QuoteOnce the people of India decide to do something, nothing is impossible: PM Modi
QuoteBanks were nationalised but that did not give the poor access to these banks. We changed that through Jan Dhan Yojana: PM
QuoteAll round and inclusive development is essential. Even in the states with strong development indicators there would be areas which would need greater push for development: PM
QuoteServing in less developed districts may not be glamorous but it will give an important platform to make a positive difference: PM Modi

मित्रांनो, ही 2018 ची सुरुवात आहे. मी तुम्हा सर्वाना खूप खूप शुभेच्छा देतो. या सभागृहात देखील हा पहिलाच अधिकृत कार्यक्रम होत आहे. 7 डिसेंबर रोजी याचे लोकार्पण केले होते, मात्र अधिकृत कार्यक्रम आज प्रथमच होत आहे. ज्या महापुरुषांच्या नावाशी ही इमारत जोडलेली आहे आणि ज्यांच्या चिंतनावर जागतिक स्तरावर चिंतन होणे अपेक्षित आहे, त्या इमारतीत हा कार्यक्रम होत आहे याचा मला आनंद आहे. म्हणूनच या कार्यक्रमाचे महत्व आणखी वाढते कारण बाबासाहेब आयुष्यभर सामाजिक न्यायाची लढाई लढत राहिले.

आपल्या संविधानातही या अपेक्षांच्या पूर्ततेसाठी एका आराखड्याची तरतूद आहे. आता सामाजिक न्याय केवळ एका सामाजिक व्यवस्थेपुरता मर्यादित नाही. एखादा प्रदेश मागासलेला राहणे हे देखील अन्यायाचे कारण आहे. एखादे गाव मागे राहते किंवा एखादी संस्था मागे राहते असे नाही, तर तिथे राहणाऱ्या लोकांवरही हा अन्याय आहे, कारण त्यांना सुविधा, अधिकार, संधी आणि अशा प्रत्येक बाबतीत तडजोड करावी लागत आहे. आणि म्हणूनच, 115 जिल्हे, त्यांचा विकास, बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक न्यायाच्या कटिबध्दतेच्या एक योजनाबद्ध तोडगा काढण्याच्या प्रयत्नांचा एक भाग बनेल. आणि त्या दृष्टीने या इमारतीत होणारा हा पहिला कार्यक्रम आणि या विषयावरील कार्यक्रम एक शुभ संकेत आहे असे मला वाटते.

तुम्ही गेले दोन दिवस विचार विनिमय करत आहात. माझ्या अनुभवाच्या आधारे मी सांगू शकतो की जर आपण एखादी गोष्ट करण्याचा निर्धार केला तर आपल्या देशात अशक्य काही नाही. बँकांचे राष्ट्रीयीकरण होऊनही अद्याप 30 कोटी लोक या व्यवस्थेपासून वंचित होते. मात्र या देशाने एकदा निर्धार केला की जे झाले ते इतिहासजमा झाले , मात्र आता हे असे चालणार नाही आणि जन-धन खाती उघडणे ही एक लोकचळवळ बनली, जेणेकरून देशातील दुर्गम भागातील व्यक्तीलाही आपण अर्थव्यवस्थेच्या मुख्य प्रवाहातील एक भाग बनलो आहोत असे वाटेल. आणि या देशाने, या सरकारने आणि या बँकांच्या लोकांनी हे सिद्ध करून दाखवले आणि तेही निर्धारित वेळेत करून दाखवले.

आपण नेहमी म्हणायचो की शौचालये हवीत, कार्यक्रमांची अंमलबजावणी झाली ,तरतूद झाली ,अहवाल बनले आणि प्रगती झाली. जर तुम्ही म्हणाला असतात की काल इतके होते, आज इतके झाले, तर समाधान वाटायचे की पूर्वी आपण 5 पावले पुढे जायचो, आता आपण वर्षभरात सहा पावले पुढे जातो, आपण सहजगत्या सोपे मार्ग शोधण्याचे प्रयत्न करतो मात्र समस्येचे मूळ कारण व्यवस्थेला हानी पोहचवत असते. शाळांमध्ये मुलींची संख्या कमी का होत आहे, तर शौचालये नाहीत म्हणून, स्वच्छतेची समस्या आहे कारण शौचालये नाहीत. मात्र एकदा ठरवले की या समस्येतून बाहेर यायचे, सर्वाना जाणीव करून द्यायची आणि पूर्वीपेक्षा अधिक जोमाने काम करायचे आणि याच चमूने , याच व्यवस्थेने 4 लाखांहून अधिक शाळांमध्ये शौचालये बांधण्याचे काम पूर्ण केले आणि त्याची प्रत्यक्ष पाहणी देखील झाली. प्रत्येकाने त्याची छायाचित्रे अपलोड केली आणि कुणीही ती पाहू शकतात. याच देशाने, याच देशाच्या या सरकारी व्यवस्थेने हे करून दाखवले.

18 हजार गावांमध्ये एक हजार दिवसात वीज पोहचवायची आहे. साधारणपणे चौकशी केली तर अधिकाऱ्यांकडून उत्तर येते साहेब, एवढे काम करायचे आहे तर 5-7 वर्षे तरी लागतील. मात्र जेव्हा हे आव्हान म्हणून त्यांच्या समोर आले की 1000 दिवसात 18 हजार गावांमध्ये जायचे आहे, वीज पोहचवायची आहे, हीच व्यवस्था, योग्य नियम, हीच फाईल, हीच परंपरा, हेच तंत्रज्ञान, याच पद्धती, याच टीमने 18 हजार गावांमध्ये निर्धारित मुदतीत वीज पोहचवण्याचे काम यशस्वीपणे पूर्ण केले.

