Quoteआपल्या स्वातंत्र्य सैनिकांचे भारताला सदैव स्मरण : पंतप्रधान
Quoteप्रकाश झोतापासून दूर राहिलेल्या नायकांचा इतिहास जपण्याचा गेल्या सहा वर्षापासून जाणीवपूर्वक प्रयत्न : पंतप्रधान
Quoteआपले संविधान आणि लोकशाही परंपरेचा आम्हाला अभिमान : पंतप्रधान

व्यासपीठावर विराजमान गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत जी, मुख्यमंत्री विजय रूपाणी जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी प्रह्लाद पटेल जी, लोकसभेतील माझे सहकारी खासदार सी.आर. पाटील जी, अहमदाबादचे नवनिर्वाचित महापौर किरीटसिंह भाई, साबरमती न्यासाचे विश्वस्त कार्तिकेय साराभाई जी, आणि साबरमती आश्रमाला ज्यांनी आपले जीवन समर्पित केले आहे, असे आदरणीय अमृत मोदी जी, आमच्याबरोबर देशभरातून जोडले गेलेले सर्व महनीय, माता आणि सद्गृहस्थ आणि माझ्या युवा मित्रांनो!

आज ज्यावेळी मी सकाळी दिल्लीतून निघालो, त्यावेळी एक खूप अद्भूत योगायोग घडला. अमृत महोत्सवाला प्रारंभ होण्याआधीच आज देशाच्या राजधानीमध्ये अमृत वर्षा झाली आणि वरूण देवाने आपल्याला आशीर्वादही दिला. आज आपण या ऐतिहासिक कालखंडाचे साक्षीदार बनत आहोत, हे आपल्या सर्वांचे भाग्य आहे. आज दांडी यात्रेच्या वर्धापनदिनी आपण बापूजींच्या या कर्मस्थानी इतिहास निर्माण होताना पहात आहोत आणि इतिहासाचा एक भागही बनत आहोत. आज स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाला प्रारंभ होत आहे. आजचा पहिला दिवस आहे. अमृत महोत्सव, 15 ऑगस्ट 2022 च्या आधी 75 आठवडे आज प्रारंभ होत आहे आणि 15 ऑगस्ट 2023 पर्यंत हा महोत्सव चालणार आहे. आपल्याकडे अशी मान्यता आहे की, ज्यावेळी कधीही संधी मिळेल, त्यावेळी सर्व तीर्थांचा एकत्रित संगम होत असतो. आज एका राष्ट्राच्या रुपाने भारतासाठीही अशीच एक पवित्र संधी आहे. आज आपल्या स्वातंत्र्य संग्रामातली किती तरी पावन तीर्थस्थाने, कितीतरी पवित्र स्थाने, साबरमती आश्रमाशी जोडली जात आहेत.

स्वातंत्र्य संग्रामामधले पराकोटीचे महत्वपूर्ण स्थान म्हणजे अंदमानमधले सेल्यूलर कारागृह, अरूणाचल प्रदेशातली ‘अंग्लो-इंडियन युद्धस्थळाची साक्षीदार असलेली केकर मोनिन्गची भूमी, मुंबईचे ऑगस्ट क्रांती मैदान, पंजाबातील जालियनवाला बाग, उत्तर प्रदेशातील मेरठ, काकोरी आणि झांशी ही शहरे, देशभरामध्ये अशा कितीतरी स्थानांवर आज एकाचवेळी या अमृत महोत्सवाचा श्रीगणेशा होत आहे. असे वाटते की, ज्याप्रमाणे स्वातंत्र्यासाठी संघर्ष केला गेला, असंख्य जणांचे बलिदान दिले गेले आणि असंख्य प्रकारच्या तपस्येची शक्ती संपूर्ण भारतामध्ये एकाचवेळी पुनर्जागृत होत आहे. या पावनप्रसंगी मी बापूजींच्या चरणावर आपले श्रद्धासुमन अर्पित करीत आहे. देशाच्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये स्वतःच्या आयुष्याची आहुती देणा-या, देशाचे नेतृत्व करणा-या सर्व महान विभूतींच्या चरणांना मी आदरपूर्वक वंदन करतो. त्यांना कोटी-कोटी नमन करतो. ज्यांनी स्वातंत्र्यानंतरही राष्ट्ररक्षणाच्या परंपरेला जीवित ठेवले, त्या सर्व वीर सैनिकांना मी वंदन करतो. देशाच्या रक्षणासाठी ज्यांनी आपल्या प्राणांचे म्हणजेच सर्वोच्च बलिदान दिले, अशा सर्व हुतात्म्यांना मी वंदन करतो. ज्या पुण्यात्मांनी स्वतंत्र भारताच्या पुनर्निर्माणामध्ये प्रगतीची एक एक वीट रचली, 75 वर्षांमध्ये जे देशाला इथपर्यंत घेऊन आले, अशा सर्व महनीयांच्या चरणांना मी प्रणाम करतो.

