“गुजरातच्या शिक्षकांसोबतचा माझा अनुभव मला राष्ट्रीय स्तरावरही धोरणात्मक आराखडा तयार करण्यासाठी उपयोगी पडला"
"अनेक जागतिक नेते अतिशय आदराने त्यांच्या भारतीय शिक्षकांची आठवण काढतात"
“मी सतत शिकणारा विद्यार्थी आहे आणि समाजात जे काही घडते त्याचे बारकाईने निरीक्षण करायला शिकलो आहे"
“कमालीचा आत्मविश्वास असलेले हे धाडसी विद्यार्थी शिक्षकांना अध्यापनाच्या पारंपारिक पद्धतीतून बाहेर पडण्याचे आव्हान देतात "
"जिज्ञासू विद्यार्थ्यांच्या आव्हानांकडे शिक्षकांनी वैयक्तिक आणि व्यावसायिक विकासाच्या संधी म्हणून पाहिले पाहिजे कारण ते आपल्याला नवनवीन गोष्टी शिकण्याची संधी देतात"
"तंत्रज्ञान माहिती पुरवू शकते मात्र दृष्टिकोन नाही"
“आज भारत 21 व्या शतकाच्या गरजांनुसार नवीन प्रणाली निर्माण करत आहे आणि हे लक्षात घेऊन नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आखण्यात आले आहे"
“सरकार प्रादेशिक भाषांमधून शिक्षणावर भर देत आहे ज्यामुळे शिक्षकांचे जीवनही सुधारेल”
“शाळेचा वर्धापन दिन साजरा केल्यास शाळा आणि विद्यार्थी यांच्यातील तुटलेले बंध पुन्हा जोडले जातील"
“शिक्षकांनी केलेला छोटासा बदलही युवा विद्यार्थ्यांच्या जीवनात अभूतपूर्व परिवर्तन घडवून आणू शकतो"

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अखिल भारतीय शिक्षक संघ अधिवेशनात सहभागी झाले. अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक महासंघाची ही 29 वी द्विवार्षिक परिषद आहे. यावेळी आयोजित प्रदर्शनाचीही पंतप्रधानांनी पाहणी केली. ‘शिक्षणातील परिवर्तनाच्या केंद्रस्थानी 'शिक्षक  ' अशी या परिषदेची संकल्पना आहे.

 

उपस्थितांना संबोधित करताना, अमृत काळात विकसित भारताचा संकल्प घेऊन पुढे वाटचाल सुरु असताना  सर्व शिक्षकांचे महत्वपूर्ण योगदान असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. गुजरातचे मुख्यमंत्री असताना प्राथमिक शिक्षकांच्या मदतीने  शिक्षण क्षेत्रात परिवर्तन घडवून आणल्याचा अनुभव सांगताना पंतप्रधानांनी निदर्शनास आणून दिले की, सध्याचे  गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार शाळांमधील विद्यार्थ्यांच्या  गळतीचे प्रमाण 40 टक्क्यांवरून 3 टक्क्यांच्याही खाली आले आहे..

गुजरातच्या शिक्षकांसोबतच्या अनुभवामुळे त्यांना राष्ट्रीय स्तरावर शैक्षणिक धोरणे आखताना मदत झाली असे पंतप्रधान म्हणाले. त्यांनी मुलींसाठी शाळांमध्ये युद्धपातळीवर शौचालये बांधण्यात आल्याचे उदाहरण दिले. आदिवासी भागात विज्ञान शिक्षण सुरू करण्यात आल्याचाही त्यांनी उल्लेख केला. भारतीय शिक्षकांप्रती जागतिक नेत्यांना असलेल्या आदराचाही पंतप्रधानांनी उल्लेख केला. परदेशी मान्यवरांना भेटल्यावर अनेकदा याबाबत ऐकायला मिळते, असे त्यांनी सांगितले. भूतान आणि सौदी अरेबियाचे राजे तसेच जागतिक आरोग्य संघटनेच्या महासंचालकांनी त्यांच्या भारतीय शिक्षकांबद्दल केलेल्या उल्लेखाचीही त्यांनी आठवण सांगितली.