मृदा परीक्षण नवीन विषय होता. शेतकऱ्याला हे माहित नव्हते. त्याला हे देखील माहित नव्हते की याचे काही फायदे होऊ शकतात. मात्र एकदा सांगितले की मृदा परीक्षण करायचे आहे, मृदा आरोग्य कार्ड बनवायचे आहे, त्याचे विश्लेषण करायचे आहे. हीच व्यवस्था, हीच टीम, हेच लोक यांनी मनात निर्धार केला. बहुधा जे उद्दिष्ट ठरवले होते, त्याआधी पूर्ण करतील असे मला अहवाल सांगतो.

|

मी या गोष्टीची उदाहरणे अशासाठी देत आहे की आपण अपार क्षमतेचे धनी आहोत. आपण अपार शक्यतांच्या युगात या व्यवस्थेचे नेतृत्व करत आहोत, आणि आपण अपार संधींचे जन्मदाता बनून अप्रतिम सिद्धीचे जन्मदाता देखील बनू शकतो. हे मी स्वतः तुम्हा सर्वांमध्ये राहून अनुभवतो आहे, शिकत आहे आणि माझा विश्वास अधिक मजबूत होत चालला आहे. आणि त्यातूनच हा विचार आला, आपण या साचलेल्या गोष्टींची चिंता करतो, आणि कधी-कधी वाटते की हे पूर्ण होईल. व्यवसाय सुलभतेत भारत इतका मागे आहे हे ऐकून , हे वाचून कुठल्याही सरकारला दुःख झाले नसेल असे मला वाटत नाही. प्रत्येकाला वाईट वाटले असेल. प्रत्येकाने विचार केला असेल की हे किती काळ चालेल ? जगाच्या दृष्टीने आपण किती दिवस मागे राहणार? आज जागतिक दृष्ट्या आपण भारताचे स्थान त्याच पातळीवर आणायचे आहे , दुसरा मार्ग नाही . तेव्हा कुठे जगात जे वातावरण तयार झाले आहे, भारताप्रति जे आकर्षण निर्माण झाले आहे, ते आकर्षण भारताच्या लाभात परिवर्तित होऊ शकेल, संधींमध्ये बदलू शकेल.

आणि त्याच विश्वासाने व्यवसाय सुलभतेमध्ये काय त्रुटी आहेत त्या शोधल्या आहेत. काय मार्ग निघू शकतात, छोटीशी कार्यशाळा घेतली. योजनाबद्ध एक पाऊल , दुसरे पाऊल, तिसरे पाऊल. सर्व मुख्यमंत्र्यांना बोलावले, त्यांना जाणीव करून दिली. सर्व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना बोलावले, त्यांना जाणीव करून दिली. विभागाने या समस्येतून बाहेर पडण्यासाठी मार्ग सुचवले. खूप अभ्यास केला आणि मग त्याची अंमलबजावणी केली. आणि त्याचा परिणाम असा झाला की जगात कुठल्याही देशाला एका वर्षात एवढी मोठी झेप घेण्याची संधी मिळाली नाही , जी आपल्याला मिळाली, भारताला मिळाली आणि आपण 2014 मध्ये 142 क्रमांकावरून प्रवासाला सुरुवात केली होती, 2017 मध्ये 1०० वर पोहोचलो. 42 अंक वर येणे , हे कोणी केले? कुठल्या वृत्तपत्राच्या संपादकीयमुळे झालेले नाही, कुठल्यातरी टीव्हीवर नेत्याचे छायाचित्र दाखवले होते म्हणून झालेले नाही, कुठल्यातरी नेत्याने खूप चांगले भाषण केले म्हणून झालेलं नाही. हे झाले आहे तुमच्या प्रयत्नांमुळे, तुमच्या पुरुषार्थामुळे, तुमच्या मेहनतीमुळे तुमच्या समर्पणामुळे, तुम्ही म्हणजे माझ्या देशाची एक टीम. आणि याचमुळे एक विश्वास दृढ होतो की आपण जर समस्येच्या मुळाशी गेलो तर मार्ग शोधता येतात. आणि ही गोष्ट खरी आहे की आपल्यावर लादण्यात आलेल्या गोष्टी जिवंत राहतात, मात्र त्यात आत्मा नसतो. आणि त्यात आत्मा नसेल तर त्याची काही ओळख निर्माण होत नाही आणि त्यातून काही साध्य होत नाही.

इथे निर्णय घेणारे सर्व लोक इथूनच आलेले आहेत, जिथे तुम्ही आहात, मात्र त्यामध्ये 15-20 वर्षे , 25 वर्षांचा काळ लोटला आहे. आणि आता तर जग खूप बदलले आहे. आज महत्वाकांक्षा बदलल्या आहेत, विचार बदलले आहेत, व्यवस्था बदलल्या आहेत. त्या तुम्हाला चांगल्याच ठाऊक आहेत, कारण तुम्ही त्या परिस्थितीतून जात आहात , गोंधळले आहात, काय करू? जी स्वप्ने घेऊन मसुरीला गेलो होतो, ती स्वप्ने मी या वेळी पूर्ण करू शकेन का? आणि नंतर बहुधा 5-7 वर्षांनी अशा जबाबदाऱ्या बदलतील, ज्या निभावण्याची ताकद बहुधा असणार नाही.

आज ही सर्वात मोठी संधी आहे, तुम्हाला काय वाटते? तुमचा अनुभव काय सांगतो? मार्गदर्शक आराखडा बनवताना तुमचा स्वतःचा अनुभव, त्याला कसे प्राधान्य द्याल? आणि तुमचे जे सादरीकरण मी पाहिले आहे त्यात मला या गोष्टी दिसत आहेत. मला जाणवतंय की हो, याला उत्तम समज आहे, बाकी सगळे ठीक आहे, तरतूद आहे,अमुक आहे, तमुक आहे, मात्र समस्येचे मूळ इथे आहे. या समस्येवर तोडगा काढला तर मार्ग निघेल.

आज मी पाहत होतो, तुमच्या सादरीकरणात विचारांची स्पष्टता ज्याला म्हणतात , ती मला जाणवत होती. मला तुमच्या सादरीकरणात विश्वास जाणवत होता, तुम्ही ज्या ठामपणे बोलत होतात, त्यात मला तुमचा अपार आत्मविश्वास दिसला. मी स्लाईड देखील पाहत होतो आणि बाजूला उभे असलेले लोक देखील पाहत होतो. प्रत्येकाच्या नजरेत चमक मला दिसत होती. मला त्यात नवीन भारत दिसत होता.

आणि म्हणूनच, ही जी सामूहिकतेची भावना आहे, ती प्रत्येकाच्या प्रयत्नाने पुढे नेता येईल. वेळेपूर्वी सोपी काम पूर्ण करणे हा मनुष्याचा स्वभाव आहे. मी सार्वजनिक जीवनात काम केलेले आहे. माझ्या संघटनेत मी माझ्या आयुष्याचा खूप काळ व्यतीत केला आहे.