|

मित्रांनो,

ज्यावेळी आपण गुलामीच्या कालखंडाची कल्पना करतो, ज्यावेळी कोट्यवधी लोकांनी अनेक युगे स्वातंत्र्याची पहाट कधी उगवणार याची वाट पाहिली, त्यावेळी हे जास्त जाणवते की, स्वातंत्र्याची 75 वे वर्ष साजरे करण्याची संधी मिळणे किती ऐतिहासिक आहे, किती गौरवशाली आहे. या पर्वामध्ये शाश्वत भारताची परंपरासुद्धा आहे. स्वातंत्र्य संग्रामाचे प्रतिबिंब आहे आणि स्वतंत्र भारताला अधिक गौरवशाली बनवणारी प्रगतीही आहे. म्हणूनच आज आपल्या समोर जे सादरीकरण करण्यात येणार आहे, त्यामध्ये अमृत महोत्सवाच्या पाच स्तंभावर विशेष भर देण्यात आला आहे. ‘फ्रीडम स्ट्रगल, आयडियाज ॲट 75, अचिव्हमेंटस् ॲट 75, ॲक्शन ॲट 75 आणि रिझॉल्व्ज ॲट 75; असे पाच स्तंभ स्वातंत्र्याच्या लढ्याबरोबरच स्वंतत्र भारताची स्वप्ने आणि कर्तव्ये देशासमोर आणून पुढे जाण्यासाठी प्रेरणा देतील. या संदेशांच्या आधारे आज ‘अमृत महोत्सव’च्या संकेतस्थळाबरोबर चरखा अभियान आणि आत्मनिर्भर इनक्यूबेटरही सुरू करण्यात आले आहे.

बंधू आणि भगिनींनो,

ज्यावेळी आपण स्वाभिमान आणि बलिदान यांची परंपरा पुढच्या पिढीला शिकवतो, त्यांना याविषयीचे संस्कार देतो, त्यांना देशासाठी या गोष्टी करण्यासाठी निरंतर प्रेरणा देतो त्याचवेळी कोणत्याही राष्ट्राचा गौरव जागृत राहतो, याला इतिहास साक्षी आहे. ज्यावेळी एखादे राष्ट्र आपल्या भूतकाळातल्या अनुभवांबरोबर आणि वारसा-परंपरा यांच्याबरोबर अभिमानाने प्रत्येक क्षणी जोडलेला राहते, त्याचवेळी त्या राष्ट्राचे भविष्यही उज्ज्वल असते. आणि भारताजवळ तर अभिमान बाळगण्यासारख्या अनेक गोष्टींचे जणू अथांग भंडार आहे. भारताकडे समृद्ध इतिहास आहे, चैतन्यमयी सांस्कृतिक वारसा-परंपरा आहे. म्हणूनच स्वातंत्र्याला होत असलेल्या 75 वर्षांचे औचित्य म्हणजे वर्तमानातल्या पिढीला अमृत अनुभव मिळणार आहे. हा एक असा अमृत अनुभव मिळणार आहे, त्यामुळे प्रत्येकक्षण देशासाठी जगावे, देशासाठी काही तरी करावे, यासाठी तो प्रेरणादायी असणार आहे.

मित्रांनो,

आपल्या वेदांमध्ये एक वाक्य आहे- मृत्योः मुक्षीय मामृतात्।

याचा अर्थ असा आहे की, आपण दुःख, कष्ट, क्लेश आणि विनाश यांच्यातून बाहेर पडून अमृताच्या दिशेने पुढे जावे, अमरतेच्या दिशेने पुढे जावे. हाच संकल्प स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचाही आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव म्हणजे - स्वातंत्र्याच्या शक्तीचे अमृत, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव म्हणजे- स्वातंत्र्य सैनानींच्या प्रेरणांचे अमृत. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव म्हणजे- नवीन विचारांचे अमृत. नवीन संकल्पांचे अमृत. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव म्हणजे- आत्मनिर्भरतेचे अमृत. आणि म्हणूनच हा महोत्सव राष्ट्राच्या जागरणाचा महोत्सव आहे. हा महोत्सव, सुराज्याची स्वप्ने पूर्ण करण्याचा महोत्सव आहे. हा महोत्सव, वैश्विक शांतीचा, विकासाचा महोत्सव आहे.

|

मित्रांनो,

अमृत महोत्सवाचा प्रारंभ दांडी यात्रेच्या दिनी होत आहे. त्या ऐतिहासिक क्षणांना पुनर्जीवित करण्यासाठी एक यात्राही आत्ता सुरू होणार आहे. हा अद्भूत योगायोग आहे की, दांडी यात्रेचा प्रभाव आणि संदेशही अगदी तसाच आहे. हाच संदेश आज देशाला अमृत महोत्सवाच्या माध्यमातून पुढे नेणार आहे. गांधीजींनी या एका यात्रेने स्वातंत्र्य संग्रामाला एक नवीन प्रेरणा देऊन या लढ्यामध्ये प्रत्येक व्यक्तींला, सर्व जनांना जोडून घेतले होते. या एका यात्रेने आपल्या स्वातंत्र्याविषयी भारताचा दृष्टिकोन संपूर्ण दुनियेपर्यंत पोहोचवला होता. यामुळे ती यात्रा ऐतिहासिक ठरली आणि त्याचबरोबर बापूंच्या दांडी यात्रेमध्ये स्वातंत्र्याचा आग्रह होता त्याचबरोबर भारताचा स्वभाव आणि भारताच्या संस्काराचाही त्यामध्ये समावेश होता.

