QuoteeRUPI व्हाउचर प्रत्येकाला लक्ष्यित, पारदर्शक आणि गळती मुक्त सेवा पुरवण्यात मदत करेल: पंतप्रधान
QuoteeRUPI व्हाउचर डीबीटीला अधिक प्रभावी बनवण्यात मोठी भूमिका बजावेल आणि डिजिटल व्यवस्थेला नवा आयाम देईल: पंतप्रधान
Quoteआम्ही तंत्रज्ञानाकडे गरीबांना मदत करण्याचे साधन, त्यांच्या प्रगतीचे साधन म्हणून पाहतो: पंतप्रधान

नमस्कार,

या महत्वपूर्ण कार्यक्रमात देशभरातून सहभागी झालेले सर्व राज्यपाल, नायब राज्यपाल, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, राज्यांचे  मुख्य सचिव, विविध औद्योगिक संस्थांशी संबंधित मित्रगण, स्टार्ट अप फिनटेकशी संबंधित युवा मित्र, बँकांचे वरिष्ठ अधिकारी गण, आणि माझ्या प्रिय बंधुभगिनींनो,

आज देश डिजिटल व्यवस्थेला एक नवा आयाम देत आहे. ई रुपी व्हाउचर देशात डिजिटल व्यवहारांना , डीबीटीला अधिक प्रभावी बनवण्यात खूप मोठी भूमिका बजावणार आहे. यामुळे उद्दिष्टित, पारदर्शक आणि गळतीमुक्त सेवांमध्ये सर्वाना मोठी मदत मिळेल. 21 व्या शतकातील भारत आज आधुनिक  तंत्रज्ञानाच्या मदतीने कसा पुढे जात आहे , तंत्रज्ञानाला लोकांच्या जीवनाशी जोडत आहे, त्याचे ई रुपी हे प्रतीक आहे. आणि मला आनंद आहे कि ही सुरुवात अशा वेळी होत आहे जेव्हा देश स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षी  अमृतमहोत्सव साजरा करत आहे आणि अशा वेळी देशात भविष्याच्या दृष्टीने महत्वाचे पाऊल  टाकले जात आहे.

मित्रांनो ,

सरकारच नाही तर एखादी सामान्य  संस्था किंवा संघटना कुणाच्या उपचारासाठी , कुणाच्या शिक्षणासाठी किंवा अन्य कामासाठी काही  मदत करू इच्छित असेल तर रोख रकमेऐवजी ई रुपीद्वारे करू शकेल. यामुळे हे सुनिश्चित होईल कि त्यांनी दिलेले पैसे  त्यासाठीच वापरले जातील. सुरुवातीच्या टप्य्यात ही योजना आरोग्य क्षेत्रातील योजनांच्या लाभासाठी लागू करण्यात येत आहे. समजा एखादी संस्था सेवाभावाने भारत सरकारद्वारा दिल्या जात असलेल्या मोफत लसीचा लाभ घेऊ इच्छित नसेल, मात्र  खासगी रुग्णालयात काही पैसे भरून लस दिली जात आहे,  त्यात लोकांना पाठवू इच्छित असेल,  किंवा १०० गरिबाना लस द्यायची त्याची इच्छा असेल तर ते त्या १०० गरिबाना  ई रुपी व्हाउचर देऊ शकतील. ई रुपी व्हाउचर  सुनिश्चित करेल कि त्याचा वापर लसीकरणासाठीच होईल अन्य कामासाठी नाही. काळानुसार यात आणखी गोष्टी समाविष्ट होतील. जसे  कुणाला उपचारांसाठी मदत द्यायची असेल, कुणाला टीबीच्या रुग्णाला औषधांसाठी, जेवणासाठी आर्थिक मदत द्यायची असेल , किंवा मुलांना, गर्भवती महिलांना भोजन आणि पोषणाशी संबंधित अन्य सुविधा द्यायच्या असतील, तर ई रुपी त्यांच्यासाठी खूप उपयुक्त ठरेल. म्हणजेच ई रुपी  विशिष्ट व्यक्ती तसेच उद्देश संबंधित आहे.

ज्या उद्देशाने एखादी मदत किंवा लाभ दिला जात आहे तो त्यासाठीच वापरला जाईल हे ई -रुपी सुनिश्चित करणार आहे. जर कुणाला वृद्धाश्रमात 20 नवीन बेड लावायचे असतील,तर ई रुपी व्हाउचर त्याची मदत करेल.  कुणाला ५० गरीबांसाठी जेवणाची व्यवस्था करायची असेल, तर ई रुपी व्हाऊचर त्याची मदत करेल. कुणाला गौशाळेत चाऱ्याची सोय करायची असेल तर ई रुपी व्हाऊचर मदत करेल.