आम्ही जेव्हा शाळेत शिकत होतो, आम्हाला शिक्षक देखील सांगायचे की परीक्षेत जेव्हा तीन तासांचा पेपर सोडवायचा असतो तेव्हा सोपे प्रश्न अगोदर सोडवा, नंतर कठीण प्रश्न सोडवा. आणि म्हणूनच आपला विकास देखील असाच झाला आहे, सोप्या गोष्टींपासून सुरुवात करा सोप्या गोष्टी करता करता आपण आव्हानात्मक गोष्टींपर्यंत कधी पोहोचतच नाही. आणि तिथेच तर आपण मार खातो. आणि म्हणूनच सर्वजण सरळ सोप्या जगात राहतात. गरज आहे, आणि कधी-कधी विभागालाही वाटते, इथे जे मोठे-मोठे अधिकारी बसले आहेत, की कृषी क्षेत्रात देशभरात हे साध्य करायचे आहे, एमएसएमई मध्ये हे साध्य करायचे आहे, औद्योगिक क्षेत्रात हे साध्य करायचे आहे , तर चला, कोण करू शकते, त्यांच्या जरा मागे लागा., ते करतील. तर त्यांची सरासरी उत्तम निघते. मग आपले धोरण काय असते, जे करतात त्यांच्यावर बोजा टाकत रहा, त्यांच्याकडून करून घ्या. आपली जी राष्ट्रीय स्तरावरची उद्दिष्टे आहेत ,आकडे आहेत, ते कायम ठेवा.

मुख्यमंत्री होतो, मला पहिल्यांदा सुरुवातीला लाभ मिळत नव्हते. योजना आयोग असायचा, त्यामुळे आमचा क्रमांक अगदी शेवटी असायचा. परंतु मी हे तंत्र आत्मसात केले होते, त्यामुळे मी जानेवारीपासून खर्च न झालेला निधी, खर्च करण्यासंबंधी समस्या यावर लक्ष केंद्रीत करुन त्या शोधून काढायचो. बरोबर लक्ष ठेवायचो की कोणत्या दिवशी तरतूद केलेला निधी खर्च झाला नाही, त्यांना खर्च करण्याची कुठे समस्या आहे, ते मी शोधून काढायचो कोण कोण खर्च करण्याच्या बाबतीत चिंताग्रस्त आहे. मग मी अधिकाऱ्यांना पाठवायचो की जरा बघा, इथे-इथे जागा रिकाम्या आहेत. मी पाहायचो जे मला सुरुवातीला मिळत नव्हते, ते शेवटी खूप मोठ्या प्रमाणात मिळायचे. कारण कामगिरी करणाऱ्यांना जिथे जिथे सुशासन आहे तिथेच चांगले काम करण्याची सवय असते.

माझ्या मते चाकोरीबद्ध विचारातून बाहेर यायला हवे. चहा गोड असेल, दोन चमचे साखर आणखी टाकली, जास्त फरक पडणार नाही. साखरेचा वापर झाला, झाला, हिशोब बरोबर. ज्या चहामध्ये साखर नाही, जर तिथे पोहोचली तर त्यांची सकाळ देखील खूप गोड होऊ शकेल.

आणि म्हणूनच ह्या ज्या 150 जिल्ह्यांवर लक्ष केंद्रित केले आहे, त्यात हा देखील प्रयत्न आहे किकी प्रत्येक राज्यातील किमान एक जिल्हा तरी किमान असेल. कितीही प्रगत राज्य असो, अतिशय विकसित राज्य असेल, तिथंही कोणता ना कोणता जिल्हा मागे राहतो. आणि मग तो मानसिक दृष्ट्या इतका मागे राहतो की एखाद्या अधिकाऱ्याची जर तिथे नेमणूक झाली, अच्छा तुला इथेच मिळाले, हा जिल्हा, बास तिथूनच त्याचा बिचाऱ्याचा मेंदू काम करेनासा होतो. त्याची मानसिक स्थिती तशीच तयार होते. तशा जिल्ह्याला कधी संधी मिळतच नाही. अधिकारीही जातील, नाराज होऊन जातील. शिक्षक देखील असेल तरी थांबायचे नाहीत, परत येतील. सरकार देखील काही बोलणार नाही, इथे कुणी नाही, चला नाममात्र आहे कुणी. याच्यावर काय कारवाई करणार, कुठे कारवाई करणार? त्यामुळे एक प्रकारचे मानसशास्त्र बनते की तुम्ही चला, वेळ काढा. आणि त्यामुळे ते तिथेच राहतात.

दुसरे, जे विकासाचे शास्त्र जाणतात, हे बरे वाटते की तो विकसित होत आहे, पुढे जात आहे. मात्र काही ठराविक मुदतीनंतर जो विकसित झालेला नाही, त्याचा निधी कमी करण्याचा प्रयत्न होतो. आणि तेव्हा परिस्थिती सांभाळण्यासाठी व्यवस्थेची पाच-पाच, सात-सात वर्षे निघून जातात. असा अस्वीकारार्ह टप्पा कधीही येऊ देता कामा नये की जिथे मागे राहणारे इतके मागे राहतील कि पुढे जाणाऱ्यांना मागे आणण्याच्या कामातच त्यांची ताकद खर्च होईल आणि बरोबरी होऊ शकणार नाही. मग ते राज्य पुन्हा वर येऊ शकत नाही.

ही परिस्थिती बदलण्याची पद्धत ही होती कि आपण समस्यांपासून थोडा दिलासा देऊ शकतो का? आता तुम्ही अनेक रणनीती बनवल्या आहेत. प्रत्येक जिल्ह्याची समस्या सारखी नाही. भारत विविधतेने नटलेला देश आहे. प्रत्येकाच्या स्वतःच्या निरनिराळया समस्या आहेत. प्रत्येकाच्या स्वतःच्या संधी देखील आहेत. मात्र जिथे आपण हे पाच किंवा सहा निकष घेतले तर जे कमी फलदायी आहेत त्यावर सर्वांचे लक्ष केंद्रित करून एकदा ते साध्य करता येऊ शकेल का?

हे यासाठी आवश्यक आहे, कमी अधिक प्रमाणात या क्षेत्रात काम करताना तुम्हालाही अनुभव येत असतील. तुम्ही कितीही उत्साही का असेना, कितीही कटिबद्ध असाल, कितीही समर्पित असाल, मात्र तुमच्या कार्यालयात पाच दहा लोक तर भेटतीलच , जे तुम्हाला सांगतील , अहो साहेब, इथे काही होणार नाही, तुम्ही उगीच इथे आलात, तुम्ही नवीन आहात , तुम्हाला माहित नाही. तो तुम्हाला इतके ज्ञान देत असतो. म्हणूनच ही मानसिकता बदलण्यासाठी यशोगाथा असणे खूप आवश्यक आहे. या यशोगाथा त्यांचा आत्मविश्वास वाढवतात.