आपल्याकडे मीठाचे मूल्यमापन कधीही त्याच्या किंमतीप्रमाणे केले गेले नाही. आपल्याकडे मीठ याचा अर्थ आहे- प्रामाणिकपणा. आपल्याकडे मीठ याचा अर्थ आहे- विश्वास. आपल्याकडे मीठ याचा अर्थ आहे- निष्ठा. आज आपणही म्हणतो की, आम्ही या देशाचे मीठ खाल्ले आहे. असे म्हणण्याचा अर्थ काही मीठ खूप महाग वस्तू आहे, असे अजिबात नाही. आपल्यासाठी मीठ हे इथल्या श्रम आणि समानतेचे प्रतीक आहे. त्या काळामध्ये मीठ भारताच्या आत्मनिर्भरतेचे एक प्रतीक होते. इंग्रजांनी भारताच्या मूल्यांबरोबर या आत्मनिर्भरतेवरही हल्ला केला होता. भारतातल्या लोकांना इंग्लंडवरून आलेल्या मीठावर अवलंबून रहावे लागत होते. गांधीजींनी देशाचे हे जुने दुखणे समजून घेतले, लोकां-लोकांशी संबंधित असलेली ही दुखरी नस नेमकी पकडली. आणि पाहता-पाहता हे आंदोलन प्रत्येक भारतीयाचे आंदोलन बनले, प्रत्येक भारतीयाचा एक संकल्प बनले.

मित्रांनो,

याचप्रमाणे स्वातंत्र्याच्या लढ्यात वेगवेगळ्या संग्रामांनी, वेगवेगळ्या घटनांनीही प्रेरणा दिली, स्वतःचे असे संदेश दिले. या प्रेरणा, हे संदेश आजचा भारत आत्मसात करून पुढची वाटचाल करू शकतो. 1857चा स्वातंत्र्य लढा, महात्मा गांधीजींचे विदेशातून मायदेशी येणे, देशाला सत्याग्रहाच्या ताकदीचे स्मरण करून देणे, लोकमान्य टिळकांचे पूर्ण स्वराज्याचे आवाहन, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नेतृत्वाखाली आझाद हिंद फौजेचा निघालेला दिल्ली मोर्चा, दिल्ली चलोचा दिलेला नारा, हिंदुस्तान आज हे सर्व विसरू शकतो का? 1942 चे अविस्मरणीय आंदोलन, इंग्रजांसाठी केलेला भारत छोडोचा उद्घोष, असे कितीतरी अगणित पाडाव आहेत, त्यांच्याकडून आपण प्रेरणा घेतो, चैतन्य-शक्ती घेतो. देश दररोज कृतज्ञता व्यक्त करतो, असे कितीतरी हुतात्मा सेनानी आहेत.

1852च्या क्रांतीमध्ये मंगल पांडे, तात्या टोपे यांच्यासारखे वीर असो, इंग्रजांच्या फौजेसमोर निर्भयतेने गर्जना करणारी राणी लक्ष्मीबाई असो, कित्तूरची राणी चेन्नमा असो, राणी गाइडिन्ल्यू असो, चंद्रशेखर आझाद, रामप्रसाद बिस्मिल, भगतसिंह, सुखदेव, राजगुरू, अशफाकउल्ला खाँ, गुरूराम सिंह, टिटूस जी, पॉल रामासामी यांच्यासारखे वीर असो, अथवा पंडित नेहरू, सरदार पटेल, बाबासाहेब आंबेडकर, सुभाषचंद्र बोस, मौलाना आझाद, खान अब्दुल गफ्फार खान, वीर सावरकर यांच्यासारखे अगणित लोकनायक! अशा सर्व महनीय व्यक्ती स्वातंत्र्य आंदोलनाचे मार्गदर्शक होते. आज त्यांच्या स्वप्नांचा भारत बनविण्यासाठी, आपण सामूहिक संकल्प करीत आहोत. त्यांच्याकडून प्रेरणा घेत आहोत.