याकडे राष्ट्रीय स्तरावर पाहिले तर सरकारद्वारे पुस्तकांसाठी पैसे पाठवले असतील तर ते पुस्तकांसाठी खर्च होतील  हे ई रुपी  सुनिश्चित करेल. गणवेशासाठी पाठवले असतील तर त्यातून गणवेशच खरेदी केले जातील.

जर अनुदानित खतांसाठी मदत दिली असेल तर ते खत खरेदी करण्यासाठीच खर्च होतील. गर्भवती महिलांना देण्यात आलेल्या पैशातून पोषक आहारासाठीच खर्च होतील.म्हणजे  पैसे दिल्यानंतर त्याचा वापर जसा आपल्याला हवा आहे तसा इरुपी सुनिश्चित करेल.

मित्रांनो ,

पूर्वी आपल्या देशात तंत्रज्ञान हे श्रीमंतीसाठी आहे असे मानले जायचे. भारत तर गरीब देश आहे, आपल्याला त्याचा काय उपयोग?  जेव्हा आमचे सरकार तंत्रज्ञानाला मिशन बनवू पाहत होते तेव्हा काही राजकीय नेते, तज्ञ मंडळी त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करायची.  मात्र आज देशाने  विचारांना नाकारले आहे, चुकीचे सिद्ध केले आहे.

आज देश वेगळ्या पद्धतीने विचार करतोय. हा नवीन विचार आहे. आज आम्ही तंत्रज्ञानाचा वापर गरीबांसाठी, त्यांच्या मदतीसाठी , त्यांच्या प्रगतीसाठी एक साधन म्हणून करत आहोत., भारतामध्ये तंत्रज्ञान पारदर्शकता आणि प्रामाणिकपणा आणत आहे हे जग पाहत आहे.  नवनवीन संधी निर्माण करण्यासाठी तंत्रज्ञानाची मदत  घेतली जात आहे, त्याचबरोबर तंत्रज्ञानामुळे गरीबांचे जीवन अधिक सुलभ बनविण्यासाठी मदत होत  आहे, हे आता दिसून येत आहे. आणि तंत्रज्ञान सरकार आणि लालफितीचा कारभार यावरील  सामान्य जनतेची निर्भरता कशी कमी करत आहे.

आपण आता आजच्या या अव्दितीय उत्पादनाविषयी लक्षपूर्वक पहावे, याविषयी जाणून घ्यावे. आज आम्ही इथपर्यंत पोहोचू शकलो, त्याचे कारण म्हणजे, देशामध्ये जन धन खाती उघडणे त्याचबरोबर सर्वांची खाती मोबाईल आणि आधार कार्ड यांना जोडणे, आणि ‘‘जेम’’ सारख्या व्यवस्थेसाठी गेली काही वर्षे आम्ही परिश्रम घेतले आहेत. ज्यावेळी ‘‘जेम’’ सुरू केले होते, त्यावेळी अनेक लोक या व्यवस्थेचे महत्व समजू शकले नाहीत. परंतु या सर्व व्यवस्थेचे महत्व लाॅकडाउनच्या काळात सर्वांनाच लक्षात आले. लाॅकडाउनच्या काळामध्ये गरीबांपर्यंत मदत कशी पोहोचवायची याविषयी समस्या निर्माण झाली, ज्यावेळी जगातले मोठमोठे देश ही समस्या सोडवताना अतिशय त्रासले होते, मात्र त्यावेळी गरीबांना मदत पोहोचवण्यासाठी भारतामध्ये ही संपूर्ण व्यवस्था तयार होती. इतर देश आपल्या गावांगावांमध्ये टपाल कार्यालये आणि बँका उघडत होते, त्याचवेळी भारतात  महिलांच्या बँक खात्यामध्ये थेट मदत जमा केली जात होती.