तुम्हा लोकांची पहिली रणनीती ही असायला हवी कि या निराशेच्या गर्तेत बुडालेल्या त्या व्यवस्थेला एका आशादायी व्यवस्थेत कसे बदलायचे? आणि त्याच्या पद्धती काय असू शकतात? एक पद्धत जी मी सांगितली – एक कमी आव्हानात्मक उद्दिष्ट साध्य करून दाखवा, त्यांना लगेच, हे बघा, तुम्ही लोकांनीच तर हे केले, तुमच्याकडूनच हे झाले आहे. होऊ शकते, चला हे करू या.

दुसरा एक मुद्दा जो आला मात्र तो एवढा सोपा नाही. एक म्हणजे लोकचळवळीची चर्चा आहे. लोकचळवळ म्हणून लगेच ती उभी राहत नाही. नकारात्मक प्रसंगी लोकचळवळीची शक्यता महत्वाची ठरू शकते. मात्र सकारात्मक स्थितीसाठी तुम्हाला सर्वप्रथम मुख्य टीमला प्रशिक्षित करावे लागते. मने जुळणे खूप गरजेचे असते. हळूहळू एक टप्पा, दुसरा टप्पा, पाचवा, सातवा टप्पा, जो विचार तुम्ही करता तसाच विचार ते करत असतील, अशा एका व्यवस्थेत टीम उभी करणे, शेवटी ही दोन दिवसांची कार्यशाळा काय होती? ती हीच होती कि भारत सरकारमध्ये बसलेल्या या लोकांच्या टीमच्या मनात जो विचार आला आहे, ते विचार आणि तुमच्या विचारांमध्ये ताळमेळ असायला हवा. दोन पावले यांना मागे यावे लागेल,दोन पावले तुम्हाला पुढे यावे लागेल.आणि कुठे ना कुठे भेटण्याचा बिंदू ठरवावा लागेल. मने जुळावी लागतील, तेव्हा कुठे ते एकदम साकार होईल.

ही दोन दिवसांची कार्यशाळा तुम्हाला ज्ञान देण्यासाठी नव्हती. तुम्हाला काहीच माहिती नाही आणि जे इथे बसले आहेत त्यांनाच सर्व माहिती आहे, तेच तुम्हाला शिकवतील, असे नव्हते. तुमच्याकडे जो अनुभव आहे, ताजी स्थिती आहे, ते वरचे लोकही समजून घेतील आणि धोरण आखतांना , व्यूहरचना बनवताना त्याचा वापर करतील.

आणि म्हणूनच जसे या कार्यशाळेचे स्वतःचे महत्व आहे, तुम्ही तुमच्या जिल्ह्यात तालुका स्तरावर, जिल्हा स्तरावर अशी कार्यशाळा घेऊ शकता का ? तसाच चिंतन कार्यक्रम आणि तसेच स्थानिक गोष्टी सांगा कि काय होऊ शकते? आपल्या क्षमता काय आहेत ? आपल्या मर्यादा काय आहेत? ठीक आहे, करू या, पण कसे करायचे? हे जर तुम्ही आधी केले तर नंतर या गोष्टीत त्यांची रुची वाढेल, कारण जोपर्यंत तुम्हाला काय करायचे आहे त्याच्याशी अधिकाधिक लोकांना परिचित केले नाही तर त्यात आनंद मिळणार नाही, तो सहभागीच होणार नाही.

असे समजा की एका खोलीत एक सज्जन गृहस्थ आहेत. त्या खोलीच्या दरवाजावर एक छोटेसे भोक पाडले आणि त्यांचा हात बाहेर काढला. आणि लोकांना सांगितले की या शेक हॅन्ड करा. रांगेत उभे राहतील शेक हॅन्ड करण्यासाठी. मला सांगा काय होईल? कल्पना करा. खोलीत कुणी बंद आहे, दरवाजा बंद आहे, दरवाजाला भोक आहे, हात बाहेर लटकत आहे, आणि तुम्ही हात मिळवण्यासाठी रांगेत उभे आहात. काय होईल, तुम्ही कल्पना करू शकता. मात्र जर तुम्हाला सांगितले की आतमध्ये सचिन तेंडुलकर आहे, त्यांचा हात आहे. एकदम किती फरक पडेल, हात मिळवण्याची पद्धत, थोडी ऊर्जा येईल. तुम्हाला सांगण्यात आले आहे. माहितीची ताकद असते. ज्याला तुम्हाला कामामध्ये घ्यायचे आहे, त्याला माहित असेल हे असे आहे आणि इथे जायचे आहे. तुम्ही कल्पना करा, तुमच्या मुलाचा मुलगा जेव्हा पाहिल , तेव्हा त्याला किती अभिमान वाटेल. तो त्याच्याशी जोडला जाईल.

लोकसहभाग -लोकसहभागातून होत नाही. जोपर्यंत तुम्ही लोकांना जोडण्याची नियोजनबद्ध योजना बनवणार नाही. स्वच्छ भारत अभियान- माध्यमांनी खूप सकारात्मक भूमिका पार पाडली, त्याचा एक परिणाम आहे. वर पासून खालपर्यंत टीममधल्या सर्वानी स्वतःला त्यात सहभागी करण्याचा प्रयत्न केला. याचा एक नैसर्गिक प्रभाव पडला. प्रत्येकजण स्वच्छतेसाठी काही ना काही योगदान देत आहे आणि खूप अभिमान बाळगत आहे. आणि तुम्ही पाहिले असेल स्वच्छतेच्या अभियानाच्या मुळाशी मला सर्वात मोठी ताकद दिसते ती छोट्या -छोट्या मुलांची. ते एक प्रकारे त्याचे दूत बनले आहेत.

घरात देखील, आजोबा असतील आणि काही करत असतील, तर त्यांना सांगतात असे करू नका, मोदीजींनी मनाई केली आहे. हि जी ताकद आहे संदेशाची, ती परिवर्तन घडवते. समजा आपण समाजातील कुपोषणाची चर्चा करायची कि सुपोषणाची चर्चा करायची? आपण मागास जिल्हा म्हणायचे कि महत्वाकांक्षी जिल्हा म्हणायचे? कारण मानसिकदृष्ट्या खूप फरक पडतो बरे का.

