QuotePM Modi dedicates Kishanganga Hydropower Station to the Nation, lays foundation stone for Srinagar Ring Road
QuoteTo bring about change in the lives of the people of the state, balanced development of Jammu, Kashmir and Ladakh is very necessary: PM
QuoteJammu and Kashmir has immense potential for tourism sector, we are making efforts to boost tourism in the state: PM Modi
QuoteYouth of Jammu and Kashmir are becoming role models for youngsters across the country: PM
QuoteIn the journey of New India, a New Jammu and Kashmir can be the bright spot: PM Modi
QuoteThere is no alternative to peace and stability. I urge the youth of Jammu and Kashmir to contribute towards welfare and development of the state: PM
QuoteNa Gaali Se, Na Goli Se, Samasya Suljhegi Har Kashmiri Ko Gale Lagane Se: PM Modi
QuoteSolutions to all problems is in development: PM Modi

व्यासपीठावर उपस्थित जम्मू काश्मीरचे राज्यपाल एन.एन.व्होरा जी, मुख्यमंत्री महबुबा मुफ्ती जी, मंत्रिमंडळातील माझे सहकारी नितीन गडकरी जी, डॉक्टर जितेंद्र सिंह जी, आर. के. सिंह जी, जम्मू काश्मीरचे उपमुख्यमंत्री कवींद्र गुप्ता जी, राज्याचे ऊर्जा मंत्री सुनीलकुमार शर्मा जी, विधानसभाचे उपसभापती नजीर अहमद खान जी, खासदार आणि ज्येष्ठ नेते, आदरणीय डॉक्टर फारूख अब्दुल्ला जी, खासदार मुज्जफर हुसैन बेग जी, आणि इथं उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि जम्मू- काश्मीरच्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो.

आज पुन्हा एकदा जम्मू -काश्मीरमध्ये येण्याची आणि आपल्या सर्वांना भेटण्याची संधी मिळाली आहे. आपण जो आपलेपणा दाखवता, आपला जो स्नेह आहे, त्यामुळेच मी आपल्याकडे जणू आकर्षित होतोय. मी या इथं पुन्हा पुन्हा येतोय. गेल्या चार वर्षात माझं येणं झालं नाही, असं एकही वर्ष गेलं नाही, दरवर्षी मी आलोच. ज्यावेळी श्रीनगरमध्ये महापूर आला आणि त्यानंतर जी दिवाळी आली, त्‍यावर्षी मी इथल्या पुरग्रस्तांच्याबरोबर आपली दिवाळी साजरी केली होती. याशिवाय सीमेवर तैनात असलेल्या आपल्या लष्कराच्या जवानांबरोबर दिवाळी सण साजरा करण्याचं भाग्य मला मिळालं आणि आता रमजानचा पवित्र महिना सुरू असताना मी आज तुमच्याबरोबर आहे. हा महिना पैगंबर मोहम्मद साहेबांनी दिलेली शिकवण आणि त्यांचा उपदेश यांच्या स्मरणाचा आहे. त्यांच्या जीवनाकडून मिळत असलेली समानता आणि बंधुभाव यांची शिकवण अतिशय योग्य प्रकारे देशाला आणि संपूर्ण दुनियेला पुढे घेवून जाणार आहे.

रमजानच्या या पवित्र महिन्यामध्ये आज आपण सगळे इथं एका खूप मोठ्या स्वप्नाची पूर्ती करण्यासाठी जमलो आहोत, हा सुद्धा एक खूप चांगला योगायोग आहे. आज मला किशनगंगा जलविद्युत प्रकल्प देशाला समर्पित करण्याचे भाग्य मिळालं आहे. अनेक संकटांना सामोरं जावून, सगळ्या समस्या सोडवल्यानंतर आता हा प्रकल्प जम्मू – काश्मीरच्या विकास यात्रेमध्ये एक नवीन अध्याय जोडण्यासाठी तयार आहे. यानिमित्त मी आपल्या सर्वांचे खूप खूप अभिनंदन करतो. या प्रकल्पामुळे संपूर्ण राज्याला केवळ मोफत नाही तर गरजेइतकी, पुरेशी वीज उपलब्ध होणार आहे. सध्या जम्मू- काश्मीरला जितकी वीज लागते, त्यापैकी खूप मोठा भाग देशाच्या इतर राज्यांकडून घेतला जातो. 330 मेगावॅटच्या या विद्युत प्रकल्पामुळे राज्याची खूप मोठी विजेची समस्या कमी करता येणार आहे.

