मार्ग सापडला होता.

हा मार्ग होता - सेंगोलद्वारे (राजदंड) सत्तेचे हस्तांतरण. तामिळ परंपरेत, सेंगोल राज्यकर्त्याला दिला जातो. ज्या व्यक्तीकडे सेंगोल  असतो त्याच्याकडे देशाच्या कल्याणाची जबाबदारी असते आणि त्याने कर्तव्याच्या मार्गापासून दूर जाऊ नये याची जाणीव सेंगोल करून देतो. 1947 मध्ये थिरुवदुथुराई अधिनम यांनी खास सेंगोल तयार केला. आधुनिक लोकशाही म्हणून तमिळ संस्कृती आणि भारताच्या नशिबात किती उत्कट आणि जिव्हाळ्याचे नाते आहे याची त्या काळातील चित्रे आज आपल्याला आठवण करून देतात. आज त्या खोलवर रूजलेल्या संबंधांची गाथा दडपलेल्या इतिहासाच्या पानांमधून बाहेर पडून पुन्हा जिवंत झाली आहे, यावरून त्या काळातील घडामोडींना योग्य दृष्टीकोनातून पाहण्याची दृष्टी मिळते. या पवित्र प्रतीकालाही कशी वागणूक दिली गेली आहे याची जाणीवही आपल्याला झाली आहे.

माझ्या देशवासीयांनो

राजाजी आणि इतर विविध अधिनमांच्या दूरदृष्टीला मी सलाम करतो. शेकडो वर्षांच्या गुलामगिरीची आठवण असलेल्या प्रत्येक प्रतीकापासून मुक्त करून देशाच्या स्वातंत्र्याची सुरुवात सेंगोलने केली. सेंगोलनेच स्वतंत्र भारताला गुलामगिरीपूर्वी अस्तित्त्वात असलेल्या राष्ट्राच्या युगाशी जोडले आणि देश स्वतंत्र झाल्यावर 1947 मध्ये सत्तेचे हस्तांतरण सूचित केले. भारताची भूतकाळातील गौरवशाली वर्षे आणि परंपरा याला सेंगोलने स्वतंत्र भारताच्या भविष्याशी जोडले आहे, हे सेंगोलचे आणखी एक महत्त्व आहे.

स्वातंत्र्यानंतर या पूज्य सेंगोलला पुरेसा सन्मान मिळाला असता, अभिमानाचे स्थान दिले गेले असते तर बरे झाले असते. पण हे सेंगोल प्रयागराजमध्ये, आनंद भवनात प्रदर्शनासाठी ठेवले होते, त्याला 'चालताना आधार देणारी काठी' असे हिणवले जायचे. मी म्हणजेच तुमच्या आणि सरकारच्या सेवकाने आता त्या सेंगोलला आनंद भवनातून बाहेर काढले आहे.

नवीन संसद भवनात राजदंड प्रस्थापित करताना स्वातंत्र्याचा तो पहिला क्षण पुन्हा जिवंत करण्याची संधी आज आम्हाला मिळाली आहे. लोकशाहीच्या मंदिरात आज राजदंडाला योग्य स्थान मिळते आहे. भारताच्या महान परंपरेचे प्रतीक असलेल्या राजदंडाची स्थापना नवीन संसद भवनात होणार आहे, याचा मला मनापासून आनंद होतो आहे. आपण कर्तव्याच्या मार्गावर चालत राहायचे आहे आणि जनतेला उत्तरदायी राहायचे आहे, याची आठवण हा राजदंड करून देत राहील.

आदरणीय संतगण,

आदिनामची महान प्रेरणादायी परंपरा ही खऱ्या सात्विक ऊर्जेचे प्रतीक आहे. तुम्ही सर्व संत शैव पंथाचे अनुयायी आहात. तुमच्या तत्वज्ञानातील एक भारत श्रेष्ठ भारताची भावना आहे, ती भारताच्याच एकात्मतेचे आणि अखंडतेचे प्रतिबिंब आहे. तुमच्या अनेक आदिनामांच्या नावांवरून हे दिसून येते. तुमच्या काही आदिनामांच्या नावात कैलासाचा उल्लेख आहे. हा पवित्र पर्वत तामिळनाडूपासून खूप दूर हिमालयात आहे, तरीही तो तुमच्या हृदयाच्या जवळ आहे. शैव पंथातील प्रसिद्ध संत असणारे तिरुमूलर हे शिवभक्तीचा प्रसार करण्यासाठी कैलास पर्वतावरून तामिळनाडूत आले होते, असे म्हटले जाते. आजही शिवस्मृत्यर्थ, त्यांची रचना असणाऱ्या तिरुमंदिरमच्या श्लोकांचे पठण केले जाते.