आपण आपली शब्दसंपदा सकारात्मक बनवणे खूप गरजेचे आहे. ती देखील आपल्या सकारात्मक विचारांचे एक कारण बनते. जर आपण ते केले, तर तुम्ही बघा, तुम्हाला तुमच्या आजूबाजूला त्याचा प्रभाव जाणवेल. मला चांगले आठवतंय, मुंबईत आमचा एक मित्र होता. त्याचा एक स्वभाव होता., माझ्यापेक्षा वयाने मोठे होते. आता गुजरातमधील लोकांचा आणि बहुधा देशातही सगळे भेटतात , तेव्हा कसे आहात , तब्येत कशी आहे, विचारण्याचा स्वभाव असतो. जर त्यांना विचारले तब्येत कशी आहे, तर सुरुवातीला दहा मिनिटे, नाही झोप येत नाही, म्हणजेच मज येत होती त्यांना सांगायला. तर आम्ही जे परिचित लोक होतो, त्यांनी एक दिवस ठरवले की जेव्हा हे भेटतील, तेव्हा संवाद कुठून सुरु करायचा? आम्ही ठरवले. आणि भेटल्याबरोबर वाह, साहेब, खूप छान दिसत आहात , तब्येत एकदम छान दिसते. चेहऱ्यावरही चमक दिसते. वातावरण एकदम बदलले, रडगाणे गाण्याचा त्यांचा स्वभाव बराच बदलला.

सकारात्मक गोष्टींनी परिवर्तन होईल, कुपोषणाची चर्चा, सुपोषणाची चर्चा उपयोगी पडेल? तुम्हाला स्वतःला जाणवत असेल आपण कोणत्या दिशेने जावे? आशा कार्यकर्ता हा शब्दच एक ताकद बनला आहे. त्या त्या बाई तिथे काम करत आहेत, काय करत आहेत, वगैरे, मात्र शब्द असा आहे की लोकांना वाटते, हो काही माझ्यासाठी आहे.

सामान्य भाषेशी संबंधित अशा कथा, प्रत्येक भाषेतील वेगवेगळ्या असतील. एकच शब्द आपल्या देशातील प्रत्येक भागात चालत नाही. मात्र आपण स्थानिक पातळीवर अशा गोष्टी विकसित करायला हव्यात.

दुसरे, समजा आपण कुपोषणाबाबत चर्चा केली. कधी सुदृढतेची काव्य स्पर्धा होऊ शकेल का? आता तुम्हाला वाटेल कि पोटात गेले आहे, आता सुपोषण कुठे होणार, हे मोदी कविता करायला लावत आहेत. मात्र तुम्ही बघा, शाळांमध्ये, मनात येईल का सुपोषणाबाबत कविता कशी करायची? सुपोषणावर एखादा नाट्य प्रयोग होऊ शकतो का? मला चांगले आठवतंय, एकदा मी एका अंगणवाडीत गेलो, तेव्हा तिथल्या मुलांनी 15 मिनिटांचा एक प्रयोग केला. कुणी टोमॅटो बनले, तर कुणी गाजर बनले, कुणी फुलकोबी बनला आणि मग ते येऊन संवाद म्हणत होते कि मी गाजर आहे, गाजर खाल्ल्याने हे होते, तेव्हा सर्व मुलांना समजले कि गाजर खायला हवे. आईने किती सांगितले तरी तो हात लावत नसे. मात्र शाळेत मुलांनी सांगितले तेव्हा घरी जाऊन मागायला लागला, आई मी गाजर खाणार. माझे सांगायचे तात्पर्य हे आहे की जी लोकचळवळ खरी आहे, चांगल्या घोषवाक्याच्या स्पर्धेत आपण लोकांना सहभागी करू शकतो का? सुरुवातीला पोषण दिसून येणार नाही, मात्र हळू-हळू गती येईल.

आपण त्या भागातील मान्यवर लोकांना भेटलो, त्यांना सांगितले की तुमच्या कुटुंबात कुणाचा वाढदिवस असेल, कुणाच्या लग्नाचा वाढदिवस असेल, कुणाची पुण्यतिथी असेल, त्या दिवशी तुम्ही जेवण बनवून स्वतः या आणि अंगणवाडीतील मुलांसोबत बसा , स्वतः वाढा. तुम्ही बघाल, वर्षभरात 70-80 दिवस असेच मिळतील तुम्हाला. त्यालाही आनंद वाटेल कि मी आज अंगणवाडीतील 40 मुलांना जवळून पाहिले. एक असे वातावरण तयार होईल, तुम्हाला बदल दिसून येईल.आता शाळा सोडलेली मुले पाहतो. कधी अंगणवाडीतील मुलांचा सहल कार्यक्रम होत असेल, कुठे तरी नेत असतील, काय उपक्रम असतील? तर ते काय करतात, मुलांना देवळात नेतात, नदी असेल तर नदी किनारी नेतात, उद्यान असेल तर तिथे नेतात. कधी असे ठरवता येईल का की महिन्यातील एक दिवस अंगणवाडीतील मुलांना तिथल्या प्राथमिक शाळेत घेऊन जायचे. ते पाहतील प्राथमिक शाळेतील मुलांना खेळताना, त्यांच्याबरोबर खेळतील, आणि त्या दिवशीचे अंगणवाडीतील मुलांचे माध्यान्ह भोजन त्या मुलांसोबत होईल. त्या अंगणवाडीतील मुलाच्या मनात भावना उत्पन्न व्हायला सुरुवात होईल कि मला पुढे या शाळेत जायचे आहे. मला आता इथे यायचे आहे. ही चांगली शाळा आहे, मोठी शाळा आहे, चांगले मैदान आहे, चांगले खेळतात. गोष्ट छोटी असते, बदल व्हायला सुरुवात होते. 

|

मी एक छोटासा कार्यक्रम सुरु केला होता, बहुधा तुम्हा लोकांना माहित असेल. कुठल्याही विद्यापीठात दीक्षांत समारंभाला जेव्हा मला बोलावतात, तेव्हा मी त्यांना विंनती करतो कि दीक्षांत समारंभात मी येईन, परंतु माझे 50 विशेष अतिथी असतील. त्यांना तुम्हाला पहिल्या रांगेत बसवावे लागेल. पंतप्रधानच असे म्हणाले तर कोण नाही म्हणेल आणि त्यांनाही वाटते कि कदाचित भाजपाच्या लोकांना बोलावणार असतील. असाच विचार करतात. मर्यादा तेवढीच असते. मग मी सांगतो कि सरकारी शाळा जिथे गरीब मुले शिकतात, अशा 50 मुलांना तुम्ही दीक्षांत समारंभात बसवा आणि मग मी दीक्षांत समारंभानंतर त्या मुलांशी बोलतो. मी पाहतो कि त्या मुलांनाही, जेव्हा कुणी गाऊन घालून येतो, टोपी घालून येतो, प्रमाणपत्र घेतो, तेव्हा त्या मुलांच्या मनावरही संस्कार होत असतात. मी देखील कधी इथे असेंन. एक काम जे खूप मोठे व्याख्यान करू शकत नाही, त्या मुलाच्या मनात एक महत्वाकांक्षा जागृत होते. महत्वाकांक्षी जिल्ह्यांसाठी हे खूप आवश्यक आहे कि तेथील सामान्य लोकांमध्ये ज्या आकांक्षा आहेत त्या आपण जाणून घ्यायच्या. नवीन आकांक्षा जागवण्यासाठी मी सांगत नाही, मात्र ज्या आहेत त्यांना योग्य वळण द्यायला हवे. अशा प्रकारे लोकसहभागातून आपण गोष्टी पूर्ण करू शकतो.