बंधू आणि भगिनींनो, हा प्रकल्प म्हणजे अभियांत्रिकी क्षेत्राने दाखवलेल्या अजोड कामगिरीचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे. या प्रकल्पाच्या पूर्तीसाठी अनेक लोकांनी खूप तपस्या केली आहे. विशालकाय पर्वताला भेदून किशनगंगाचे पाणी एका बोगद्याच्या माध्यमातून बांदीपोरामधल्या बोनार कालव्यामध्ये पोहोचविण्यात आले आहे. या प्रकल्पाच्या कार्यामध्ये सहभागी झालेला प्रत्येक कामगार, प्रत्येक कर्मचारी, प्रत्येक अभियंता सगळेच्या सगळे विशेष अभिनंदनास पात्र आहेत. आपण दाखवलेल्या धाडसाचा परिणाम म्हणजे, या सर्वात अवघड प्रकल्पाचे काम आम्ही पूर्ण करू शकलो.

आत्ता या व्यासपीठावरून श्रीनगरच्या रिंगरोडचा शिलान्यास करण्याची संधीही मला मिळाली आहे. 42 किलोमीटरच्या या मार्गासाठी 500 कोटी रूपयांपेक्षा जास्त खर्च येणार आहे. या रिंगरोडमुळे श्रीनगर शहरामध्ये होत असलेली वाहतूक कोंडीची समस्या मोठ्या प्रमाणावर सुटणार आहे. आपलं दैनंदिन जीवन अधिक सुलभ,सोईचे होणार आहे.

या बरोबरच जम्मू-काश्मीरच्या लोकांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी काश्मीर, जम्मू आणि लडाख या राज्याच्या तीनही भागांचा समतोल विकास होणे अतिशय आवश्यक आहे. ही गोष्ट लक्षात घेवून अडीच वर्षांपूर्वी 80 हजार कोटी रूपयांचे एक पॅकेज राज्याला देण्याची घोषणा करण्यात आली होती. मला आनंद वाटतो की, इतक्या कमी कालावधीमध्ये जवळपास 63 हजार कोटी रूपयांच्या प्रकल्पांना मान्यता देण्यात आली आहे. आणि या निधीतून 20 हजार कोटी रूपयांपेक्षा जास्त रूपये खर्चही झाले आहेत. या निधीमधून जम्मू काश्मीरमध्ये आय आय टी ची उभारणी करण्याचे काम, आय आय एम स्थापनेचे काम, दोन एम्स सुरू करण्याचे काम, प्राथमिक आरोग्य केंद्रापासून ते जिल्हा रूग्णालयांच्या आधुनिकीकरणापर्यंतची कामे सुरू झाली आहेत.

नवीन राष्ट्रीय महामार्ग, सर्व ऋतुंमध्ये वापरता येणारा रस्ता, नवीन बोगदे, ऊर्जा वितरण संयंत्रे आणि विद्युत पुरवठा तारा, नद्या आणि तलावांचे संरक्षण, शेतकरी वर्गासाठी योजना, शीतगृहांची सुविधा, गोदामे, नवयुवकांसाठी रोजगाराच्या संधी अशा अनेक नवनवीन योजना प्रत्यक्षात येत आहेत. 21व्या शतकामधील जम्मू- काश्मीर हे इथल्या लोकांच्या आशा आकांक्षानुरूप असले पाहिजे, या गोष्टीला प्राधान्य देण्यात येत आहे.

सहकारी मंडळींनो, ज्यावेळी मी पर्वतीय क्षेत्रामध्ये जातो, त्यावेळी एक म्हण मला नेहमीच आठवते. पूर्वी लोक म्हणायचे की, डोंगरी भागातलं तारूण्य आणि डोंगरामधलं पाणी कधीच डोंगराच्या कामी येत नाही. ही म्हण फार पूर्वीची आहे. त्याकाळामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा अजिबात प्रसार झालेला नव्हता. माणूस निसर्गापुढे काहीच नव्हता, त्याचं निसर्गापुढं काही चालत नव्हतं. परंतु आता काळ खूप बदलला आहे. आपल्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे या जुन्या म्हणीला बदलून टाकण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. जम्मू-काश्मीरचे पाणी आणि इथले युवक, दोन्हीही या भूमीसाठी खूप उपयोगी ठरणार आहेत.

जम्मू- काश्मीरमधल्या अनेक नद्यांवर जलविद्युत प्रकल्प उभे करता येवू शकतात. केवळ आपल्याच राज्यापुरती नाही तर देशाच्या इतर भागालाही विद्युत पुरवठा करण्याचं सामर्थ्‍य या राज्यामध्ये आहे. ही गोष्ट लक्षात घेवून आम्ही गेल्या चार वर्षांपासून इथं अनेक प्रकल्पांवर काम सुरू केले आहे. किश्तवाडमध्ये 8000 कोटी रूपयांपेक्षा जास्त खर्चाचा जलविद्युत प्रकल्प उभारण्यात येणार आहे. त्याचेही काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे.