अप्पर, संबंदर, सुंदरर आणि माणिक्का वासगर अशा अनेक महान संतांनी उज्जैन, केदारनाथ आणि गौरीकुंडाचा उल्लेख केला आहे. जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने आज मी महादेवाची नगरी असलेल्या काशीचा खासदार आहे, त्यामुळे मी तुम्हाला काशीबद्दलही सांगेन. धर्मपुरम आदिनामचे स्वामी कुमारगुरुपरा तामिळनाडूहून काशीला गेले होते. त्यांनी वाराणसीच्या केदार घाटावर केदारेश्वर मंदिराची स्थापना केली होती. तमिळनाडूतील तिरुप्पनन्दाळ येथील काशी मठाचे नाव सुद्धा काशीवरून ठेवण्यात आले आहे. या मठाबद्दल मला एक रंजक माहिती सुद्धा कळली आहे. असे म्हणतात की तिरुप्पनन्दाळ येथील काशी मठ यात्रेकरूंना बँकिंग सेवा पुरवत असे. तामिळनाडूच्या काशी मठात पैसे जमा केल्यानंतर ते यात्रेकरू काशी येथे प्रमाणपत्र दाखवून पैसे काढू शकत असत. अशा प्रकारे, शैव पंथाच्या अनुयायांनी केवळ शिवभक्तीचाच प्रसार केला नाही तर आपल्याला एकमेकांच्या जवळ आणण्याचे कामही केले.

आदरणीय संतगण,

शेकडो वर्षांच्या गुलामगिरीनंतरसुद्धा तामिळनाडूची संस्कृती आजही जिवंत आणि समृद्ध आहे, त्यात आदिनामसारख्या महान आणि दैवी परंपरेचाही मोठा वाटा आहे. ही परंपरा जिवंत ठेवण्याची जबाबदारी संतांनीच पार पाडली आहे, त्याचबरोबर सर्व पीडित, शोषित, वंचितांनाही याचे श्रेय जाते, ज्यांनी या परंपरेचे रक्षण केले आणि जतनही केले. राष्ट्रासाठी योगदान देण्याच्या कामी तुमच्या सर्व संस्थांचा इतिहास गौरवशाली आहे. आता तो भूतकाळ पुढे नेण्याची, त्यातून प्रेरणा घेण्याची आणि येणाऱ्या पिढ्यांसाठी काम करण्याची वेळ आहे.

 