आमच्या एवढ्या योजना आहेत. प्रत्येक शाळेत सकाळी सभा भरते. दररोज कुणी ना कुणी विद्यार्थी आमच्या 2022 च्या उद्दिष्टांबाबत बोलेल, मग ते आरोग्यावर असेल, पोषणावर असेल. अशा प्रकारे ते विषय सगळीकडे प्रसारित होतील. सांगायचे तात्पर्य हे की जोपर्यंत आपण या गोष्टीत सामान्य लोकांना सहभागी करून घेणार नाही आपण परिणाम साध्य करू शकणार नाही.

दुसरे, समजा आपण 6 उद्दिष्टे ठरवली आहेत. एक उद्दिष्ट एकावेळी साध्य झाले कि दुसऱ्याकडे वळायचे. अशी 6-10-15 जी काही ठरवली आहेत, ती मॉडेल म्हणून विकसित करता येतील का पुढील 3-4 महिन्यात? आणि लोकांना तिथे घेऊन जायचे, बघा, कसे होते, तुमच्या इथे होऊ शकते, मग त्यांनाही वाटेल कि आपल्याच जिल्ह्यात अमुक गावात झाले, चला आपल्या गावात देखील करू शकतो. ही जर आपण परंपरा बनवली, तर मला खात्री आहे कि हे जे ११५ जिल्हे आपण निवडले आहेत. त्यांची उद्दिष्टे देखील साध्य होतील.

आता एक विषय आहे पायाभूत विकासाचा. ही गोष्ट खरी आहे कि मागणी होत असते, रस्ते बनवा, रस्ते बनवा. कधी निधी अपुरा पडतो. मात्र जर तुम्ही त्यांच्यावर जबाबदारी टाकली कि रस्ते बनवू मात्र त्यावर आम्ही आज एक लाईन आखत आहोत कि रस्ता असा बनेल मात्र रस्ता तेव्हाच बनेल जेव्हा तुम्ही रस्त्याच्या दोन्ही बाजूना झाडे लावाल आणि झाड जेव्हा 5 फूट उंच होईल तुमचा रस्ता नक्की तयार होईल. तुम्ही बघाल, ते गावकरी जबाबदारी उचलतील. रस्त्याच्या किनारी ते आतापासून झाडे लावायला सुरुवात करतील आणि नंतर तुम्हाला रस्त्याचे काम करायचे आहे तर मनरेगा द्वारे काम सुरु होईल, कंत्राटदार येतील. त्यांच्या आकांक्षा आणि सरकारची योजना या दोन्हीचा मिलन बिंदू लोकसहभाग असायला हवा. जेवढा अधिक लोकसहभाग वाढेल, तेवढा सुलभपणा वाढेल. आणि एक समस्या असते. आमचा एखादा अधिकारी खूप सर्जनशील असतो, खूप धडाडीचा असतो, आणि दरवेळी नवनवीन प्रयोग करत असतो. मात्र त्याला वाटते कि त्याच्या कार्यकाळात ते काम पूर्ण व्हावे. मात्र दुर्दैवाने बहुतांश राज्यांमध्ये स्थैर्याचा अभाव आहे. कधी वर्षभरात बदली होते, कधी दीड वर्षात बदली होते. हा चिंतेचा विषय आहे. जसे परिणाम दिसतील त्याप्रमाणे मार्ग शोधले जातील. मात्र जर आपण आपली टीम बनवली,आपल्याकडे नेतृत्व असेल किंवा नसेल, जो कुणी येईल, हि टीम चांगली असेल, कामाची विभागणी असेल, आराखडा स्पष्ट असेल, देखरेख यंत्रणा असेल, निर्धारित वेळेत काम पूर्ण करायचे असेल, तुम्हाला आपोआप परिणाम दिसून येतील, आणि मला वाटते कि हे परिणाम साध्य करण्याच्या दिशेने आपण प्रयत्न करायला हवेत. ज्या उमेद आणि उत्साहाने मी तुम्हाला पाहत होतो, तुम्ही ते चांगल्या प्रकारे करू शकता. तुम्हाला अंदाज नाही हे 115 जिल्हे जे समाजावर ओझे बनले आहेत, ते डोके बाहेर काढून वर येतील आणि मग पुन्हा थांबणार नाहीत.

तुम्ही देखील पाहिले असेल कि भारतात अनेक ठिकाणे अशी आहेत जिथे एखादे कारण असे घडले आणि नंतर असे वळण आले कि संपूर्ण भागाचा विकास झाला. पाहिले असेल तुम्ही, भारतात तुम्हाला अशी 5०-1०० ठिकाणे मिळतील जी अचानक विकसित झाली. तुम्ही देखील अशा प्रकारचा प्रयोग करून पहा, विकासाला सुरवात होईल. एकावेळी 115 जिल्हे जरी 10-10 पावले पुढे चालले तुम्ही कल्पना करू शकता कि देशाचे सगळे हिशोब किती बदलतील. मग सरकारांनाही वाटेल कि निधी द्यायचा आहे तर इथे द्या, याला प्राधान्य द्या.