भारतामध्ये आत्तापर्यंत थेट हस्तांतर लाभाच्या माध्यमातून जवळपास साडेसतरा लाख कोटी रूपये थेट लाभार्थीच्या खात्यांमध्ये जमा करण्यात आले आहेत. आज केंद्र सरकारच्या तीनशेपेक्षा जास्त योजनांचा लाभ डीबीटी म्हणजे ‘थेट हस्तांतर लाभ’ या माध्यमातून लोकांना मिळत आहे. सरकार लोकांच्या थेट खात्यात पैसे जमा करीत आहे. जवळपास 90 कोटी देशवासियांना थेट हस्तांतर लाभ योजनेचा कोणत्या ना कोणत्या रूपाने लाभ होत आहे. स्वस्त धान्य असो, स्वयंपाकाचा गॅस असो, औषधोपचार असो, शिष्यवृत्ती असो, निवृत्ती वेतन असो, मजुरी कामाचा मोबदला असो, घरकुल बनविण्यासाठी मदत असो, अशा अनेक प्रकारचे लाभ ‘डीबीटी’च्या माध्यमातून जनतेला मिळत आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधीअंतर्गत एक लाख पस्तीस हजार   कोटी रूपये शेतकरी बांधवांच्या थेट बँक खात्यामध्ये जमा केले गेले आहेत. यावर्षी तर शेतकरी बांधवांकडून जो सरकारने गहू खरेदी केला आहे, त्याचे जवळपास 85 हजार कोटी रूपये थेट शेतक-यांच्या बँक खात्यामध्येच हस्तांतरीत केले आहेत. या सर्व प्रयोगांचा खूप मोठा लाभ झाला आहे. देशाची  जवळपास पावणे दोन लाख कोटी रूपयांपेक्षा जास्त रक्कम अयोग्य व्यक्तींच्या हाती जाण्यापासून वाचली आहे.

मित्रांनो,

तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्यात, तंत्रज्ञानाशी जोडून घेण्यात तो इतर कोणत्याही देशांपेक्षा अजिबात कमी नाही, हे भारत आज संपूर्ण दुनियेला दाखवून देत आहे. नवसंकल्पनांची गोष्ट असो की सेवा देण्याची बाब असो. तंत्रज्ञानाचा वापर केला जात असल्यामुळे भारत दुनियेतल्या मोठ्या देशांच्या बरोबरीने वैश्विक नेतृत्व करण्याची क्षमता बाळगून आहे. गेल्या सात वर्षांमध्ये भारताने आपल्या प्रगतीला जो काही वेग दिला आहे, भारत ज्या वेगाने प्रगती करीत आहे, त्यामध्ये तंत्रज्ञानाचा अतिशय उत्तम वापर केला. या वेगामध्ये तंत्रज्ञानाची भूमिका मोठी आहे. आता आपण विचार करा, 8-10 वर्षांपूर्वी कोणी कल्पना केली होती का, की पथकर नाक्यांवर कोट्यवधी गाड्या कोणत्याही प्रकारे प्रत्यक्ष व्यवहार न होता, पुढे जाऊ शकतील? आज फास्टॅगमुळे हे शक्य झाले आहे.

भारताच्या कानाकोप-यात, दुर्गम भागामध्ये कार्यरत असलेला हस्तशिल्पकार आपले उत्पादन दिल्लीतल्या कोणा एका सरकारी कार्यालयामध्ये थेट विकू शकेल, असा 8-10 वर्षांपूर्वी कोणी कधी विचार केला होता का? आज जेम- जीईएम म्हणजेच सरकारी ई बाजारपेठेच्या पोर्टलमुळे हे काम शक्य झाले आहे.

आपली सर्व प्रमाणपत्रे, दस्तऐवज प्रत्येकवेळी डिजिटली आपल्या खिशात असू शकतील, आणि गरज पडेल त्या प्रत्येकवेळी एका क्लिकवर त्या कागदपत्रांचा वापर करता येईल. याविषयी कधी कोणी 8-10 वर्षांपूर्वी विचार केला होता का? आज हे सर्व डिजी लॉकरच्या सुविधेमुळे शक्य झाले आहे.

भारतामध्ये एमएसएमई क्षेत्रातल्या उद्योजकांना अवघ्या 59 मिनिटांमध्ये कर्ज मंजूर केले जाईल, याचा कधी कोणी 8-10 वर्षांपूर्वी विचार केला होता का? आज हे सुद्धा शक्य आहे. आणि याचप्रमाणे तुम्ही कोणत्या कामासाठी एक डिजिटल वाॅउचर पाठवायचे आणि काम पूर्ण होईल, कधी कोणी 8-10 वर्षांपूर्वी असा विचार केला होता का? आज हे सुद्धा ई-रूपीच्या माध्यमातून शक्य झाले आहे.

