“युवा शक्ती हा विकसित भारताचा पाया आहे”
“महादेवाच्या आशीर्वादाने, गेल्या 10 वर्षांपासून काशीमध्ये ‘विकासाचा डमरू’निनादत आहे”
“काशी हे केवळ आपले श्रद्धेय तीर्थस्थान नाही, तर भारताच्या चिरंतन जाणिवेचे स्फूर्तीदायक केंद्र आहे”
“विश्वनाथ धाम एक निर्णायक दिशा देईल आणि भारताला उज्ज्वल भविष्याकडे नेईल”
“नूतन काशी नव्या भारतासाठी एक प्रेरणास्थानाच्या रुपात उदयाला आली आहे”
“भारत ही एक संकल्पना आहे आणि संस्कृत ही त्याची मुख्य अभिव्यक्ती आहे. भारत हा एक प्रवास आहे,संस्कृत हा त्याच्या इतिहासातील मुख्य अध्याय आहे. भारत ही विविधतेत एकता असलेली भूमी आहे आणि संस्कृत हे त्याचे उगमस्थान आहे”
“वारसा आणि विकास यांचा उत्तम नमुना म्हणून आज काशीकडे बघितले जाते. परंपरा आणि अध्यात्मिकता यांच्या सभोवताली आधुनिकता कशा प्रकारे विस्तारते हे आज संपूर्ण जग बघत आहे”
“काशी आणि कांची येथील वेदपठण म्हणजे ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ संकल्पनेचे सूर आहेत”

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वाराणसी येथील काशी  हिंदू विद्यापीठामध्ये स्वातंत्र्य सभागार येथे आयोजित सांसद संस्कृत प्रतियोगितेच्या पारितोषिक वितरण समारंभात भाग घेतला. तसेच त्यांनी यावेळी काशी सांसद  स्पर्धा आणि एक कॉफी टेबल बुक यांचे प्रकाशनही   केले. पंतप्रधानांनी या कार्यक्रमात  काशी सांसद ज्ञान स्पर्धा, काशी सांसद छायाचित्रण स्पर्धा तसेच काशी सांसद संस्कृत स्पर्धा या स्पर्धांच्या विजेत्यांना पारितोषिके देऊन गौरवले तसेच वाराणसीमध्ये संस्कृत विषय शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना पुस्तके, गणवेश संच, संगीताची वाद्ये तसेच गुणवत्ता शिष्यवृत्ती यांचे वितरण केले. त्यांनी काशी सांसद छायाचित्रण स्पर्धा दालनाला देखील भेट दिली आणि ‘संवरती काशी’ या संकल्पनेवर आधारित स्पर्धेत आपापल्या छायाचित्रांच्या प्रवेशिकांसह सहभागी झालेल्या स्पर्धकांशी संवाद साधला.

 

यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना, पंतप्रधानांनी प्रतिभावंत युवा सदस्यांमध्ये उपस्थित राहण्याची संधी मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आणि ते म्हणाले की यावेळी मनात ज्ञानाच्या गंगेत डुबकी घेतल्यासारखी भावना निर्माण झाली आहे. या प्राचीन शहराची ओळख आणखी सशक्त करत असलेल्या युवा पिढीच्या प्रयत्नांची त्यांनी प्रशंसा केली. पंतप्रधान मोदी म्हणाले की भारतातील युवक अमृत काळात देशाला  नव्या उंचीवर घेऊन जात आहेत ही अत्यंत अभिमानाची आणि समाधानाची बाब आहे. काशी शहराचे कार्यकर्तुत्व आणि स्वरूप यांना पुन्हा पूर्वीचे वैभव प्राप्त होत आहे ही देशासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे ही बाब अधोरेखित करत पंतप्रधान म्हणाले, “काशी ही चिरंतन  ज्ञानाची राजधानी आहे.” काशी सांसद ज्ञान स्पर्धा, काशी सांसद छायाचित्रण स्पर्धा तसेच काशी सांसद संस्कृत स्पर्धा या स्पर्धांच्या विजेत्यांचा आज गौरव होत असल्याचे सांगून त्यांनी या विजेत्यांचे अभिनंदन केले. ज्यांना या स्पर्धेत विजयी होता आले नाही त्यांना देखील पंतप्रधानांनी प्रोत्साहन दिले. या स्पर्धांतील सर्वच सहभागी प्रशंसेला पात्र आहेत हे नमूद करून ते म्हणाले, “कोणताही स्पर्धक पराभूत झालेला अथवा इतरांच्या मागे राहून गेलेला नाही, उलट, प्रत्येकाला या अनुभवातून शिकायला मिळाले आहे.” काशीतून विजयी झालेले खासदार म्हणून त्यांनी मांडलेल्या संकल्पनांवर पुढे कार्य करत राहिल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांनी श्री काशी विश्वनाथ न्यास, काशी विद्वत परिषद आणि काशीमधील विद्वान जगताचे आभार मानले. आज प्रकाशित झालेल्या कॉफी टेबल बुक मध्ये गेल्या 10 वर्षांत झालेल्या काशीच्या कायापालटाची कथा आहे याची देखील त्यांनी नोंद घेतली.