मित्रांनो,

आमच्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये अशी कितीतरी आंदोलने झाली आहेत. कितीतरी संघर्ष झाले आहेत, ते ज्या पद्धतीने देशासमोर येणे आवश्यक होते, त्या पद्धतीने आले नाहीत. असा एक-एक लढा, संघर्ष स्वतःच भारताच्या असत्याविरूद्ध सत्याची सशक्त घोषणा आहे. हा एक-एक संग्राम भारताच्या स्वंतत्र स्वभावाचा पुरावा आहे. अन्याय, शोषण आणि हिंसा यांच्याविरोधात भारताची जी चेतना रामाच्या युगामध्ये होती, महाभारताच्या कुरूक्षेत्रामध्ये होती, हळदीघाटातल्या रणभूमीवर होती, शिवाजी महाराजांच्या उद्घोषामध्ये होती, तीच शाश्वत चेतना, तेच अदम्य शौर्य, भारताच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये, प्रत्येक वर्गामध्ये आणि प्रत्येक समाजाने स्वातंत्र्याच्या लढाईत आपल्यामध्ये प्रज्वलित केले होते. जननी जन्मभूमिश्च, स्वर्गादपि गरीयसी, हा मंत्र आजही आपल्याला प्रेरणा देत आहे.

|

तुम्ही आपला इतिहास जरूर पहावा. कोल आंदोलन असो अथवा ‘हो संघर्ष’, खासी आंदोलन असो अथवा संथाल क्रांती असो, कछोहा कछार नागा संघर्ष असो किंवा कूका आंदोलन, भील्लांचे आंदोलन असो किंवा मुंडा क्रांती , संन्सासी आंदोलन असो अथवा रामोशी संघर्ष, कित्तूर आंदोलन, त्रावणकोर आंदोलन, बारडोली सत्याग्रह, चंपारण सत्याग्रह, संबलपूर संघर्ष, चुआर संघर्ष, बुंदेल संघर्ष, अशा कितीतरी आंदोलनांनी आणि संघर्षांनी देशाच्या प्रत्येक भूप्रदेशाला, प्रत्येक कालखंडामध्ये स्वातंत्र्याच्या ज्योतीने प्रज्वलित ठेवले. याच काळामध्ये आपल्या शिख गुरू परंपरेने देशाची संस्कृती, आपले रितीरिवाज यांच्या रक्षणासाठी, आपल्याला नवीन ऊर्जा-शक्ती दिली, प्रेरणा दिली. त्याग आणि बलिदान यांचा मार्ग दाखवला. या सर्व गोष्टींचे आपण वारंवार स्मरण केले पाहिजे, हा एक महत्वाचा मुद्दा आहे.

मित्रांनो,

स्वातंत्र्य आंदोलनाच्या या ज्योतीला निरंतर जागृत करण्याचे काम, पूर्व-पश्चिम-उत्तर-दक्षिण, अशा प्रत्येक दिशेला, प्रत्येक क्षेत्रामध्ये, आपल्या संतांनी, महंतांनी, आचार्यांनी केले आणि आंदोलनाची मशाल निरंतर पेटती ठेवली आहे. एकप्रकारे या भक्ती आंदोलनाने राष्ट्रव्यापी स्वातंत्र्य आंदोलनाची पीठिका तयार केली होती. पूर्वेकडे चैतन्य महाप्रभू, रामकृष्ण परमहंस आणि श्रीमंत शंकर देव यांच्यासारख्या संतांच्या विचारांनी समाजाला दिशा दिली. पश्चिमकडे मीराबाई, संत एकनाथ, तुकाराम, समर्थ रामदास स्वामी, नरसी मेहता होते, उत्तरेकडे संत रामानंद, कबीरदास, गोस्वामी तुलसीदास, सूरदास, गुरू नानकदेव , संत रैदास, दक्षिणेकडे मध्वाचार्य, निम्बार्काचार्य, वल्लभाचार्य, रामानुजाचार्य, होते. भक्तीकाळाच्या या कालखंडामध्ये मलिक, मोहम्मद जायसी, रसखान सूरदास, केशवचार्य, विद्यापती यांच्यासारख्या महानुभावांनी आपल्या रचनांच्या माध्यमातून समाजातली न्यूनता, कमतरता, अभाव यांच्यात सुधारणा करण्यासाठी प्रेरणा दिली.

अशा अनेक व्यक्तिमत्वांमुळे हे आंदोलन क्षेत्राच्या सीमा ओलांडून संपूर्ण भारतामध्ये लोकांना-जनांना समाविष्ट करून घेत होते. स्वातंत्र्याच्या या असंख्य आंदोलनांमध्ये अशा कितीतरी सेनानींनी, संत-महात्म्यांनी, अनेक वीरांनी बलिदान दिले आहे. त्यांची एक-एक गाथा म्हणजे एका इतिहासाचा एक-एक स्वर्णिम अध्याय आहे. आपल्या या महानायकांना, महानायिकांना आणि त्यांच्या जीवनाचा इतिहासालाही देशासमोर आणायचे आहे. या लोकांच्या जीवनगाथा, त्यांच्या जीवनाचा संघर्ष, आपल्या स्वांतत्र्य आंदोलनामधले चढ-उतार, कधी मिळालेले यश आणि कधी आलेले अपयश, आपल्या आजच्या पिढीला जीवनात एक वेगळा धडा शिकवणार आहे. एकजूटता नेमकी कशी असते, लक्ष्य साध्य करण्यासाठी जिद्द कशी ठेवावी लागते, जीवनाचा प्रत्येक रंग ही पिढी अधिक चांगल्या पद्धतीने जाणून घेतील.