अशी किती तरी उदाहरणे मी देऊ शकतो. या महामारीच्या काळामध्ये देशाने तंत्रज्ञानाची ताकद किती प्रचंड आहे, हे जाणले आहे. आरोग्य सेतू ॲपचे उदाहरण आपल्या सर्वांच्या समोर आहे. आज हे ॲप सर्वात जास्त डाउनलोड होणा-या ॲपपैकी एक आहे.  याच प्रमाणे कोविन पोर्टलही आज आपल्या लसीकरणाच्या कार्यक्रमामध्ये, लसीकरण केंद्राची निवड करण्यासाठी, नोंदणीसाठी, लसीकरणाचे प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी देशवासियांची खूप मोठी मदत करीत आहे.

 जुनीच व्यवस्था असती तर लसीकरण प्रमाणपत्रासाठी धावपळ करावी लागली असती. जगातल्या अनेक देशात आजही कागदावर हाती लिहून प्रमाणपत्र दिलं जात आहे. भारतात मात्र लोक, एक क्लिक करुन डिजिटल प्रमाणपत्र डाऊनलोड करत आहेत. यामुळेच भारताची "कोविन" प्रणाली जगातल्या अनेक देशांना आकर्षित करत आहे. भारत या प्रणालीचा लाभ जगालाही देत आहे.

 

|

 मित्रांनो,

मला आठवतंय, चार वर्षांपूर्वी जेव्हा "भीम ॲप" लॉंच केलं होतं, तेव्हा मी म्हटलं होतं, तो दिवस दूर नाही जेव्हा बहुतांश  व्यावसायिक व्यवहार नोटा किंवा नाण्यांऐवजी डिजिटली होतील. तेव्हा मी हे ही म्हटलं होतं की या बदलामुळे सर्वाधिक गरीब, वंचित, छोटे व्यापारी, शेतकरी, आदिवासी यांचं सशक्तीकरण होईल. ते सबल होतील. आपण आज हे साक्षात अनुभवतो आहोत. दर महिन्याला युपीआय व्यवहाराचे नवे विक्रम रचले जात आहेत. जुलै महिन्यात 300 कोटी रुपयांपेक्षाही अधिक व्यवहार युपीआयच्या माध्यमातून झाले आहेत. यात सहा लाख कोटी रुपयांची देवाण-घेवाण झाली आहे. चहा, रस, भाज्या-फळांची गाडी लावणारेही याचा उपयोग करत आहेत. 

 भारताचे रुपे कार्ड आज  देशाचा सन्मान वाढवत असून आता सिंगापूर, भूतानमधेही ते उपलब्ध करण्यात आलं आहे. देशात आज 66 कोटी रुपे कार्ड आहेत. देशात हजारो कोटी रुपयांचा व्यवहार "रुपे" कार्डानेही होत आहे. या कार्डाने गरीबालाही सशक्त केलं आहे. आपणही डेबिट कार्ड बाळगू शकतो, त्याचा वापर करु शकतो, हा आत्मविश्वाचा भाव त्याच्या मनात  जागा केला आहे.

 

|

 मित्रांनो.

 तंत्रज्ञान, गरीबांना कसं सशक्त करु शकतं याचं आणखी एक उदाहरण आहे -पीएम स्वनिधि योजना. आपल्या देशात जे हातगाडीवाले, फेरीवाले बंधु-भगिनी  आहेत, त्यांच्या आर्थिक समावेशकतेबाबत याआधी कधी विचार झाला नव्हता.  आपलं काम वाढवण्यासाठी बँकेकडून मदत मिळणं त्यांच्यासाठी अशक्य होतं.   डिजिटल व्यवहाराची कोणतीही नोंद, पार्श्वभूमीच  नसेल, कागदपत्रं नसतील, अशावेळी आपले फेरीवाले, हातगाडीवाले बांधव बँकेकडून कर्ज घेण्यासाठी पहिलं पाऊलच टाकू शकत नसत. हेच लक्षात घेऊन आमच्या  सरकारने पीएम स्वनिधि योजनेची  सुरुवात केली. देशात आज  छोट्या-मोठ्या शहरांमधे, 23 लाखांपेक्षाही अधिक फेरीवाले आणि हातगाडीवर विक्री करणाऱ्यांना या योजने अतंर्गत, मदत देण्यात आली आहे.  याच कोरोना काळात जवळपास  2,300 कोटी रुपए त्यांना दिले आहेत. या गरीब व्यक्ती  आता डिजिटल व्यवहार करत आहेत आणि आपलं कर्जही फेडत आहेत. त्यामुळे त्यांच्या व्यवहाराची आता डिजिटल नोंद होत आहे.  पीएम स्वनिधि मधे अशी  व्यवस्था केली आहे की 10 हजार रुपयांचं पहीलं कर्ज फेडलं की  20 हजाराचं दूसरं कर्ज आणि दूसरं कर्ज फेडलं की  50 हजाराचं तीसरं कर्ज आपल्या या फेरीवाल्या बांधवांना दिलं जाईल. तुम्हाला हे जाणून आनंद होईल की आज शेकडो फेरीवाले बंधू भगिनी तिसरं कर्ज प्राप्त करण्याच्या दिशेनं पुढे जात आहेत.