कधी-कधी मनुष्याचा स्वभाव असतो कि आपण रेल्वेने गेलो, आरक्षण असते, मात्र मनात येते कि खिडकीपाशी जागा मिळाली तर बरे होईल. विमान असेल आणि पाय पसरायला जागा नसेल तर वाटते कि पाय लांब करायला जागा मिळाली तर बरे होईल. माणसाचा स्वभाव आहे आणि तो वाईट आहे असे मी म्हणणार नाही. जेव्हा तुमचे पोस्टिंग होत असेल तेव्हा प्रत्येक राज्यात 3-4 जिल्हे खूप चांगले असतील, 3-4 जिल्हे खूप वाईट असतील आणि ज्या दिवशी पोस्टिंग होईल तेव्हा तुमचेच मित्र म्हणतील अरे मित्रा, मेलास. चल मित्रा, चिंता करू नकोस, काही नाही 6-8 महिने काढ. म्हणजे तिथूनच सुरुवात होते.मला असे वाटते जे विकसित जिल्हे असतात, ते त्यांना योग्य असतात, मात्र एक तरुण अधिकारी कधीही आयुष्यात सुधारणा करू शकणार नाही, तो त्याच मार्गाने पुढे जात राहतो. मात्र एका दुर्गम भागात जो जातो, जी मेहनत करतो, त्याचा जो विकास होतो, मला वाटते काही वर्षे त्याच्या मित्रांच्या दृष्टीने हे वाईट पोस्टिंग असेल, मात्र जेव्हा आयुष्याचा हिशोब मांडेल तेव्हा त्याला वाटेल माझ्या आयुष्यातील या कठीण काळामुळे मी अधिक कणखर बनलो, त्याने मला आयुष्य जगण्याची ताकद दिली.

तुम्ही पहा, जेवढे मोठे अधिकारी असतील, कधी त्यांच्याशी बोललात तर तुमच्या लक्षात येईल कि ठीक आहे, तुम्ही मेहनत केली, परीक्षा उत्तीर्ण झालात, मसुरीला आलात, प्रशिक्षण झाले, कामाला लागलात. मात्र आयुष्यात तुम्ही जे इथवर आलात त्यामागे कठोर परिश्रम आहेत. ते सांगतील कि मी नवीन नवीन उप संचालक होतो,तेव्हा तिथे गेलो होतो. तिथे राहून मी असा झालो, त्यामुळे माझे आयुष्य बदलले. जेवढे मोठे लोक आहेत त्यांच्या आयुष्यात अशा गोष्टी नेहमी बघायला मिळतात. आणि ते लोक जे आयुष्याच्या सुरुवातीच्या काळात एक प्रकारे सोनेरी चमचा घेऊन जन्माला येतात, , त्यांना चांगली पोस्टिंग मिळते, बंगला छान असतो, दोन एकर जमीन असलेला बंगला असतो. त्यांनतर अडचणी झेलणे कठीण होते. मग तो सोपे मार्ग शोधतो आणि आपले आयुष्य जगत राहतो.

मला वाटते कि ज्यांच्याकडे 115 कठीण जिल्ह्यांची जबाबदारी आहे मी त्यांना भाग्यवान मानतो. त्यांना आयुष्यात समाधान मिळवण्याची संधी मिळाली. जिथे चांगले आहे तिथे अधिक चांगले कुणाला दिसत नाही. अधिक चांगले तुम्हाला रात्री सुखाची झोप देत नाही. अरे चालले असते, ते तर आधीही होते. मात्र जिथे काहीही नाही, तिथे वाळवंटात जर कुणी एखादे रोपटे जरी उगवले तर त्याला आयुष्यात समाधान मिळते. तुम्ही ते लोक आहात ज्यांना हे आव्हान मिळाले आहे.ज्या सामर्थ्यातून तुम्ही एक नवीन परिस्थिती प्राप्त करू शकता. आणि तुम्ही स्वतः तुमचे मूल्यमापन करू शकता. मी इथून सुरुवात केली होती, मी इथे नेले. आव्हानांचे स्वतःचे सामर्थ्य असते. आणि मी त्या लोकांना कधीही भाग्यवान मानत नाही ज्यांच्या आयुष्यात कधी आव्हानेच आली नाहीत. आयुष्य त्यांचे बनते जे आव्हानांना सामोरे जातात. व्यक्तीच्या जीवनातही आयुष्यात संकटाना सामोरे जाणे, आयुष्य घडवण्यासाठी खूप उपयोगी पडते. आणि मला विश्वास आहे , मी अनुभवू शकतो या खोलीत प्रवेश केल्याबरोबर एक सकारात्मकतेची जाणीव होते. मला वाटते हीच खूप मोठी ताकद आहे आणि याच ताकदीच्या विश्वासावर आपल्याला पुढे जायचे आहे.

आज आपण जानेवारीमध्ये बोलत आहोत. बाबासाहेब आंबेडकरांच्या या संस्थेत चर्चा करत आहोत. 14 एप्रिल बाबासाहेब आंबेडकरांची जयंती. आपण 14 एप्रिल पर्यंतचे एक वेळापत्रक बनवू शकतो का? 14 एप्रिल पर्यंतच्या 3 महिन्यांचे निरीक्षण आणि आपण पाहूया 115 जिल्ह्यांमध्ये कोण कुठे पोहोचले आहे आणि माझी इच्छा आहे कि त्या निकालाच्या आधारे जे 115 जिल्हे आहेत, त्यापैकी एका जिल्ह्यात जाऊन , ज्याने उत्तम कामगिरी केली आहे,, त्या जिल्ह्यात मी एप्रिल महिन्यात जाऊन त्या टीमबरोबर थोडा वेळ व्यतीत करेन. त्यांनी हे कसे साध्य केले हे मी जाणून घेईन. मी स्वतः ते शिकण्याचा प्रयत्न करेन. या तीन महिन्यात नवीन काही आम्ही आणत नाही आहोत, व्यवस्था तीच आहे, मात्र त्याला एक नवीन ताकद द्यायची आहे, नवी ऊर्जा द्यायची आहे, लोकसहभाग आणायचा आहे, नवीन प्रयोग करायचे आहेत, आणि त्यानंतर ते मला माझ्या दैनंदिन कार्यशैलीचा भाग बनवायचे आहे.

मला विश्वास आहे कि देश पुढे जाईल, देश प्रगती करेल, देश बदलेल, देशाच्या सामान्य माणसाचे आयुष्य बदलेल, मात्र त्याची सुरुवात कुठे ना कुठे छोट्या भागाच्या परिवर्तनातून होत असते. त्या सगळ्याचा एकत्रित परिणाम असतो जो देश बदललेला दिसतो. हे आपल्या देशाचे प्रेरक घटक आहेत आणि तुम्ही ते लोक आहात जे बदलाचे एजंट म्हणून याचे नेतृत्व करत आहात. मला विश्वास आहे कि हि दूरदृष्टी, हे सामर्थ्य, या संधी नवीन सिद्धी प्राप्त करण्यासाठी आणि 2022 भारताच्या स्वातंत्र्याची 75 वर्षे, देशाला नव्या उंचीवर घेऊन जाण्याचा संकल्प, देशासाठी काही तरी करून दाखवण्याचा संकल्प, घेऊन आपण चालू.आपण नोकरशाहीतील मोठं-मोठ्या अधिकाऱ्यांच्या कथा ऐकत असतो कि सरदार वल्लभभाई पटेल यांच्याबरोबर अमुक अधिकारी होते, त्यांच्या काळी हे झाले, देशाला हे माळले. पंडित नेहरू यांच्या काळी हे अधिकारी होते, त्यांनी हे काम केले, हे मिळाले, अमुक वेळी हा अधिकारी होता, हे काम करून गेले.