|

बंधू आणि भगिनींनो,

तुम्हाला आठवत असेल, या भूमीचा वीर पुत्र श्यामजी कृष्ण वर्मा, हे इंग्रजांच्या भूमीवर राहून त्यांच्या नाकावर टिच्चून आयुष्याच्या अखेरच्या श्वासापर्यंत स्वातंत्र्यासाठी संघर्ष करीत राहिले होते. पण त्यांच्या अस्थींना मात्र कधी एकदा भारत मातेच्या कुशीत विसावता येईल याची गेल्या सात दशकांपासून प्रतीक्षाच करावी लागली होती. अखेर, 2003 मध्ये परदेशातून श्यामजी कृष्ण वर्मा यांच्या अस्थी मी माझ्या खांद्यावर उचलून आणल्या. असे कितीतरी स्वातंत्र्य सैनिक आहेत, देशावर आपलं सगळं काही समर्पित करून देणारे लोक आहेत. देशाच्या कानाकोपऱ्यातून कितीतरी दलित, आदिवासी, महिला आणि युवक आहेत, ज्यांनी अखंड तप आणि त्याग केला आहे. जरा स्मरण करा, तामिळनाडूमधील 32 वर्षीय तरूण कोडिकाथ् कुमरन, यांचे स्मरण करा, इंग्रजांनी या तरुणाच्या डोक्यात गोळी मारली होती, परंतु, त्यांनी प्राण सोडताना देखील राष्ट्रध्वज खाली जमिनीवर पडू दिला नाही. तामिळनाडूमध्ये त्यांच्या नावानेच कोडि काथ् शब्द तयार झाला, ज्याचा अर्थ आहे, ध्वजाचे रक्षण करणारा ! वेलू नाचियार या तामिळनाडूच्याच पहिल्या महाराणी होत्या, ज्यांनी इंग्रजांच्या सत्तेविरुद्ध लढा दिला होता.

याच प्रकारे, आपल्या देशाच्या आदिवासी समाजाने आपल्या शौर्य आणि पराक्रमामुळे सातत्याने परकीय सत्तांना आपल्यापुढे झुकविण्याचे कार्य केले होते. झारखंडमध्ये भगवान बिरसा मुंडा, यांनी इंग्रजांना आव्हान दिले होते, तर मुर्मू बांधवांनी संथाल आंदोलनाचे नेतृत्त्व केले होते. ओडिशामध्ये चक्रा बिसोई यांनी युद्ध पुकारले, तर लक्ष्मण नायक यांनी गांधीवादी पद्धतींनी चैतन्य जागविले होते. आंध्र प्रदेशमध्ये मण्यम वीरुडू म्हणजेच जंगलांचा राजा अल्लूरी सीराराम राजू यांनी रम्पा आंदोलनाचे रणशिंग फुंकले होते. पासल्था खुगंचेरा यांनी मिझोरमच्या जंगलात इंग्रजांविरुद्ध लढा दिला होता. असेच, गोमधर कुँवर, लसित बोरफुकन आणि सीरत सिंग यांच्यासारख्या आसाम आणि पूर्वोत्तर राज्यांमधील अनेकजण समर्पण सेनानी होते, ज्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी योगदान दिले आहे. येथे गुजरातमध्ये वडोदराजवळ जांबूघोडा येथे जाण्याच्या मार्गावर आमच्या नायक समाजाच्या आदिवासियांचे बलिदान विसरून कसे चालेल, मानगडमध्ये गोविंद गुरू यांच्या नेतृत्त्वाखाली शेकडो आदिवसींचा नरसंहार करण्यात आला, त्यांनी लढा दिला. यांच्या बलिदानाला देश कायम स्मरणात ठेवेल.

मित्रहो,

भारतमातेच्या अशाच वीर पुत्रांचा इतिहास देशाच्या कानाकोपऱ्यात, गावागावांमध्ये आहे. या इतिहासाच्या सन्मानाचे जतन करण्यासाठी देश गेल्या सहा वर्षांपासून सातत्याने प्रयत्न करीत आहे. प्रत्येक राज्य, प्रत्येक प्रांतात या दिशेने प्रयत्न केले जात आहेत. दांडीयात्रेशी संबंधित स्थळाचा पुनरुद्धार देशाने दोन वर्षांपूर्वीच पूर्ण केला होता. मला स्वतःला यानिमिताने दांडी येथे जाण्याचा बहुमान मिळाला होता. अंदमानमध्ये जेथे नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी देशाचे पहिले स्वतंत्र सरकार स्थापित करून तिरंगा फडकाविला होता, देशाने त्या विस्मृतीत गेलेल्या इतिहासाला देखील भव्य आकार दिला आहे. अंदमान निकोबारच्या द्वीपांना स्वातंत्र्य संग्राम नाव देण्यात आले आहे. आझाद हिंद सेनेची 75 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल लाल किल्ल्यावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आणि नेताजी सुभाष बाबू यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. गुजरातमध्ये सरदार पटेल यांचा जगातील सर्वांत उंच पुतळा त्यांच्या अमर कीर्तीला पूर्ण जगभर पोहोचवित आहे. जालियनवाला बाग येथे स्मारक असो वा पाइका आंदोलनाच्या स्मरणार्थ स्मारक असो, सर्व ठिकाणी सुधारणा काम करण्यात आले आहे. बाबासाहेबांशी जोडलेली जी स्थळे दशकांपासून विस्मृतीत गेली होती, त्यांचाही विकास देशाने पंचतीर्थ या रूपात केला आहे. या सगळ्यांच्या बरोबरच, देशाने आदिवासी स्वातंत्र्य सैनिकांचा इतिहास संपूर्ण देशभरात पोहोचविण्यासाठी, येणाऱ्या पिढ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी आपल्या आदिवासींच्या संघर्षांच्या कथांशी जोडणारे संग्रहालय उभारण्याचा एक प्रयत्न सुरू केला आहे.