 मित्रांनो,

 देशात डिजिटल पायाभूत सुविधा आणि डिजिटल व्यवहारांसाठी गेल्या 6-7 वर्षात झालेल्या कामाची दखल साऱ्या जगानं घेतली आहे.  विशेषत: भारतात फिनटेकचा खूप भक्कम आधार तयार झाला आहे. अशी व्यवस्था, आधार तर मोठमोठया देशातही नाही.   देशवासीयांचा सकारात्मक दृष्टीकोन,  फिनटेक उपायांना स्विकारण्याची त्यांची क्षमताही असीम आहे. यामुळेच   आज भारतातील तरुण, भारताच्या  स्टार्ट अप इकोसिस्टमसाठीही ही सर्वोत्तम संधी आहे. भारताच्या  स्टार्ट अप्ससाठी फिनटेकमधे अनेक शक्यता आहेत.

 मित्रांनो,

 मला विश्वास आहे की इ-रुपी (e-Rupi) वाउचर देखील यशाचे नवे अध्याय रचेल. यात आपल्या  बँका आणि इतर पेमेंट गेटवे यांचीही महत्वाची भूमिका आहे. आपले शेकडो खाजगी रुग्णालये, कॉर्पोरेट्स, उद्योग जगत, समाजसेवी संस्था आणि इतर संघटनानी देखील यात रुची असल्याचे दाखवले  आहे.   माझं राज्य सरकारांना आग्रही सांगणं आहे की आपल्या योजनांचा सर्वंकष आणि अचूक, संपूर्ण लाभ सुनिश्चित करण्यासाठी इ-रुपीचा अधिकाधिक उपयोग करा. मला विश्वास आहे की आपल्या सगळ्यांची अशीच सार्थक भागीदारी एका प्रामाणिक आणि पारदर्शी व्यवस्थेच्या निर्माणाला आणखी गती देईल.

पुन्हा एकदा सर्व देशवासीयांना या मोठ्या परिवर्तनासाठी खूप खूप शुभेच्छा देतो. खूप खूप शुभेच्छा!

 धन्यवाद !!

 

Explore More
प्रत्येक भारतीयाचं रक्त तापलं आहेः पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये

लोकप्रिय भाषण

प्रत्येक भारतीयाचं रक्त तापलं आहेः पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये
PM’s address to the nation on Operation Sindoor: Path of peace, path of strength

Media Coverage

PM’s address to the nation on Operation Sindoor: Path of peace, path of strength
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
PM Modi's address to the nation
May 12, 2025
QuoteToday, every terrorist knows the consequences of wiping Sindoor from the foreheads of our sisters and daughters: PM
QuoteOperation Sindoor is an unwavering pledge for justice: PM
QuoteTerrorists dared to wipe the Sindoor from the foreheads of our sisters; that's why India destroyed the very headquarters of terror: PM
QuotePakistan had prepared to strike at our borders,but India hit them right at their core: PM
QuoteOperation Sindoor has redefined the fight against terror, setting a new benchmark, a new normal: PM
QuoteThis is not an era of war, but it is not an era of terrorism either: PM
QuoteZero tolerance against terrorism is the guarantee of a better world: PM
QuoteAny talks with Pakistan will focus on terrorism and PoK: PM

प्रिय देशवासीयांनो

नमस्कार!

आपण सर्वांनी गेल्या काही दिवसांत देशाचं सामर्थ्य आणि त्याचा संयम दोन्ही पाहिलं आहे. मी सर्वप्रथम भारताच्या पराक्रमी सैन्यदलांना, सशस्त्र दलांना, आपल्या गुप्तहेर संस्थांना, आपल्या वैज्ञानिकांना प्रत्येक भारतीयाच्या वतीनं सॅल्यूट करतो. आपल्या शूर सैनिकांनी ऑपरेशन सिंदूरच्या लक्ष्यप्राप्तीसाठी असीम शौर्य गाजवलं.