 

आपण सतत शिकणारे विद्यार्थी असल्याचा अभिमान बाळगत  पंतप्रधान म्हणाले की, समाजात जे काही घडत आहे त्याचे बारकाईने निरीक्षण करण्यास मी शिकलो आहे. पंतप्रधानांनी यावेळी शिक्षकांबरोबर आपले अनुभव सामायिक केले. ते म्हणाले, एकविसाव्या शतकातील बदलत्या काळात भारताची शिक्षण व्यवस्था, शिक्षक आणि विद्यार्थी बदलत आहेत. यापूर्वी संसाधने आणि पायाभूत सुविधांची आव्हाने होती, मात्र विद्यार्थ्यांकडून फारशी आव्हाने नव्हती.  आता पायाभूत सुविधा आणि संसाधनांच्या आव्हानांवर हळूहळू उपाययोजना केली जात असताना, विद्यार्थ्यांमध्ये अमर्याद कुतूहल आहे.  कमालीचा आत्मविश्वास असलेले हे धाडसी तरुण विद्यार्थी शिक्षकांसमोर नवनवी आव्हाने ठेवत आहेत  आणि कोणत्याही विषयांवरील चर्चा पारंपारिक मर्यादेच्या पलीकडे, नव्या क्षेत्रात घेऊन जातात.

विद्यार्थ्यांकडे माहितीचे अनेक स्रोत असल्यामुळे शिक्षकांना कायम अद्ययावत आणि सतर्क रहावे लागत आहे.  "शिक्षक या आव्हानांना कसे तोंड देतात यावर आपल्या शिक्षण व्यवस्थेचे भविष्य ठरेल. " असे पंतप्रधान म्हणाले. ते म्हणाले की या आव्हानांकडे शिक्षकांनी वैयक्तिक आणि व्यावसायिक वाढीच्या संधी म्हणून पाहिले पाहिजे. "ही आव्हाने आपल्याला सातत्याने नवनवीन गोष्टी  शिकण्याची संधी देतात" याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले.

त्यांनी शिक्षकांना शिक्षक होण्यासोबतच विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक आणि गुरु व्हायला सांगितले. जगातील कोणतेही तंत्रज्ञान कोणत्याही विषयाची सखोल माहिती कशी मिळवायची हे शिकवू शकत नाही आणि जेव्हा भरमसाठ माहिती मिळते तेव्हा मुख्य विषयावर लक्ष केंद्रित करणे हे विद्यार्थ्यांसाठी आव्हान बनते याचा पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला.  त्यामुळे एखाद्या मुद्द्याचा सखोल अभ्यास करून तर्कसंगत  निष्कर्षापर्यंत पोहोचण्याच्या गरजेवर मोदी यांनी भर दिला. म्हणूनच  एकविसाव्या शतकात विद्यार्थ्यांच्या जीवनात शिक्षकांची भूमिका पूर्वीपेक्षा अधिक अर्थपूर्ण झाली आहे, असे पंतप्रधान म्हणाले. प्रत्येक पालकाची इच्छा असते  की त्यांच्या पाल्यांना उत्तम शिक्षक मिळावेत आणि त्यांच्या आशा पूर्णपणे त्यांच्यावरच अवलंबून असतात असे पंतप्रधान म्हणाले.