आदरणीय संतगण,

पुढच्या 25 वर्षांसाठी देशाने काही उद्दिष्टे निर्धारित केली आहेत. स्वातंत्र्यप्राप्तीची 100 वर्षे पूर्ण होईपर्यंत एक मजबूत, स्वावलंबी आणि सर्वसमावेशक विकसित भारत निर्माण करणे, हे आमचे उद्दिष्ट आहे. 1947 सालातील तुमच्या महत्त्वपूर्ण भूमिकेची ओळख लाखो देशवासीयांना पुन्हा झाली आहे. आज देश 2047 साठीची मोठी उद्दिष्टे घेऊन पुढे जातो आहे, अशा वेळी तुमची भूमिका आणकी महत्त्वाची झाली आहे. तुमच्या संस्थांनी नेहमीच सेवेची मुल्ये रूजवली आहेत. लोकांना परस्परांशी जोडण्याचे, त्यांच्यात समानतेची भावना निर्माण करण्याचे उत्तम उदाहरण तुम्ही घालून दिले आहे. भारत जितका अखंड असेल तितका तो मजबूत असेल. म्हणूनच आपल्या प्रगतीच्या मार्गात अडथळे निर्माण करणारे आपल्यासमोर वेगवेगळी आव्हाने उभी करतील. ज्यांना भारताची प्रगती खटकते, ते सर्वात आधी आपली एकता भंग करण्याचा प्रयत्न करतील. तुमच्या संस्थांकडून देशाला मिळालेल्या अध्यात्मिकतेच्या आणि सामाजिकतेच्या बळावर आम्ही प्रत्येक आव्हानाला तोंड देऊ, अशी खात्री मला वाटते. तुम्ही येथे आलात, तुम्ही सर्वांनी मला आशीर्वाद दिलेत, हे माझे सौभाग्य आहे, मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे मनापासून आभार मानतो, मी तुम्हा सर्वांना अभिवादन करतो. नवीन संसद भवनाच्या उद्घाटनानिमित्त तुम्ही सर्वजण येथे आलात आणि आम्हाला आशीर्वाद दिला आहे. यापेक्षा मोठे भाग्य असूच शकत नाही आणि म्हणून मी कितीही आभार मानले तरी ते पुरेसे असणार नाहीत. पुन्हा एकदा मी तुम्हा सर्वांना नमस्कार करतो.

ऊँ नम: शिवाय!

वणक्कम!

 

Explore More
प्रत्येक भारतीयाचं रक्त तापलं आहेः पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये

लोकप्रिय भाषण

प्रत्येक भारतीयाचं रक्त तापलं आहेः पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये
'Operation Sindoor on, if they fire, we fire': India's big message to Pakistan

Media Coverage

'Operation Sindoor on, if they fire, we fire': India's big message to Pakistan
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
PM Modi's address to the nation
May 12, 2025
QuoteToday, every terrorist knows the consequences of wiping Sindoor from the foreheads of our sisters and daughters: PM
QuoteOperation Sindoor is an unwavering pledge for justice: PM
QuoteTerrorists dared to wipe the Sindoor from the foreheads of our sisters; that's why India destroyed the very headquarters of terror: PM
QuotePakistan had prepared to strike at our borders,but India hit them right at their core: PM
QuoteOperation Sindoor has redefined the fight against terror, setting a new benchmark, a new normal: PM
QuoteThis is not an era of war, but it is not an era of terrorism either: PM
QuoteZero tolerance against terrorism is the guarantee of a better world: PM
QuoteAny talks with Pakistan will focus on terrorism and PoK: PM

प्रिय देशवासीयांनो

नमस्कार!

आपण सर्वांनी गेल्या काही दिवसांत देशाचं सामर्थ्य आणि त्याचा संयम दोन्ही पाहिलं आहे. मी सर्वप्रथम भारताच्या पराक्रमी सैन्यदलांना, सशस्त्र दलांना, आपल्या गुप्तहेर संस्थांना, आपल्या वैज्ञानिकांना प्रत्येक भारतीयाच्या वतीनं सॅल्यूट करतो. आपल्या शूर सैनिकांनी ऑपरेशन सिंदूरच्या लक्ष्यप्राप्तीसाठी असीम शौर्य गाजवलं.

मी त्यांचं शौर्य, त्यांचं साहस, त्यांचा पराक्रम आज समर्पित करतो आहे. आपल्या देशाच्या प्रत्येक मातेला, देशाच्या प्रत्येक भगिनीला आणि देशाच्या प्रत्येक कन्येला हा पराक्रम समर्पित करतो आहे.