मी त्यांचं शौर्य, त्यांचं साहस, त्यांचा पराक्रम आज समर्पित करतो आहे. आपल्या देशाच्या प्रत्येक मातेला, देशाच्या प्रत्येक भगिनीला आणि देशाच्या प्रत्येक कन्येला हा पराक्रम समर्पित करतो आहे.

मित्रहो,

२२ एप्रिलला पहेलगाममध्ये दहशतवाद्यांनी ज्या क्रौर्याचं प्रदर्शन मांडलं, त्यानं देशाला आणि जगालाही हादरवून टाकलं होतं. सुट्टीचा आनंद घेणाऱ्या निर्दोष निरपराध नागरिकांना धर्म विचारून...त्यांचा कुटुंबासमोर, त्यांच्या मुलांसमोर निर्घृणपणे मारून टाकणं. हा दहशतीचा अतिशय बीभत्स चेहरा होता, क्रौर्य होतं. देशातला एकोपा आणि सुसंवाद भंग करण्याचाही हा किळसवाणा प्रयत्न होता. मला व्यक्तिशः याचा फार त्रास झाला. या दहशतवादी हल्ल्यानंतर सारा देश, प्रत्येक नागरिक, प्रत्येक समाज, प्रत्येक वर्ग, प्रत्येक राजकीय पक्ष‌ एकमुखाने दहशतवादाविरोधात कठोर कारवाईसाठी उभा राहिला. आम्ही दहशतवाद्यांना धूळ चारण्यासाठी भारताच्या सैन्यदलांना पूर्ण मुभा दिली. आणि आज प्रत्येक दहशतवाद्याला, प्रत्येक दहशतवादी संघटनेला हे पुरेपूर समजलंय की आमच्या बहिणींच्या आणि मुलींच्या कपाळावरचं कुंकू- सिंदूर पुसण्याचा परिणाम काय होतो.

मित्रहो,

ऑपरेशन सिंदूर हे फक्त नाव नाही. देशातल्या कोट्यवधी लोकांच्या भावनांचं हे प्रतिबिंब आहे. ऑपरेशन सिंदूर ही न्यायाची अखंड प्रतिज्ञा आहे. ६ मे च्या रात्री उशिरा ७ मे च्या सकाळी साऱ्या जगानं ही प्रतिज्ञा प्रत्यक्षात येताना पाहिली आहे. भारताच्या सैन्यदलांनी पाकिस्तानात दहशतवादाच्या तळांवर त्यांच्या प्रशिक्षण केंद्रांवर अचूक प्रहार केला. दहशतवाद्यांना स्वप्नातही वाटलं नसेल, की भारत इतका मोठा निर्णय घेऊ शकेल. पण जेव्हा देशाची एकजूट होते. 'राष्ट्र प्रथम' या भावनेने देश भारून जातो. राष्ट्र सर्वोपरि असतं...तेव्हा पोलादी निर्णय घेतले जातात. अपेक्षित परिणाम घडवून दाखवले जातात. जेव्हा पाकिस्तानात दहशतीच्या अड्ड्यांवर भारताच्या क्षेपणास्त्रांनी हल्ला केला. भारताच्या ड्रोन्सनी हल्ला केला...तेव्हा दहशतवादी संघटनांच्या केवळ इमारतीच नाही, तर त्यांचं धैर्यही डळमळीत झालं. बहावलपूर आणि मुरीदके यासारखे दहशतवाद्यांचे तळ, एक प्रकारे जागतिक दहशतवादाची विद्यापीठं बनली होती. जगात कुठेही जे मोठे दहशतवादी हल्ले झाले आहेत...मग तो नाइन इलेव्हन असो. कींवा लंडन ट्यूब बॉंबिंग्स असोत किंवा भारतात अनेक दशकांत जे मोठमोठे दहशतवादी हल्ले झाले. त्यांचे धागेदोरे दहशतीच्या या तळांशी कुठे ना कुठे जोडलेले दिसत आले आहेत. दहशतवाद्यांनी आपल्या बहिणींच्या कपाळीचं कुंकू पुसलं म्हणून भारताने दहशतीची ही मुख्यालयं पुसून टाकली. भारताच्या या हल्ल्यांमध्ये शंभराहून अधिक क्रूरकर्मा दहशतवाद्यांना यमसदनी धाडण्यात आलं. दहशतवाद्यांचे कित्येक म्होरके आश्रयदाते गेल्या अडीच तीन दशकांपासून पाकिस्तानात राजरोस फिरत होते, जे भारताविरुद्ध कारस्थानं करत होते त्यांना भारतानं एका झटक्यात संपवलं आहे.