|

स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासाप्रमाणेच स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या 75 वर्षांचा प्रवास, हा भारतीयांचे श्रम, संशोधन, उद्यमशीलता यांचे प्रतिबिंब आहे. आपण भारतीय भले देशात राहू किंवा परदेशात, आपण आपल्या कष्टातून स्वतःला सिद्ध केले आहे. आम्हाला आमच्या संविधानाबद्दल आदर आहे. आमच्या लोकशाही परंपरेचा आम्हाला अभिमान आहे. लोकशाहीची जननी असलेला भारत आजही लोकशाहीला बळकटी देत पुढे जात आहे. ज्ञान – विज्ञानाने समृद्ध असलेला भारत, आज मंगळापासून चंद्रापर्यंत आपला ठसा उमटवित आहे. आज भारताच्या सैन्याचे सामर्थ्य अपरंपार आहे, तर आर्थिक रूपाने आपण देखील वेगाने पुढे जात आहोत. आज भारताची स्टार्टअप परिसंस्था, जगभरात आकर्षणाचे केंद्र बनली आहे, चर्चेचा विषय झाली आहे. आज जगभरातल्या प्रत्येक व्यासपीठावर भारताची क्षमता आणि भारताची प्रतिभा निनादत आहे. आज 130 कोटींपेक्षा अधिक आकांक्षांची परिपूर्ती करण्यासाठी भारत कमतरतेच्या छायेतून बाहेर पडू पाहात आहे.

मित्रांनो,

आपल्या सर्वांचे सौभाग्य आहे की, स्वतंत्र भारताचे 75 वे वर्ष आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती वर्षाचे 125 वे वर्ष आपण एकत्रच साजरे करीत आहोत. हा योग केवळ तारखांचा नाही तर भूतकाळ आणि भविष्यातील भारताच्या दूरदृष्टीचा एक अद्भुत मेळ आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी म्हटले होते की भारताच्या स्वातंत्र्याची लढाई केवळ ब्रिटिश साम्राज्यावादाविरुद्ध नसून, ती वैश्विक साम्राज्यवादाविरुद्ध आहे. भारताचे स्वातंत्र्य हे पूर्ण मानवतेसाठी आवश्यक असल्याचे नेताजींनी म्हटले होते. काळाबरोबरच नेताजींचे हे वक्तव्य सिद्ध झाले आहे. भारत स्वतंत्र झाला तेव्हा जगभरात अन्य देशांमध्ये देखील स्वातंत्र्याचा स्वर दुमदुमू लागला आणि फारच कमी वेळात साम्राज्यवादाची व्यापकता कमी झाली. आणि मित्रांनो, आज देखील भारतातील संधी या केवळ आपल्या नाहीत, तर या पूर्ण जगाला प्रकाशित करणारी आहे, संपूर्ण मानवजातीला एक आशेचा किरण निर्माण करणारी आहे. भारताच्या आत्मनिर्भरता संकल्पनेने ओतप्रोत असलेली आपली विकास यात्रा ही पूर्ण जगाच्या विकास यात्रेला गती देणारी आहे.

कोरोना काळात हे आपल्यासमोर प्रत्यक्ष सिद्ध झाले आहे. मानवजातीला महामारीच्या संकटातून बाहेर काढण्यासाठी लस निर्मितीमध्ये भारताच्या आत्मनिर्भरतेचा लाभ आज पूर्ण जगाला होत आहे. आज भारताकडे लसीचे सामर्थ आहे, तर वसुधैव कुटुंबकम अर्थात हे विश्वचि माझे घर या उक्तिनुसार, आपण सगळ्यांवरील संकटे दूर करण्यासाठी त्यांच्या उपयोगी पडत आहोत. आपण कोणालाही दुःख दिले नाही, मात्र, इतरांचे दुःख कमी करण्यासाठी स्वतः कष्ट घेत आहोत. हेच भारताचे आदर्श आहेत, हेच भारताचे शाश्वत दर्शन आहे, हेच आत्मनिर्भर भारताचे देखील तत्वज्ञान आहे. आज जगभरातील देश भारताचे आभार मानत आहेत, भारतावर विश्वास ठेवीत आहेत. हिच नव्या भारताच्या सूर्योदयाची पहिली छटा आहे, हाच आपल्या भव्य भविष्याचा पहिला किरण आहे.