मित्रहो,

२२ एप्रिलला पहेलगाममध्ये दहशतवाद्यांनी ज्या क्रौर्याचं प्रदर्शन मांडलं, त्यानं देशाला आणि जगालाही हादरवून टाकलं होतं. सुट्टीचा आनंद घेणाऱ्या निर्दोष निरपराध नागरिकांना धर्म विचारून...त्यांचा कुटुंबासमोर, त्यांच्या मुलांसमोर निर्घृणपणे मारून टाकणं. हा दहशतीचा अतिशय बीभत्स चेहरा होता, क्रौर्य होतं. देशातला एकोपा आणि सुसंवाद भंग करण्याचाही हा किळसवाणा प्रयत्न होता. मला व्यक्तिशः याचा फार त्रास झाला. या दहशतवादी हल्ल्यानंतर सारा देश, प्रत्येक नागरिक, प्रत्येक समाज, प्रत्येक वर्ग, प्रत्येक राजकीय पक्ष‌ एकमुखाने दहशतवादाविरोधात कठोर कारवाईसाठी उभा राहिला. आम्ही दहशतवाद्यांना धूळ चारण्यासाठी भारताच्या सैन्यदलांना पूर्ण मुभा दिली. आणि आज प्रत्येक दहशतवाद्याला, प्रत्येक दहशतवादी संघटनेला हे पुरेपूर समजलंय की आमच्या बहिणींच्या आणि मुलींच्या कपाळावरचं कुंकू- सिंदूर पुसण्याचा परिणाम काय होतो.

मित्रहो,

ऑपरेशन सिंदूर हे फक्त नाव नाही. देशातल्या कोट्यवधी लोकांच्या भावनांचं हे प्रतिबिंब आहे. ऑपरेशन सिंदूर ही न्यायाची अखंड प्रतिज्ञा आहे. ६ मे च्या रात्री उशिरा ७ मे च्या सकाळी साऱ्या जगानं ही प्रतिज्ञा प्रत्यक्षात येताना पाहिली आहे. भारताच्या सैन्यदलांनी पाकिस्तानात दहशतवादाच्या तळांवर त्यांच्या प्रशिक्षण केंद्रांवर अचूक प्रहार केला. दहशतवाद्यांना स्वप्नातही वाटलं नसेल, की भारत इतका मोठा निर्णय घेऊ शकेल. पण जेव्हा देशाची एकजूट होते. 'राष्ट्र प्रथम' या भावनेने देश भारून जातो. राष्ट्र सर्वोपरि असतं...तेव्हा पोलादी निर्णय घेतले जातात. अपेक्षित परिणाम घडवून दाखवले जातात. जेव्हा पाकिस्तानात दहशतीच्या अड्ड्यांवर भारताच्या क्षेपणास्त्रांनी हल्ला केला. भारताच्या ड्रोन्सनी हल्ला केला...तेव्हा दहशतवादी संघटनांच्या केवळ इमारतीच नाही, तर त्यांचं धैर्यही डळमळीत झालं. बहावलपूर आणि मुरीदके यासारखे दहशतवाद्यांचे तळ, एक प्रकारे जागतिक दहशतवादाची विद्यापीठं बनली होती. जगात कुठेही जे मोठे दहशतवादी हल्ले झाले आहेत...मग तो नाइन इलेव्हन असो. कींवा लंडन ट्यूब बॉंबिंग्स असोत किंवा भारतात अनेक दशकांत जे मोठमोठे दहशतवादी हल्ले झाले. त्यांचे धागेदोरे दहशतीच्या या तळांशी कुठे ना कुठे जोडलेले दिसत आले आहेत. दहशतवाद्यांनी आपल्या बहिणींच्या कपाळीचं कुंकू पुसलं म्हणून भारताने दहशतीची ही मुख्यालयं पुसून टाकली. भारताच्या या हल्ल्यांमध्ये शंभराहून अधिक क्रूरकर्मा दहशतवाद्यांना यमसदनी धाडण्यात आलं. दहशतवाद्यांचे कित्येक म्होरके आश्रयदाते गेल्या अडीच तीन दशकांपासून पाकिस्तानात राजरोस फिरत होते, जे भारताविरुद्ध कारस्थानं करत होते त्यांना भारतानं एका झटक्यात संपवलं आहे.