मित्रहो,

भारताच्या या कारवाईमुळे पाकिस्तान घोर निराशेच्या खाईत ढकलला गेला होता. कमालीचा हताश झाला होता. बिथरला होता आणि याच बिथरलेपणाच्या भावनेतून त्यानं आणखी एक दुःसाहस केलं. दहशतवादाविरोधात भारताच्या कारवाईला साथ देण्याऐवजी पाकिस्ताननं भारतावरच हल्ला करायला सुरुवात केली. पाकिस्ताननं आपल्या शाळा-महाविद्यालयांना गुरुद्वारांना मंदिरांना सामान्य नागरिकांच्या घरांना लक्ष्य केलं. पाकिस्ताननं आपल्या सैनिकी तळांना लक्ष्य केलं. पण यातही पाकिस्तानचा बुरखा गळून पडला. जगानं हे पाहिलं की पाकिस्तानचे ड्रोन्स आणि क्षेपणास्त्रं भारतासमोर काड्या काटक्यांसारखी कशी उधळली गेली. भारताचा सशक्त हवाई संरक्षण प्रणालीनं त्यांना आकाशातच नष्ट करून टाकलं. पाकिस्ताननं सीमेवर वार करण्याची तयारी केली होती. पण भारताने पाकिस्तानच्या छातीवरच प्रहार केला. भारताचे ड्रोन्स भारताच्या क्षेपणास्त्रांनी अतिशय अचूक हल्ला केला. पाकिस्तानी वायुदलाच्या त्याच हवाई तळांची हानी केली, ज्यांच्याबद्दल पाकिस्तानला फारच घमेंड होती. भारताने पहिल्या तीन दिवसांतच पाकिस्तानला इतकं उध्वस्त केलं ज्याचा त्याला अंदाजही नव्हता. म्हणूनच तर भारताच्या आक्रमक कारवाईनंतर पाकिस्ताननं सुटकेचे मार्ग शोधायला सुरुवात केली. पाकिस्तान जगाकडे तणाव कमी करण्यासाठी विनंतीची याचना करत होता आणि जबरदस्त मार खाल्ल्यानंतर, १० मे रोजी दुपारी, पाकिस्तानी सैन्यानं आपल्या डीजीएमओ शी संपर्क साधला. तोपर्यंत आपण दहशतवादाला पोसणाऱ्या पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणात नष्ट केल्या होत्या. दहशतवाद्यांना यमसदनी धाडण्यात आलं होतं, पाकिस्तानने अगदी हृदयाशी बाळगलेल्या दहशतवादी तळांना आपण उध्वस्त केलं होतं. म्हणूनच जेव्हा पाकिस्तानकडून विनंतीची याचना करण्यात आली. जेव्हा पाकिस्तानकडून हे सांगण्यात आलं की त्यांच्याकडून यापुढे दहशतवादी कारवाया आणि लष्करी दुःसाहस होणार नाही. तेव्हा भारतानही त्यावर विचार केला. आणि मी पुन्हा सांगतो. आपण पाकिस्तानमधील दहशतवादी आणि लष्करी तळांविरुद्धची आपली प्रत्युत्तरात्मक कारवाई सध्या फक्त स्थगित केली आहे. येत्या काळात आम्ही पाकिस्तानचे प्रत्येक पाऊल या निकषावर पारखू...की तो नेमका कोणता दृष्टिकोन स्वीकारतो?