जम्मू- काश्मीरमधल्या प्रत्येक घरामध्ये कोणत्याही अडथळ्याशिवाय विजेचा पुरवठा करण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करीत आहोत. स्मार्ट ग्रिड आणि स्मार्ट मीटर यासारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर इथे करण्यात येत आहे. पथदीपांचे आधुनिकीकरण करण्यात येत आहे. जम्मू -काश्मीरमधल्या प्रत्येक गावांमध्ये आणि प्रत्येक गल्लीमध्ये विद्युत पुरवठा केला जावा, यासाठी वीज वितरण प्रणालीमध्ये सुधारणा करण्यासाठी जवळपास 4 हजार कोटी रूपयांची गुंतवणूक करण्यात येत आहे.

बंधू आणि भगिनींनो, फक्त गावांमध्ये आणि घरांमध्ये विद्युत पुरवठा करण्याचे ध्येय आमचे नाही. तर ज्या घरांमध्ये वीज पुरवठा आधीपासूनच केला जातो, त्यांचा वीज बिलाचा भार हलका करण्यासाठीही आम्ही प्रयत्न करीत आहोत. उजाला योजनेमधून जम्मू-काश्मीरमध्येही 78 लाखांपेक्षा जास्त एलईडी बल्ब वितरित करण्यात आले आहेत. यामुळे इथल्या जनतेचे जे वीज बिल येते, त्यामध्ये दरवर्षी जवळपास 400 कोटी रूपयांपेक्षा जास्त बचत होत आहे. सरकार राज्यातल्या प्रत्येक घरामध्ये वीज पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील आहे. सौभाग्य योजनेमधून जम्मू- काश्मीरमध्ये ज्या घरांमध्ये अद्याप वीज पोहोचली नाही, त्या सर्व घरांना विजेची मोफत जोडणी करून देण्याचे काम सुरू आहे.

बंधू आणि भगिनींनो, गेल्या अनेक दशकांपासून आपण जाणतो की, जम्मू-काश्मीरच्या विकासासाठी सर्वात मोठे आणि महत्वाचे माध्यम आहे ते म्हणजे पर्यटन. कमीत कमी गुंतवणुकीमध्ये सर्वात जास्त रोजगार निर्माण करणारे हे पर्यटन क्षेत्र आहे. हे क्षेत्र म्हणजे जम्मू- काश्मीरचा भाग्यविधाता आहे. परंतु आता पर्यटन व्यवसाय जुन्या पद्धतीने चालवणे योग्य ठरणार नाही. आजच्या पर्यटकाला आजच्या सुविधा हव्या असतात. आजचा पर्यटक एका ठिकाणावरून दुसरीकडे जाण्यासाठी अनेक तास प्रतिक्षा करण्यास कधीच तयार नसतो. त्याला लहान लहान गल्ल्यांमध्ये, वाहतुकीच्या कोंडीमध्ये अडकायचे नसते. त्याला अखंडित वीज पुरवठा हवा असतो. त्याला सगळीकडे स्वच्छता हवी असते. त्याला हवाई सेवा पाहिजे असते.

पर्यटनासाठी आधुनिक कार्यशैलीची आवश्यकता असते. या गोष्टी लक्षात घेवून आमच्या सरकारने अनेक योजना तयार केल्या आहेत. जितकी ही आधुनिक कार्यपद्धती मजबूत असेल, तितकीच जम्मू- काश्मीरमध्ये येणा-या पर्यटकांची संख्या वाढणार आहे. इतकेच नाही तर जम्मू- काश्मीरच्या नवयुवकांना रोजगाराच्या नवनवीन संधीही भरपूर निर्माण होणार आहेत. त्यामुळे आपल्या सगळ्याचे उत्पन्नही वाढणार आहे.

बंधू अणि भगिनींनो, संपूर्ण जगामध्ये अनेक देशांच्या अर्थव्यवस्था संपूर्णपणे पर्यटन क्षेत्रावर अवलंबून आहेत. भारताच्या अर्थव्यवस्थेला गती आणखी वाढवण्याची क्षमता एकट्या जम्मू-काश्मीरच्या पर्यटन क्षेत्रामध्ये आहे. जर मी फक्त पर्यटन क्षेत्राविषयीच आता काही गोष्टी आपल्याला सांगितल्या तर तुम्हाला जम्मू-काश्मीरच्या सामर्थ्याची नक्कीच कल्पना येईल. जवळपास 2हजार कोटी रूपये गुंतवणूक करून 12 विकास प्राधिकरण, 3 पर्यटन परिक्रमा, 50 पर्यटक ग्राम बनवण्याचे कार्य सुरू आहे. परंतु यासाठी मी आधी सांगितल्याप्रमाणे पर्यटनाबरोबरच संपूर्ण कार्यपद्धती अधिक बळकट करण्याची अतिशय आवश्यकता आहे.