शिक्षकांकडून  शिकवल्या जाणाऱ्या  विषयाबद्दलच केवळ विद्यार्थ्यांना ज्ञान  मिळत नाही  तर संयम, धैर्य, आपुलकी आणि निःपक्षपाती वर्तन या गुणांसह  संवाद कसा साधायचा आणि   विचार कसे मांडायचे हे देखील विद्यार्थी त्यांच्याकडून  शिकत असतात , असे पंतप्रधानांनी शिक्षकांच्या विचारांचा  आणि वर्तनाचा विद्यार्थ्यांवर प्रभाव पडतो हे अधोरेखित करताना  नमूद केले. पंतप्रधानांनी प्राथमिक शिक्षकांचे महत्त्व अधोरेखित करत  कुटुंबाव्यतिरिक्त मुलांसोबत  सर्वाधिक वेळ घालवणारे  शिक्षक पहिले व्यक्ती असतात  असे  त्यांनी नमूद केले. “शिक्षकांच्या  जबाबदाऱ्यांची जाणीव  देशाच्या भावी पिढ्यांना अधिक बळकट करेल”, असे पंतप्रधान म्हणाले.

नवीन राष्ट्रीय शिक्षण  धोरणाबाबत बोलताना पंतप्रधानांनी, या धोरणाच्या निर्मितीमध्ये लाखो शिक्षकांनी दिलेल्या योगदानाबद्दल अभिमान व्यक्त केला."आज भारत 21 व्या शतकातील गरजांनुसार नवीन व्यवस्था  तयार करत आहे आणि हे लक्षात घेऊन नवीन राष्ट्रीय शिक्षण  धोरण तयार करण्यात आले आहे",असे त्यांनी सांगितले.  विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञानापुरते मर्यादित ठेवणाऱ्या जुन्या अप्रासंगिक  शिक्षण पद्धतीची जागा राष्ट्रीय शिक्षण धोरण घेत आहे, असे ते म्हणाले. हे नवीन धोरण व्यावहारिक आकलनावर आधारित आहे असे सांगत पंतप्रधानांनी त्यांच्या बालपणापासूनच्या शिकण्याच्या वैयक्तिक अनुभवांची आठवण करून दिली आणि शिकण्याच्या प्रक्रियेत शिक्षकांच्या वैयक्तिक सहभागाच्या सकारात्मक फायद्यांवर भर दिला.

राष्ट्रीय शिक्षण  धोरणात मातृभाषेतून शिक्षणाच्या तरतुदीवर प्रकाश टाकत  भारतावर ब्रिटिशांनी  200 वर्षांहून अधिक काळ राज्य केले  तरी इंग्रजी भाषा काही मोजक्या लोकांपर्यंतच मर्यादित असल्याकडे  पंतप्रधानांनी लक्ष वेधले. मात्र त्यांनतर निर्माण झालेल्या व्यवस्थेने इंग्रजीतून शिकण्याला प्राधान्य दिल्याने प्रादेशिक भाषांमध्ये शैक्षणिक अभ्यासक्रम  शिकलेल्या प्राथमिक शिक्षकांना याचा  फटका बसला.मात्र विद्यमान सरकारने प्रादेशिक भाषांमध्ये शिक्षण सुरू करून त्यात परिवर्तन केले, यामुळे  प्रादेशिक भाषांना प्राधान्य देणाऱ्या शिक्षकांच्या नोकऱ्या वाचल्या, याचा उल्लेख पंतप्रधानांनी केला. "सरकार प्रादेशिक भाषांमधील शिक्षणावर भर देत आहे ज्यामुळे शिक्षकांचे जीवनमान  देखील सुधारेल", असे पंतप्रधानांनी नमूद केले.

शिक्षक होण्यासाठी लोक पुढे येतील असे वातावरण निर्माण करण्याच्या गरजेवर पंतप्रधानांनी भर दिला.शिक्षकी पेशा  हा व्यवसाय म्हणून आकर्षक करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.   प्रत्येक शिक्षकाने मनापासून शिक्षक असायला हवे, असे ते म्हणाले.