मित्रांनो,

भारताची तिन्ही सैन्यदलं आपलं हवाई दल आपलं भूदल आणि आपलं नौदल आपलं सीमा सुरक्षा दल – बीएसएफ, भारताची निमलष्करी दलं सातत्यानं सतर्क आहेत. सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईक नंतर आता ऑपरेशन सिंदूर हे दहशतवादाविरुद्ध भारताचं धोरण आहे. ऑपरेशन सिंदूरनं दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक नवीन रेषा आखली आहे. एक नवीन मानक, एक नवीन उदाहरण, घालून दिलं आहे. पहिले- जर भारतावर दहशतवादी हल्ला झाला तर त्याला सडेतोड उत्तर दिले जाईल. आपण आपल्या पद्धतीनं, आपल्या स्वतःच्या अटींनिशी प्रतिसाद देऊ. दहशतवादाची मुळे जिथे जिथे उगम पावत असतील तिथे तिथे जाऊन आम्ही कठोर कारवाई करू. दुसरे - भारत कोणत्याही आण्विक ब्लॅकमेलला भीतीच्या बागुलबुवाला भीक घालणार नाही. आण्विक ब्लॅकमेलच्या आडून फोफावणाऱ्या दहशतवादी अड्ड्यांवर भारत अचूक आणि निर्णायक हल्ला करेल. तिसरे म्हणजे, दहशतवादाला आश्रय देणारं सरकार आणि दहशतवादाचे सूत्रधार, यांना आपण वेगवेगळे घटक समजणार नाही. ऑपरेशन सिंदूर दरम्यान जगानं पुन्हा एकदा पाकिस्तानचं घृणास्पद सत्य अनुभवलं. जेव्हा मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना अंतिम निरोप देण्यासाठी पाकिस्तानी सैन्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची उडाउडी पडली. एखादा देश पुरस्कृत करत असलेल्या दहशतवादाचा…हा जिवंत पुरावा आहे. आपण भारत आणि आपल्या नागरिकांना कुठल्याही प्रकारच्या धोक्यापासून वाचवण्यासाठी सातत्यानं निर्णायक पावलं उचलत राहू.

मित्रानो,

रणागणांत प्रत्येकवेळी आपण पाकिस्तानवर मात केली आहे आणि यावेळी ऑपरेशन सिंदूरनं नवा आयाम स्थापित केला आहे. आपण वाळवंट आणि पर्वतीय भागातही आपल्या क्षमतेचं शानदार प्रदर्शन केलं आणि सोबतच नव्या पिढीच्या आधुनिक युध्दनीतीतही आपलं श्रेष्‍ठत्व सिध्द केलं. या ऑपरेशन दरम्यान, आपली मेड इन इंडिया शस्त्र प्रमाणांच्या कसोटीवर खरी उतरली. आज जग पाहत आहे, एकविसाव्या शतकाच्या युध्दनीतीत मेड इन इंडिया संरक्षण उत्पादनांची वेळ आली आहे.

मित्रानों,

प्रत्येक प्रकारच्या दहशतवादा विरोधात आपल्या सगळयाची एकजूट आपली सर्वात मोठी शक्ती आहे. निश्चितच हे युग युध्दाचं नाही, परंतु हे युग दहशतवादाचंही नाही. दहशतवादाविरोधात शून्य सहिष्णूता ही एका चांगल्या जगाची हमी आहे.

मित्रानों,

पाकिस्तानी सैन्य पाकिस्तानचं सरकार ज्याप्रकारे दहशतवादाला खतपाणी घालत आहे. तो एकदिवस पाकिस्तानलाच संपवून टाकेल. पाकिस्तानला यातून वाचायचं असेल तर, त्याला आपल्या दहशतवादी पायाभूत सुविधा नष्ट कराव्या लागतील. याशिवाय, शांततेचा दुसरा मार्ग नाही. भारताचं मत एकदम स्पष्ट आहे. दहशतवाद आणि संवाद एकत्र होऊ शकत नाहीत. दहशतवाद आणि व्यापार एकत्र चालू शकत नाहीत आणि पाणी आणि रक्त हे देखील एकत्र वाहू शकत नाही. मला आज जागतिक समुदायाला सांगायचं आहे. आमचं जाहीर धोरण राहिलं आहे, पाकिस्तानशी चर्चा होईल तर दहशतवादावर होईल. पाकिस्तानशी चर्चा होईल तर पाकव्याप्त काश्मीरवर होईल.

प्रिय देशवासीयांनो, आज बुध्दपौर्णिमा आहे. भगवान बुध्दांनी आपल्याला शांततेचा मार्ग दाखवला आहे. शांततेचा मार्गही शक्तीमार्गेच जातो. मानवता, शांतता आणि समृध्दीकडे अग्रेसर व्हावं. प्रत्येक भारतीयाला शांततेनं जगता यावं, विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करता यावं, यासाठी भारताचं शक्तीशाली होणं गरजेचं आहे आणि आवश्यकता असेल तेव्हा, या शक्तीचा वापरही गरजेचा आहे आणि गेल्या काही दिवसात भारतानं हेच केलं आहे. मी पुन्हा एकदा भारताचं सैन्य आणि सशस्त्रदलांना सलाम करतो. आपण भारतीयांच्या उमेद आणि एकजूटीला वंदन करतो.

धन्यवाद.

भारतमाता की जय.