या समग्र कार्यपद्धतीमध्ये सर्वात महत्वाचा घटक म्हणजे संपर्क व्यवस्था आहे. हे लक्षात घेवून जम्मू- काश्मीरमध्ये संपर्क यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कामे सुरू आहेत. राज्याला दिलेल्या आर्थिक निधीपैकी जवळपास अर्धा भाग रस्त्यांच्या कामासाठी खर्च करण्यात येत आहे. जम्मू-काश्मीरमध्ये राष्ट्रीय महामार्गांचे जाळेच तयार करण्यात येत आहे.

या कार्यक्रमाला येण्याआधी, मी देशातल्या सर्वात लांब जोजिला बोगद्याच्या कामाचा शुभारंभ केला आहे. हा बोगदा जम्मू- काश्मीरच्या विकासाची नवीन गाथा लिहिणार आहे. आपण विचार करा, संपर्क यंत्रणा चांगली झाली तर किती चांगला परिणाम होणार आहे, हे लक्षात घ्या. शिक्षणासाठी जाण्यासाठी, नातेवाइकांना भेटायला जाण्यासाठी, औषधोपचाराला जाण्यासाठी, व्यापाराला जाण्यासाठी, सामानाची खरेदी-विक्री करण्यासाठी लागणारा वेळ वाचणार आहे. आपल्या अडचणी, समस्या कमी होणार आहेत. रस्त्याअभावी प्रवासाला लागत असलेल्या विलंबामुळे आपल्या राज्यात पिकत असलेली सफरचंद बाजारपेठेत पोहोचण्याआधीच खराब होतात. तुमचा भाजीपाला खराब होतो. याचा तोटा शेतकरी वर्गाला होतो. हे नुकसान टाळण्यासाठी आम्ही मोठ्या प्रमाणावर काम सुरू करू शकणार आहोत.

श्रीनगरमध्ये बनणारा रिंगरोड असो, श्रीनगर-शोपियाँ- काजीगुंड राष्ट्रीय महामार्ग असो, अथवा चेनानी- सुधमहादेव-गोहा रस्ता असो. या रस्त्यांची कामे पूर्ण झाल्यानंतर तुम्हा लोकांचा खूप वेळ वाचणार आहे. त्याचबरोबर फळे, भाजीपाला यांचे नुकसान होणार नाही. राज्याच्या ज्या भागाशी हिमवर्षावामुळे महिनोंमहिने संपर्क साधता येत नाही. तो भागही आता जोडण्यात येत आहे. त्या भागासाठी हेलिकॉप्टरची सुविधा देण्यात येत आहे. आणखी एक माहिती आपल्याला देतो, ती म्हणजे, सरकारच्यावतीने श्रीनगर आणि जम्मू ही शहरे स्मार्ट सिटी म्हणून विकसित करण्यासाठी कामे वेगाने केली जात आहेत. सर्व कामे प्रगतिपथावर आहेत.

शहरांमध्ये पाणी पुरवठा आणि सांडपाणी व्यवस्था चांगली करण्यासाठी अमृत योजनेअंतर्गत जवळपास साड पाचशे कोटी रूपये खर्च करण्यात येत आहेत. ज्यावेळी या सगळ्या आधुनिक सुविधा तयार होतील, आधुनिक रस्ते तयार होतील, त्यावेळी आपले दैनंदिन जीवन खूप चांगले, सोपे, सुकर बनणार आहे. जम्मू- काश्मीरमध्ये असलेल्या निसर्ग सौंदर्यालाही आणखी खूप चांगली झळाळी प्राप्त होणार आहे.

बंधू आणि भगिनींनो, आम्ही ज्यावेळी गावे आणि शहरे स्मार्ट बनवण्याचा विचार बोलून दाखवतो, त्यावेळी स्वच्छता हा त्यामध्ये एक महत्वाचा भाग असतो. जम्मू- काश्मीरच्या जनतेने स्वच्छता मोहिमेमध्ये संपूर्ण शक्तीनिशी सहभागी होवून हे अभियान चांगल्या पद्धतीने पुढे नेले त्याचा मला विशेष आनंद होतो आहे.