 

गुजरातचे मुख्यमंत्री झाल्यांनतर दोन वैयक्तिक इच्छांविषयी  पंतप्रधान यावेळी बोलले. पहिली इच्छा म्हणजे आपल्या  शालेय मित्रांना मुख्यमंत्री निवासस्थानी बोलावणे आणि दुसरी इच्छा सर्व शिक्षकांचा सन्मान करण्याची होती असे त्यांनी सांगितले. आजही आपण   त्यावेळच्या  शिक्षकांच्या संपर्कात असल्याचे पंतप्रधान    मोदी म्हणाले. शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील वैयक्तिक स्नेहबंध कमी होत असल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली .मात्र  क्रीडा क्षेत्रात हे बंध अजूनही बळकट आहेत , असे ते म्हणाले.  त्याचप्रमाणे, विद्यार्थी शाळा सोडल्यानंतर शाळेला विसरतात त्यामुळे  विद्यार्थी आणि शाळा यांच्यातील संपर्क तुटतो, हे पंतप्रधानांनी नमूद केले. विद्यार्थ्यांना, अगदी व्यवस्थापनालाही शिक्षण संस्थेच्या स्थापनेच्या तारखेची माहिती नसते.शाळेचा वाढदिवस साजरा केल्याने शाळा आणि विद्यार्थी यांच्यातील संपर्क पुन्हा प्रस्थापित होतील ,असे ते म्हणाले.

शाळेतील एकही मूल उपाशी राहू नये म्हणून संपूर्ण समाज एकत्र येत आहे, असे सांगत पंतप्रधानांनी शाळांमध्ये दिल्या जाणाऱ्या भोजनाचे  महत्त्व अधोरेखित केले. विद्यार्थ्यांना त्यांच्या दुपारच्या भोजनाच्‍या सुट्टीमध्‍ये   गावातील  वृद्धांना आमंत्रित करावे जेणेकरून   मुलांमध्ये  परंपरा रुजवल्या जातील आणि दिल्या जाणाऱ्या भोजनाबद्दल जाणून घेण्यासाठी त्यांना संवाद साधण्याचा अनुभव मिळेल, असे पंतप्रधानांनी सुचवले.

मुलांना  स्वच्छतेच्या सवयी लावण्याचे महत्त्व सांगताना पंतप्रधानांनी आदिवासी भागातील एका शिक्षिकेच्या योगदानाची आठवण केली. , ही शिक्षिका  तिच्या जुन्या साडीचे काही भाग कापून मुलांसाठी रुमाल बनवते, हा रुमाल विद्यार्थ्यांच्या गणवेशाला पिनाने लावून  त्याचा वापर चेहरा किंवा नाक पुसण्यासाठी करता  येतो.  विद्यार्थ्यांच्या एकूण रूपाचे  मूल्यांकन करण्यासाठी शिक्षकांनी आरसा ठेवला होता हे आदिवासी शाळेतील एक उदाहरण देखील त्यांनी  सांगितले.  या या सूक्ष्म  बदलामुळे मुलांचा आत्मविश्वास वाढवण्यात मोठा फरक पडल्याचे पंतप्रधान म्हणाले.

शिक्षकांनी केलेला एक छोटासा प्रयत्न  तरुण विद्यार्थ्यांच्या जीवनात महत्त्वपूर्ण बदल घडवून आणू शकतो, असे पंतप्रधानांनी भाषणाचा समारोप करताना,  अधोरेखित केले . शिक्षकांना सर्वोच्च मानणाऱ्या भारतातील परंपरा सर्व शिक्षक पुढे नेतील आणि विकसीत भारताचे स्वप्न साकार करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

गुजरातचे मुख्यमंत्री  भूपेंद्र पटेल, खासदार  सी आर पाटील, केंद्रीय मंत्री  पुरुषोत्तम रूपाला, केंद्रीय राज्यमंत्री डॉ मुंजपारा महेंद्रभाई, अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष  रामपाल सिंह , संसद सदस्य आणि गुजरात सरकारचे मंत्री  या कार्यक्रमाला उपस्थित होते.

 

 

 

 

 

 

 

 

 

संपूर्ण भाषण वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
India produced record rice, wheat, maize in 2024-25, estimates Centre

Media Coverage

India produced record rice, wheat, maize in 2024-25, estimates Centre
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 10 मार्च 2025
March 10, 2025

Appreciation for PM Modi’s Efforts in Strengthening Global Ties