|

मित्रहो,

भगवद् गीतेमध्ये भगवान श्री कृष्णाने म्हटले आहे, `समदुःखसुखम धीरम् सः अमृतत्वाय कल्पते` l म्हणजेच, जो आनंद, दुःख, सांत्वन आणि आव्हाने यांच्यातही धीराने स्थिर राहतो, त्यालाच अमृताची प्राप्ती होते, त्याला अमरत्व मिळते, अर्थात यश मिळते. अमृत महोत्सावातून भारताच्या उज्ज्वल भविष्याचे अमृत मिळविण्यासाठीच्या आपल्या मार्गात हाच मंत्र आपली प्रेरणा आहे. या, आपण सगळे मिळून दृढसंकल्प करू आणि या राष्ट्र यज्ञामध्ये आपली भूमिका निभावू या.

मित्रहो,

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या दरम्यान, देशवासियांनी सुचविल्यानुसार, त्यांच्या बहुमूल्य विचारांमधून असंख्य कल्पना बाहेर येतील. आता मी जेव्हा येत होतो, तेव्हा काही विचार माझ्या मनात येत होते. जन सहभाग, जनसामान्यांना सहभागी करून घेणे, देशाचा कोणीही नागरिक असा राहू नये, की त्याला या अमृत महोत्सवामध्ये सहभागी होता आले नाही. आता असे मानून चलूया की, एक लहानसे उदाहरणे देतो – आता सर्व शाळा, महाविद्यालयांनी, स्वातंत्र्याशी संबंधित 75 घटनांचे संकलन करावे, 75 गट करावेत, त्या घटनांवर 75 विद्यार्थी 75 गटांमध्ये ज्यात आठशे, हजार, दोन हजार विद्यार्थी सहभागी होऊ शकतील, अशा प्रकारे एखादी शाळा असे करू शकेल. आपल्याकडे लहान लहान शिशुमंदिरांमधील बालके असतात, बालमंदिरांमधील मुले असतात, स्वातंत्र्य चळवळीतील 75 महापुरुषांची एक यादी तयार करावी, त्यांची वेशभूषा परिधान करावी, त्यांचे एक एक वाक्य बोलावे, याची स्पर्धा घेता येईल, शाळांमध्ये भारताच्या नकाशावर स्वातंत्र्य चळवळीशी संबंधित 75 स्थळे दाखवावीत, मुलांना विचारावे, की सांगा मुलांनो, बारडोली कोठे आहे ? चंपारण्य कोठे आहे ? विधि महाविद्यालयाने विद्यार्थी – विद्यार्थिनींनी अशा 75 घटना शोधाव्यात आणि मी प्रत्येक महाविद्यालयाकडे आग्रह करेन की, 75 घटना अशा शोधून काढा, की ज्यामध्ये असे समजेल की, स्वातंत्र्य चळवळ जेव्हा सुरू होती तेव्हा कायद्याची लढाई कशी झाली असेल ? कायद्याचे द्वंद्व कसे झाले असेल ? कायद्याची लढाई लढणारी ती माणसे नेमकी कोण होती ? स्वातंत्र्य सैनिकांना वाचविण्यासाठी नेमके कोण-कोणते प्रयत्न केले गेले ? ब्रिटिश राजवटीच्या न्यायव्यवस्थेची प्रवृत्ती नेमकी कशी होती ? या सगळ्या गोष्टी आपण लिहू शकतो. ज्यांना नाटकाची आवड आहे, त्यांनी नाटक लिहावे. ललित कलेच्या विद्यार्थ्यांनी त्या घटनांवर तैलचित्र रेखाटावे, ज्याला कोणाला वाटले, तर त्याने गीत लिहावे, कोणी काव्य लिहावे. हे सगळे प्रारंभी हस्तलिखित असेल. त्यानंतर याला डिजिटल रूप देखील दिले जाईल आणि प्रत्येक शाळा – महाविद्यालयाचे हे प्रयत्न हा त्यांचा वारसा म्हणून ओळखला जावा, असे मला वाटते. आणि प्रयत्न करा, की हे काम याच 15 ऑगस्ट पूर्वी पूर्ण होईल. तुम्ही बघा, पूर्णपणे वैचारिक अधिष्ठान तयार होईल. नंतर याला जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय, देशस्तरावर स्पर्धांचे रूपही देऊन आयोजित करता येईल.