अलिकडेच इथल्या एका छोट्या कन्येची ध्वनिचित्रफीत समाज माध्यमांवर पहायला मिळाली. पाच वर्षाची ‘जन्नत’ दल सरोवराच्या स्‍वच्‍छतेची मो‍हीम राबवत आहे. ज्यावेळी देशाचे भविष्य असलेली पिढी इतके पवित्र आणि स्वच्छ विचार करीत असेल, कार्य करत असेल तर मग मला या मोहिमेचा आपणही एक सदस्य आहोत, याचाच जास्त आनंद होतो आहे. बंधू आणि भगिनींनो, असे अनेक लोक आपआपल्या स्तरावर अशाप्रकारे या स्वच्छता मोहिमेमध्ये कार्यरत आहेत.

बंधू आणि भगिनींनो, भीषण महापुराच्या संकटामुळे या भागाचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले, याची मला पूर्ण कल्पना आहे. या महापुरामुळे आपल्या जीवनात खूप उलथापालथ झाली, हे मला चांगलेच माहीत आहे. त्यामुळेच ज्यांचे ज्या ज्या प्रकारे नुकसान झाले आहे, त्याची कोणत्या ना कोणत्या प्रकारे भरपाई करून देण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत. यासाठी राज्य सरकारला आवश्यक ती मदत सातत्याने आमचे सरकार करीत आहे.

बंधू आणि भगिनींनो, आणखी एका अतिशय गंभीर विषयावर पीडीपी आणि भाजपा आघाडी सरकार तसेच केंद्र सरकार संयुक्तपणाने कार्य करीत आहे. हा कार्य विस्थापितांविषयी आहे. जे लोक सीमेपलिकडून होत असलेल्या कारवायांना कंटाळून, त्रासून इथे आले आहेत, ज्यांना स्थानिक समस्यांमुळे आपलं घर सोडण्यास भाग पडले, वेगवेगळ्या स्थानांवर त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी जवळपास साडे तीन हजार कोटी खर्च करण्यात येत आहेत.

बंधू आणि भगिनींनो, आज जम्मू-काश्मीरचे अनेक युवक देशाच्या इतर राज्यांतील नवयुवकांचे ‘रोल मॉडेल’ बनत आहेत. नागरी सेवा परीक्षेमध्ये ज्यावेळी इथल्या नवयुवकांचे नाव दिसते, त्यांच्याशी बोलण्याची मला संधी मिळते, त्यावेळी माझा आनंद व्दिगुणित होत असतो. ज्यावेळी या बांदीपोरा क्षेत्रातल्या एका कन्येने किक बॉक्सिंगमध्ये भारताचे नाव उज्ज्वल केले, त्यावेळी या देशाची छाती गर्वाने फुलून गेली होती, हे मला स्मरणात आहे. तजामुलसारख्या हुशार नवीन पिढीचे आयुष्य असेच बेकार जावू देण्याचं कार्य आपला देश कधीच करणार नाही. याच कारणामुळे केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरच्या क्रीडानिपुणांना अधिक कुशल बनवण्यासाठी राज्य सरकारच्या मदतीने प्रयत्न सुरू केले आहेत. यामधूनच इथे क्रीडा क्षेत्रातल्या पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी संपूर्ण प्रयत्न केले जात आहेत.

बंधू आणि भगिनींनो, जम्मू- काश्मीरच्या नवयुवकांना शिक्षण आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकार गंभीर्याने प्रयत्न करीत आहे. राज्य सरकारच्या मदतीने अनेक नवीन योजना साकार होत आहेत. ‘हिमायत’ योजनेअंतर्गत, इथल्या एक लाख नवयुवकांना प्रशिक्षित करण्याच्या योजनेवर सध्या काम सुरू आहे. 16 हजारांपेक्षा जास्त मुलांना पंतप्रधान विशेष शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळला आहे. या मुलांना देशातल्या दर्जेदार महाविद्यालयांमध्ये आणि विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षण घेण्याची संधी देण्यात आली आहे. वेगवेगळ्या कारणांमुळे मधेच महाविद्यालयीन किंवा शालेय शिक्षण सोडावे लागलेल्या जवळपास 60 हजार विद्यार्थ्‍यांना नोकरी देण्याचा प्रस्ताव आहे.

या राज्यातल्या नवयुवकाला देशाचे आणि प्रदेशाच्या नागरिकांच्या सुरक्षेचे काम मिळावे यासाठीही नवीन संधी निर्माण करण्यात येत आहेत. जम्मू- काश्मीर पोलिस विभाग सशक्त करण्यासाठी 5 इंडियन रिझर्व्‍ह बटालियन स्वीकृत करण्यात आली आहे. या बटालियनची भर्ती प्रक्रिया आता शेवटच्या टप्प्यात असल्याची माहिती मला देण्यात आली आहे. या प्रक्रियेच्या पूर्ततेनंतर 5 हजार युवकांना सुरक्षा क्षेत्रामध्ये रोजगाराची संधी मिळणार आहे.