मित्रहो,

भारताच्या या कारवाईमुळे पाकिस्तान घोर निराशेच्या खाईत ढकलला गेला होता. कमालीचा हताश झाला होता. बिथरला होता आणि याच बिथरलेपणाच्या भावनेतून त्यानं आणखी एक दुःसाहस केलं. दहशतवादाविरोधात भारताच्या कारवाईला साथ देण्याऐवजी पाकिस्ताननं भारतावरच हल्ला करायला सुरुवात केली. पाकिस्ताननं आपल्या शाळा-महाविद्यालयांना गुरुद्वारांना मंदिरांना सामान्य नागरिकांच्या घरांना लक्ष्य केलं. पाकिस्ताननं आपल्या सैनिकी तळांना लक्ष्य केलं. पण यातही पाकिस्तानचा बुरखा गळून पडला. जगानं हे पाहिलं की पाकिस्तानचे ड्रोन्स आणि क्षेपणास्त्रं भारतासमोर काड्या काटक्यांसारखी कशी उधळली गेली. भारताचा सशक्त हवाई संरक्षण प्रणालीनं त्यांना आकाशातच नष्ट करून टाकलं. पाकिस्ताननं सीमेवर वार करण्याची तयारी केली होती. पण भारताने पाकिस्तानच्या छातीवरच प्रहार केला. भारताचे ड्रोन्स भारताच्या क्षेपणास्त्रांनी अतिशय अचूक हल्ला केला. पाकिस्तानी वायुदलाच्या त्याच हवाई तळांची हानी केली, ज्यांच्याबद्दल पाकिस्तानला फारच घमेंड होती. भारताने पहिल्या तीन दिवसांतच पाकिस्तानला इतकं उध्वस्त केलं ज्याचा त्याला अंदाजही नव्हता. म्हणूनच तर भारताच्या आक्रमक कारवाईनंतर पाकिस्ताननं सुटकेचे मार्ग शोधायला सुरुवात केली. पाकिस्तान जगाकडे तणाव कमी करण्यासाठी विनंतीची याचना करत होता आणि जबरदस्त मार खाल्ल्यानंतर, १० मे रोजी दुपारी, पाकिस्तानी सैन्यानं आपल्या डीजीएमओ शी संपर्क साधला. तोपर्यंत आपण दहशतवादाला पोसणाऱ्या पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणात नष्ट केल्या होत्या. दहशतवाद्यांना यमसदनी धाडण्यात आलं होतं, पाकिस्तानने अगदी हृदयाशी बाळगलेल्या दहशतवादी तळांना आपण उध्वस्त केलं होतं. म्हणूनच जेव्हा पाकिस्तानकडून विनंतीची याचना करण्यात आली. जेव्हा पाकिस्तानकडून हे सांगण्यात आलं की त्यांच्याकडून यापुढे दहशतवादी कारवाया आणि लष्करी दुःसाहस होणार नाही. तेव्हा भारतानही त्यावर विचार केला. आणि मी पुन्हा सांगतो. आपण पाकिस्तानमधील दहशतवादी आणि लष्करी तळांविरुद्धची आपली प्रत्युत्तरात्मक कारवाई सध्या फक्त स्थगित केली आहे. येत्या काळात आम्ही पाकिस्तानचे प्रत्येक पाऊल या निकषावर पारखू...की तो नेमका कोणता दृष्टिकोन स्वीकारतो?

मित्रांनो,

भारताची तिन्ही सैन्यदलं आपलं हवाई दल आपलं भूदल आणि आपलं नौदल आपलं सीमा सुरक्षा दल – बीएसएफ, भारताची निमलष्करी दलं सातत्यानं सतर्क आहेत. सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईक नंतर आता ऑपरेशन सिंदूर हे दहशतवादाविरुद्ध भारताचं धोरण आहे. ऑपरेशन सिंदूरनं दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक नवीन रेषा आखली आहे. एक नवीन मानक, एक नवीन उदाहरण, घालून दिलं आहे. पहिले- जर भारतावर दहशतवादी हल्ला झाला तर त्याला सडेतोड उत्तर दिले जाईल. आपण आपल्या पद्धतीनं, आपल्या स्वतःच्या अटींनिशी प्रतिसाद देऊ. दहशतवादाची मुळे जिथे जिथे उगम पावत असतील तिथे तिथे जाऊन आम्ही कठोर कारवाई करू. दुसरे - भारत कोणत्याही आण्विक ब्लॅकमेलला भीतीच्या बागुलबुवाला भीक घालणार नाही. आण्विक ब्लॅकमेलच्या आडून फोफावणाऱ्या दहशतवादी अड्ड्यांवर भारत अचूक आणि निर्णायक हल्ला करेल. तिसरे म्हणजे, दहशतवादाला आश्रय देणारं सरकार आणि दहशतवादाचे सूत्रधार, यांना आपण वेगवेगळे घटक समजणार नाही. ऑपरेशन सिंदूर दरम्यान जगानं पुन्हा एकदा पाकिस्तानचं घृणास्पद सत्य अनुभवलं. जेव्हा मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना अंतिम निरोप देण्यासाठी पाकिस्तानी सैन्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची उडाउडी पडली. एखादा देश पुरस्कृत करत असलेल्या दहशतवादाचा…हा जिवंत पुरावा आहे. आपण भारत आणि आपल्या नागरिकांना कुठल्याही प्रकारच्या धोक्यापासून वाचवण्यासाठी सातत्यानं निर्णायक पावलं उचलत राहू.