आमचे युवक, विद्वान यांनी ही जबाबदारी घ्यावी की ते आपल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या इतिहासाच्या लिखाणात देशाच्या सुरू असलेल्या प्रयत्नांना पूर्ण रूप देतील. स्वातंत्र्याच्या आंदोलनात आणि त्यानंतर आपल्या समाजातील ज्या काही संधी होत्या, त्यांना जगासमोर प्रकर्षाने आणले पाहिजे. मी कला, साहित्य, नाट्यक्षेत्र, चित्रपट क्षेत्र आणि डिजिटल मनोरंजनाशी संबंधित असलेल्या सर्व लोकांना विनंती करेन की, कितीतरी अद्वितीय कथा आपल्या इतिहासात विखुरलेल्या आहेत, त्यांचा शोध घ्या, त्यांना पुनर्जिवित करा, येणाऱ्या पिढ्यांसाठी त्यांना तयार करा. भूतकाळातील धड्यांमधून भविष्याच्या निर्माणाची जबाबदारी आपल्या युवकांना उचलायची आहे. विज्ञान असो, तंत्रज्ञान असो, वैद्यक असो, राजकारण असो, कला किंवा संस्कृती असो, तुम्ही ज्या कोणत्या क्षेत्रात आहात, आपल्या क्षेत्राचा उद्या येणारा दिवस अधिक चांगला कसा होऊ शकेल, यासाठी प्रयत्न करा.

|

मला खात्री आहे की, 130 कोटी देशवासी स्वातंत्र्याच्या या अमृत महोत्सवाशी जेव्हा जोडले जातील, लाखो स्वातंत्र्य सैनिकांकडून प्रेरणा घेतील, तेव्हा भारत मोठ्यातल्या मोठ्या उद्दिष्टांना पूर्ण करून दाखवेल. जर आपण देशासाठी, समाजासाठी, प्रत्येक भारतीय एक पाऊल चालत असू, तर देश 130 कोटी पावले पुढे जाऊ शकतो. भारत पुन्हा एकदा आत्मनिर्भर बनेल, जगाला नवी दिशा देईल. याच शुभेच्छांसह, आज जे दांडी यात्रेसाठी निघाले आहेत, एक प्रकारे कोणताही गाजावाजा न करता लहान स्वरूपात आज त्याचा प्रारंभ होत आहे. पण भविष्यात पुढे जसजसे दिवस जातील, आपण 15 ऑगस्टच्या समीप येऊन ठेपणार आहोत, हा एक प्रकारे संपूर्ण भारताला आपल्यामध्ये सामावून घेणारा अशा प्रकारचा एक मोठा महोत्सव तयार होईल, याची मला खात्री आहे. देशाच्या प्रगतीचा, देशाला पुढे नेण्याचा प्रत्येक नागरिक संकल्प करेल, प्रत्येक संस्था संकल्प करेल, प्रत्येक संघटना संकल्प करेल. स्वातंत्र्यासाठी लढलेल्यांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा हाच एक मार्ग असेल.

 

|

याच प्रार्थनेसह, याच शुभेच्छांसह मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना खूप – खूप धन्यवाद देतो ! माझ्याबरोबर म्हणा ..

भारत माता की .... जय ! भारत माता की... जय ! भारत माता की... जय ! वंदे.... मातरम ! वंदे... मातरम ! वंदे ... मातरम !

जय हिंद .... जय हिंद ! जय हिंद .... जय हिंद ! जय हिंद .... जय हिंद !

 

Explore More
प्रत्येक भारतीयाचं रक्त तापलं आहेः पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये

लोकप्रिय भाषण

प्रत्येक भारतीयाचं रक्त तापलं आहेः पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये
'2,500 Political Parties In India, I Repeat...': PM Modi’s Remark Stuns Ghana Lawmakers

Media Coverage

'2,500 Political Parties In India, I Repeat...': PM Modi’s Remark Stuns Ghana Lawmakers
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
List of Outcomes: Prime Minister's State Visit to Trinidad & Tobago
July 04, 2025

A) MoUs / Agreement signed:

i. MoU on Indian Pharmacopoeia
ii. Agreement on Indian Grant Assistance for Implementation of Quick Impact Projects (QIPs)
iii. Programme of Cultural Exchanges for the period 2025-2028
iv. MoU on Cooperation in Sports
v. MoU on Co-operation in Diplomatic Training
vi. MoU on the re-establishment of two ICCR Chairs of Hindi and Indian Studies at the University of West Indies (UWI), Trinidad and Tobago.

B) Announcements made by Hon’ble PM:

i. Extension of OCI card facility upto 6th generation of Indian Diaspora members in Trinidad and Tobago (T&T): Earlier, this facility was available upto 4th generation of Indian Diaspora members in T&T
ii. Gifting of 2000 laptops to school students in T&T
iii. Formal handing over of agro-processing machinery (USD 1 million) to NAMDEVCO
iv. Holding of Artificial Limb Fitment Camp (poster-launch) in T&T for 50 days for 800 people
v. Under ‘Heal in India’ program specialized medical treatment will be offered in India
vi. Gift of twenty (20) Hemodialysis Units and two (02) Sea ambulances to T&T to assist in the provision of healthcare
vii. Solarisation of the headquarters of T&T’s Ministry of Foreign and Caricom Affairs by providing rooftop photovoltaic solar panels
viii. Celebration of Geeta Mahotsav at Mahatma Gandhi Institute for Cultural Cooperation in Port of Spain, coinciding with the Geeta Mahotsav celebrations in India
ix. Training of Pandits of T&T and Caribbean region in India

C) Other Outcomes:

T&T announced that it is joining India’s global initiatives: the Coalition of Disaster Resilient Infrastructure (CDRI) and Global Biofuel Alliance (GBA).