बंधू आणि भगिनींनो, आमच्या सरकारसाठी नागरिकांची आणि राष्ट्राची सुरक्षा यांना सर्वात जास्त प्राधान्य आहे. ही जबाबदारी पार पाडण्यासाठी आमचे सुरक्षा सैनिक अखंड कार्यरत आहेत. इथं जम्मू-काश्मीरचे पोलीस असतील, निमलष्करी दलाचे जवान असतील किंवा लष्कराचे जवान असतील, आपण सगळेच जण अतिशय कठीण परिस्थितीमध्येही खूप चांगले काम करीत आहात, हे मला सांगायचे आहे. आपल्या सगळ्यामध्ये जो समतोल साधला जातो, आपण ज्या पद्धतीने समन्वय साधून कार्य करता, त्यासाठी तुम्हा सर्वांचे खूप खूप अभिनंदन. महापूर असो अथवा हिमवर्षाव असो किंवा आगीसारखी आपत्ती असो. संकटामध्ये सापडलेल्या प्रत्येक जम्मू- काश्मीरवासीयाला वाचवण्यासाठी सुरक्षा जवान देत असलेले योगदान अतुलनीय आहे. इथल्या जनतेसाठी हे जवान जे काही करत आहेत, जे कष्ट झेलत आहेत, त्याची प्रत्येक छबी देशाच्या जनतेच्या मनावर, मेंदूवर अमिट ठसा उमटवते.

बंधू आणि भगिनींनो, देशाचे सव्वाशे कोटी लोक आज नव भारताचा संकल्प करून कार्य करीत आहेत. जम्मू-काश्मीर या नव भारतामध्ये सर्वात जास्त चमचमणारा तारा बनू शकतो. देशातील सर्वात चांगल्या शिक्षण संस्था, सर्वात चांगली रूग्णालये, सर्वात चांगले रस्ते, सर्वात आधुनिक विमानतळ जम्मू-काश्मीर मध्ये नसावे, यामागे कोणतेही कारण नाही. हे सगळे काही सर्वात चांगले या राज्यातही असलेच पाहिजे. जम्मू-काश्मीरातील विद्यार्थी चांगले डॉक्टर बनले पाहिजेत, चांगले अभियंते, चांगले प्राध्यापक आणि चांगले अधिकारीही बनले पाहिजेत. हे न बनण्यामागे कोणतेही कारण नाही.

बंधू आणि भगिनींनो, अनेक शक्तींना जम्मू- काश्मीरचा विकास व्हावा, असे वाटतच नाही. इथल्या लोकांचे जीवन चांगले असावे, त्यांनी आनंदी, सुखात नांदावे, असं या शक्तींना अजिबात वाटत नाही. तरीही आपल्याला या शक्तीशी दोन हात करीत, त्यांना सडेतोड उत्तर देत पुढे जायचे आहे, प्रगती करायची आहे.

इथे मेहबुबा मुफ्ती जी यांच्या नेतृत्वाखाली असलेले पीडीपी आणि भाजपा युती सरकार तसेच केंद्रातले एनडीए सरकार नवयुवकांना मुख्यप्रवाहामध्ये आणण्याचा प्रयत्न सातत्याने करीत आहे. जे युवक विदेशी दुष्प्रचारामुळे प्रभावित होवून आपल्या पवित्र भूमीवर प्रहार करीत आहेत, त्यांना सन्मार्ग दाखवण्‍याचे काम हे सरकार करीत आहे.

बंधू आणि भगिनींनो, शांती आणि स्थायित्व याला दुसरा कोणताही पर्याय असू शकत नाही. वाट चुकलेल्या नवयुवकांना माझा आग्रह आहे की, त्यांनी पुन्हा मुख्य प्रवाहामध्ये यावं. त्यांचे कुटुंब आहे, त्यांचे माता-पिता आहेत. जम्मू-काश्मीरच्या विकास कार्यामध्ये या युवकांनी आपलं सक्रिय योगदान द्यावं. या युवापिढीवरच जम्मू- काश्मीरचा गौरव वाढविण्याची जबाबदारी आहे. जम्मू-काश्मीरला निसर्गाचे वरदान मिळाले आहे. मोठ्या प्रमाणात साधनं इथं उपलब्ध आहेत. भरपूर स्त्रोत आहेत. प्रचंड सामर्थ्‍य या राज्यामध्ये आहे. त्यामुळे भारतातल्या इतर कोणत्याही राज्यापेक्षा जम्मू-काश्मीर कोणत्याही दृष्टीने कणभरही मागे असण्याचे कोणतेच कारण नाही. वाट चुकलेल्या नवयुवकांनी उचललेला प्रत्येक दगड, हाती घेतलेले प्रत्येक हत्यार त्यांच्या स्वतःच्या जम्मू-काश्मीरला अस्थिर करते.