मोठं-मोठ्या अधिकाऱ्यांची चर्चा आपण नेहमी ऐकत असतो. त्यांच्याकडून आपण प्रेरणा घेतो. त्यांनी देशाला कसे नवे नियम दिले, नवी दिशा दिली, कशा प्रकारे योगदान दिले, कोणते ना कोणते योगदान आजही इतिहासाच्या साक्षीदाराच्या रूपात आपल्यासमोर आहे. मात्र खूप कमी जिल्हा स्तरीय गोष्टी आहेत ज्या प्रसिद्ध होतात. तिथे देखील कुणी अधिकारी आहे.त्याने आपले तारुण्य वेचले, ज्याने बदल घडवला, आणि हा मूलभूत बदल आहे, तोच तर जग बदलतो. मला वाटते कि ७० वर्षे मोठं मोठया अधिकाऱ्यांच्या मोठं-मोठ्या योगदानाच्या खूप गोष्टी ऐकल्या आहेत, खूप प्रेरणा मिळाली आहे, पुढेही मिळत राहील, आवश्यक देखील आहे, मात्र काळाची गरज आहे कि जिल्ह्यातून आवाज उठायला हवा, तिथून यशोगाथा यायला हव्यात, अधिकाऱ्यांच्या कथा ऐकायला मिळाव्यात, त्यांच्या आयुष्यातील गोष्टी ऐकायला मिळाव्यात.

मी समाज माध्यमांवर खूप सक्रिय होतो सुरुवातीला, आता वेळ मिळत नाही, मात्र ज्या कालखंडात हे जग होते मी खूप सहभागी होतो. दोन दिवसांपूर्वी मी असेच सर्फिंग करत होतो, मी एका महिला अधिकाऱ्याचे ट्विट पाहिले , आयएएस अधिकाऱ्याचे, खूप रोचक होते. आता त्या वरिष्ठ अधिकारी बनल्या आहेत, त्यांचे छायाचित्र देखील आहे, मी नाव विसरलो त्यांचे. त्यांनी लिहिले होते कि माझ्या आयुष्यात एक खूप समाधानाचा क्षण आहे. का? तर त्यांनी लिहिले आहे कि मी कनिष्ठ अधिकारी होते, एकदा गाडीने जात होते, तर एका शाळेच्या बाहेर एक मुलगा बकरीला चारा देत होता. मी गाडी थांबवली, शाळेच्या शिक्षकाला बोलावले, आणि सांगितले कि या मुलाला शाळेत दाखला द्या, आणि त्या मुलालाही मी समजावले, ओरडले, तो मुलगा शाळेत गेला. 27 वर्षांनंतर आज माझ्या दौऱ्यादरम्यान एका हेड कॉन्स्टेबलने मला सलाम केला अमी मग विचारले कि मॅडम ओळखले का, मी तोच आहे जो बकऱ्याना चरायला नेट होता. नि तुम्ही मला शाळेत पाठवलेत, तुमच्यामुळे मी आज इथे पोहोचलो. त्या अधिकाऱ्याने ट्विटमध्ये लिहिले आहे कि एक छोटीशी गोष्ट किती मोठा बदल घडवून आणते. आपण लोकांना आयुष्यात संधी मिळाल्या आहेत, त्या संधी आपण घ्यायला हव्यात.

या देशाच्या आपल्याकडून खूप अपेक्षा आहेत. काहीही वाईट झाले तरी आज हा देश म्हणतो कि बहुधा हीच ईश्वराची मर्जी असावी. असे सौभाग्य जगातील कोणत्याही सरकारला तिथल्या जनतेकडून मिळत नसेल, जे आपल्याला मिळते. आजही तो आपल्या नशिबाला दोष देतो, ईश्वराला दोष देतो, आपल्याकडे कधी बोट दाखवत नाही. यापेक्षा मोठे जन समर्थन काय असू शकते, यापेक्षा मोठा जनसहभाग काय असू शकतो, यापेक्षा मोठी जन आस्था काय असू शकते? जर आपण ती ओळखू शकलो नाही, त्यासाठी आपले आयुष्य वेचले नाही तर बहुधा आयुष्यात अशी एक वेळ येईल जेव्हा आपण स्वतःला उत्तर देऊ शकणार नाही आणि म्हणूनच मित्रांनो, 115 जिल्हे देशाचे भाग्य बदलवू शकतात. नवीन भारताच्या स्वप्नांचा मजबूत पाया तिथेच उभा राहू शकेल आणि ते काम तुम्हा सर्व सहकाऱ्यांकडे आहे. माझ्या तुम्हाला खूप-खूप शुभेच्छा. खूप-खूप धन्यवाद.

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
Job opportunities for women surge by 48% in 2025: Report

Media Coverage

Job opportunities for women surge by 48% in 2025: Report
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Japan-India Business Cooperation Committee delegation calls on Prime Minister Modi
March 05, 2025
QuoteJapanese delegation includes leaders from Corporate Houses from key sectors like manufacturing, banking, airlines, pharma sector, engineering and logistics
QuotePrime Minister Modi appreciates Japan’s strong commitment to ‘Make in India, Make for the World

A delegation from the Japan-India Business Cooperation Committee (JIBCC) comprising 17 members and led by its Chairman, Mr. Tatsuo Yasunaga called on Prime Minister Narendra Modi today. The delegation included senior leaders from leading Japanese corporate houses across key sectors such as manufacturing, banking, airlines, pharma sector, plant engineering and logistics.

Mr Yasunaga briefed the Prime Minister on the upcoming 48th Joint meeting of Japan-India Business Cooperation Committee with its Indian counterpart, the India-Japan Business Cooperation Committee which is scheduled to be held on 06 March 2025 in New Delhi. The discussions covered key areas, including high-quality, low-cost manufacturing in India, expanding manufacturing for global markets with a special focus on Africa, and enhancing human resource development and exchanges.

Prime Minister expressed his appreciation for Japanese businesses’ expansion plans in India and their steadfast commitment to ‘Make in India, Make for the World’. Prime Minister also highlighted the importance of enhanced cooperation in skill development, which remains a key pillar of India-Japan bilateral ties.