मित्रानो,

रणागणांत प्रत्येकवेळी आपण पाकिस्तानवर मात केली आहे आणि यावेळी ऑपरेशन सिंदूरनं नवा आयाम स्थापित केला आहे. आपण वाळवंट आणि पर्वतीय भागातही आपल्या क्षमतेचं शानदार प्रदर्शन केलं आणि सोबतच नव्या पिढीच्या आधुनिक युध्दनीतीतही आपलं श्रेष्‍ठत्व सिध्द केलं. या ऑपरेशन दरम्यान, आपली मेड इन इंडिया शस्त्र प्रमाणांच्या कसोटीवर खरी उतरली. आज जग पाहत आहे, एकविसाव्या शतकाच्या युध्दनीतीत मेड इन इंडिया संरक्षण उत्पादनांची वेळ आली आहे.

मित्रानों,

प्रत्येक प्रकारच्या दहशतवादा विरोधात आपल्या सगळयाची एकजूट आपली सर्वात मोठी शक्ती आहे. निश्चितच हे युग युध्दाचं नाही, परंतु हे युग दहशतवादाचंही नाही. दहशतवादाविरोधात शून्य सहिष्णूता ही एका चांगल्या जगाची हमी आहे.

मित्रानों,

पाकिस्तानी सैन्य पाकिस्तानचं सरकार ज्याप्रकारे दहशतवादाला खतपाणी घालत आहे. तो एकदिवस पाकिस्तानलाच संपवून टाकेल. पाकिस्तानला यातून वाचायचं असेल तर, त्याला आपल्या दहशतवादी पायाभूत सुविधा नष्ट कराव्या लागतील. याशिवाय, शांततेचा दुसरा मार्ग नाही. भारताचं मत एकदम स्पष्ट आहे. दहशतवाद आणि संवाद एकत्र होऊ शकत नाहीत. दहशतवाद आणि व्यापार एकत्र चालू शकत नाहीत आणि पाणी आणि रक्त हे देखील एकत्र वाहू शकत नाही. मला आज जागतिक समुदायाला सांगायचं आहे. आमचं जाहीर धोरण राहिलं आहे, पाकिस्तानशी चर्चा होईल तर दहशतवादावर होईल. पाकिस्तानशी चर्चा होईल तर पाकव्याप्त काश्मीरवर होईल.

प्रिय देशवासीयांनो, आज बुध्दपौर्णिमा आहे. भगवान बुध्दांनी आपल्याला शांततेचा मार्ग दाखवला आहे. शांततेचा मार्गही शक्तीमार्गेच जातो. मानवता, शांतता आणि समृध्दीकडे अग्रेसर व्हावं. प्रत्येक भारतीयाला शांततेनं जगता यावं, विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करता यावं, यासाठी भारताचं शक्तीशाली होणं गरजेचं आहे आणि आवश्यकता असेल तेव्हा, या शक्तीचा वापरही गरजेचा आहे आणि गेल्या काही दिवसात भारतानं हेच केलं आहे. मी पुन्हा एकदा भारताचं सैन्य आणि सशस्त्रदलांना सलाम करतो. आपण भारतीयांच्या उमेद आणि एकजूटीला वंदन करतो.

धन्यवाद.

भारतमाता की जय.