राज्याला आता या अशा अस्थिरतेच्या वातावरणातून बाहेर पडावंच लागेल. चांगल्या भविष्यासाठी, आपल्या येणाऱ्‍या पिढ्यांसाठी त्यांना फक्त कश्मीरच नाही तर भारताच्या विकासाच्या मुख्य प्रवाहामध्ये सहभागी झाले पाहिजे. हजारो वर्षांपासून आपण सर्वजण एकाच भारत मातेचे अपत्य आहोत. दोन भावांना एकमेकांपासून वेगळे करण्याची ताकद संपूर्ण विश्वामध्ये कोणाकडेच असू शकत नाही. मातेच्या दुधामध्ये कधीच वेगळेपण निर्माण होत नसते. जे लोक अनेक दशकांपासून असा प्रयत्न करीत आहेत, तेच आता स्वतः विखुरण्याच्या स्थितीत आले आहेत.

बंधू आणि भगिनींनो, मी पुन्हा एकदा आपल्याला सांगू इच्छितो की, गेल्या वर्षी मी दिवाळी लष्करातील जवानांबरोबर साजरी केली होती. तर यावर्षी रमजानच्या काळात मी आज पुन्हा आपल्याबरोबर आहे. हीच तर खरी काश्मीरची भावना आहे. हेच या भूमीचं आणि दुनियेचं देणं आहे. या भूमीमध्ये सर्वांचं स्वागत आहे. इथं सर्वांचा सत्कार केला जातो. ही इथली परंपरा आहे. अशी परंपरा संपूर्ण जगामध्ये कुठंही पहायला मिळत नाही. या भूमीचं पंथ आणि संप्रदाय यांच्यापेक्षा चांगल्या परंपरेने उत्तम सिंचन केलं आहे. आणि म्हणूनच काश्मीरींविषयी अटलजीही अगदी भारावून जात असत. आणि आता याच काश्मीरींविषयी या मोदीलाही खूप जिव्हाळा वाटतोय.

मी तर लाल किल्ल्यावरून म्हणालो होतो की,

‘गोळीने कोणतीही समस्या सुटणार नाही, तर प्रत्येक काश्मीरीशी गळाभेट केली तरच समस्या सुटणार आहे.’

जम्मू- काश्मीरच्या विकासासाठी राज्य आणि केंद्राकडे निश्चित असे धोरण, कार्यक्रम आहे. तो राबवण्याची चांगली इच्छाही आहे. आणि निर्णय घेताना, आम्ही कधीच मागे हटत नाही. विद्यार्थ्यांवर असलेले हजारो खटले परत घेण्याची प्रक्रिया असो अथवा आत्ता या रमजानच्या पवित्र महिन्यात ‘शस्त्रबंदी करण्याचा निर्णय असो. त्यामागे एक ठोस विचार आहे की, काश्मीरच्या प्रत्येक नवयुवकाला, इथल्या प्रत्येक व्यक्तीला स्थायित्व मिळावे, स्थिरता मिळावी आणि राज्याचा चांगला विकास व्हावा.

बंधू आणि भगिनींनो, ही केवळ शस्त्रबंदी नाही. तर इस्लामच्या आडून दहशतवादाचा प्रसार करत असलेल्यांना उघड करण्याचे एक माध्यमही आहे. मला असं वाटतं की, जम्मू-काश्मीरचे लोक ही गोष्ट पाहत आहेत. त्यांच्या सर्वकाही लक्षात येत आहे. त्यांना कशा पद्धतीने भ्रमामध्ये ठेवण्याचा प्रयत्न केला जातो, हेही आता त्यांना चांगले समजले आहे. स्थायित्वाची ही प्रक्रिया अशीच सुरू रहावी आणि पुढे जावी यासाठी सरकारने एक प्रतिनिधीही नियुक्त केला आहे. तो प्रतिनिधी जनतेने निवडलेल्या प्रतिनिधींशी चर्चा करतो. त्याचबरोबर वेगवेगळ्या संघटना, संस्था यांनाही भेटी देतो. आणि मला असे वाटते की, ज्यांना कुणाला आपलं काही म्हणणं सांगावं असं वाटत असेल तर त्यांनी सरळ या प्रतिनिधीला जावून भेटावं. त्याच्याशी बोलावं. शांती प्रक्रिया अधिक बळकट करण्यासाठी जे अविरत प्रयत्न करीत आहेत, त्यांच्याशी प्रत्येक व्यक्तीने बोलावं, चर्चा करावी.

बंधू आणि भगिनींनो, सरकार आपल्या पद्धतीने सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. त्यामध्ये कोणतीही कमतरता ठेवली जात नाही. परंतु ‘काश्मीरीयत आणि जम्हुरियत’ यांची युती कायम राखण्यासाठी आपल्यासारख्या सर्व लोकांना त्याचबरोबर जम्मू- काश्मीरच्या सर्व नागरिकंना मी आवाहन करतो की, इथं शांतता नांदावी याची जबाबदारी आपल्या सर्वांचीच आहे. इथल्या प्रत्येक माता-पित्याची आहे. इथल्या युवकांची आहे. बुद्धिजीविंची आहे आणि धर्मगुरूंची यामध्ये सर्वात मोठी जबाबदारी, महत्वाची भूमिका आहे.

माझी अशी इच्छा आहे की, आपण, तुम्ही-आम्ही सर्वजण मिळून आपली संपूर्ण शक्ती फक्त आणि फक्त जम्मू-काश्मीरच्या विकासासाठी खर्च करू या. सर्व समस्या, सगळे विवाद, सर्व मतभेद या सर्वांवर एक आणि केवळ एकच तोडगा आहे, तो म्हणजे- विकास, विकास आणि फक्त विकासच!

नव भारताच्या जोडीनेच नवीन जम्मू-काश्मीर, शांत आणि समृद्ध बदलत्या भारताची विकास गाथा आणखी मजबूत करणार आहे. आणि हा माझा पूर्ण विश्वास आहे. या विश्वासाच्या जोरावरच तुम्हा लोकांमध्ये मी माझ्या भावना अगदी मोकळेपणाने व्यक्त केल्या आहेत. आपल्या मनातल्या गोष्टी मोकळेपणाने तुम्हाला सांगितल्या आहेत. आणि मी दुनियेतल्या लोकांनाही सांगू इच्छितो की, संपूर्ण दुनियेत जावून तुम्ही पाहून या, जे कोणी अशा दहशतवादाच्या मार्गाने गेले आहेत त्यांना आता खूप पश्चाताप होतो आहे. सगळेच त्या भीषण मार्गावरून माघारी येत आहेत. सगळेचजण आता परतण्याचा मार्ग शोधत आहेत. आणि म्हणूनच शांती- स्वस्थतेचे आयुष्य, बंधुभावाचे जीवन, शांती आणि समृद्धीचे आयुष्य, सुख-स्वस्थतेचे जीवन जगणे चांगलेच आहे. हाच वारसा, हीच परंपरा आपल्याला पुढे घेवून जायचे आहे. आणि म्हणूनच केंद्र सरकारच्या वतीने यासाठी मदत देताना कोणतीही कमतरता ठेवण्यात येणार नाही. ज्याठिकाणी आवश्यकता आहे, तिथं आम्ही तुमच्या बरोबरीने वाटचाल करायला सिद्ध आहोत. आम्ही ज्या मार्गाने वाटचाल करीत आहोत, तो यशाचा, प्रगतीचा, विकासाचा मार्ग आहे. आम्ही आमचे ध्येय गाठणार हे तर निश्चित आहेच. आता तुम्हीही आमच्या सहकार्याने वाटचाल सुरू करायची आहे. आपण सहकार्य केलेत तर त्यात सर्वांचेच भले होणार आहे.आाणि म्हणूनच आज पुन्हा एकदा आमचे हे काश्मीर, हे जम्मू, लेह-लडाख, हा संपूर्ण प्रदेश म्हणजे हिंदुस्तानींसाठी एक मुकुटमणीच्या रूपात आहे. त्याची गळाभेट करण्याची, त्याला प्रेमाने भेटण्याची प्रत्येकाला संधी मिळाली पाहिजे.

या भावनेबरोबरच सर्वांचे खूप खूप आभार !

सेठा सेठा शुक्रिया, अज़ दीयू इज़ाजत, खुदाई थई नव खोशत खुशहाल.

धन्यवाद.

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
Insurance sector sees record deals worth over Rs 38,000 crore in two weeks

Media Coverage

Insurance sector sees record deals worth over Rs 38,000 crore in two weeks
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
PM speaks with HM King Philippe of Belgium
March 27, 2025

The Prime Minister Shri Narendra Modi spoke with HM King Philippe of Belgium today. Shri Modi appreciated the recent Belgian Economic Mission to India led by HRH Princess Astrid. Both leaders discussed deepening the strong bilateral ties, boosting trade & investment, and advancing collaboration in innovation & sustainability.

In a post on X, he said:

“It was a pleasure to speak with HM King Philippe of Belgium. Appreciated the recent Belgian Economic Mission to India led by HRH Princess Astrid. We discussed deepening our strong bilateral ties, boosting trade & investment, and advancing collaboration in innovation & sustainability.

@MonarchieBe”