 

गेल्या 10 वर्षांच्या काळात काशीने केलेल्या प्रगतीची नोंद घेताना, पंतप्रधानांनी, आपण सर्वजण भगवान महादेवाच्या हातातील केवळ साधने आहोत अशी भावना स्पष्टपणे व्यक्त केली. ते म्हणाले की महादेवाच्या आशीर्वादाने, गेल्या 10 वर्षांपासून वाराणसीमध्ये ‘विकासाचा डमरू’ निनादतो आहे. कोट्यवधी रुपयांच्या प्रकल्पांबद्दल बोलताना, पंतप्रधान म्हणाले की शिवरात्र आणि रंगभरी एकादशी या सणांच्या आधीच काशी आज विकासाचा उत्सव साजरा करत आहे. ते म्हणाले की, ‘विकासाच्या गंगे’द्वारे झालेले परिवर्तन सर्वांनीच पाहिले आहे.

पंतप्रधान म्हणाले की, “काशी हे केवळ आपले श्रद्धेय तीर्थस्थान नाही, तर भारताच्या शाश्वत जाणिवेचे स्फूर्तीदायक केंद्र आहे,” जगभरात प्राचीन काळापासून असलेली भारताची प्रतिष्ठा केवळ आर्थिक पराक्रमावर आधारित नाही तर त्यामागे देशाची सांस्कृतिक, अध्यात्मिक आणि सामाजिक समृद्धी देखील आहे. भारताच्या ज्ञान परंपरेचे सांस्कृतिक आणि अध्यात्मिक दृष्टीने महत्वाच्या स्थळांशी असलेले  नाते अधोरेखित करत पंतप्रधान म्हणाले की काशी आणि  विश्वनाथ धाम सारखी ‘तीर्थस्थळे’ म्हणजे देशाच्या विकासातील ‘यज्ञशाळा’ आहेत. हा मुद्दा सोदाहरण स्पष्ट करताना पंतप्रधान म्हणाले की काशीनगरी ही भगवान शंकराची भूमी तर आहेच, शिवाय भगवान बुद्धांच्या शिकवणुकीचे स्थान आहे; जैन तीर्थांकरांचे जन्मस्थान आहे आणि आदी शंकराचार्यांना जिथे साक्षात्कार झाला ती भूमी आहे. काशीबद्दल वाटणाऱ्या वैश्विक आकर्षणाचा उल्लेख करून पंतप्रधान म्हणाले की देश आणि जगाच्या विविध भागांमधील लोक काशीला येतात. "अशा वैविध्यपूर्ण वातावरणात नवीन आदर्शांचा जन्म होतो. अभिनव कल्पनांमुळे प्रगतीच्या शक्यता कित्येक पटींनी वाढतात , असे पंतप्रधान म्हणाले.

 

विश्वनाथ धाम मुळे एक निर्णायक दिशा मिळेल आणि तीच भारताला एका उज्ज्वल भविष्याकडे घेऊन जाईल असे काशी विश्वनाथ धामच्या उद्घाटनावेळी केलेल्या भाषणाची आठवण करून आणि त्या  विश्वासाला दुजोरा देत पंतप्रधान म्हणाले. विश्वनाथ धाम कॉरिडॉर आज एका विद्बत्तापूर्ण  घोषणेचे  साक्षीदार आहे आणि न्यायाच्या धर्मग्रंथांच्या परंपरांचे पुनरुज्जीवन करत आहे यावर त्यांनी भर दिला. काशी मध्ये  शास्त्रीय सुरावटी बरोबरच धर्मग्रंथांमधील संवाद ही ऐकू येतील, ज्यामुळे कल्पनांच्या देवाणघेवाणीला प्रोत्साहन मिळेल, प्राचीन ज्ञानाचे जतन होईल आणि एक नवीन विचारधारा तयार होईल, असे त्यांनी सांगितले. काशी सांसद संस्कृत स्पर्धा आणि काशी सांसद ज्ञान स्पर्धा हे या प्रयत्नांचाच एक भाग असून संस्कृत शिकू इच्छिणाऱ्या हजारो युवक युवतींना शिष्यवृत्ती सोबत पुस्तके, वस्त्र आणि इतर आवश्यक गोष्टी दिल्या जातात. शिक्षकांनाही सहाय्य दिले  जात आहे. "विश्वनाथ धाम काशी तमिळ संगम आणि गंगा पुष्करुलु महोत्सव सारख्या 'एक भारत, श्रेष्ठ भारत' मोहिमेचा देखील भाग बनला आहे" श्रद्धेचे हे केंद्र आदिवासी समाजाच्या सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून सामाजिक जीवनात सर्वसमावेशकता आणत आहे. काशी मधील व्यासंगी आणि विद्वत परिषद आधुनिक विज्ञानाच्या दृष्टीने प्राचीन ज्ञानाचे संशोधन करत आहेत, असे पंतप्रधान म्हणाले. मंदिराच्या ट्रस्टने शहरात अनेक ठिकाणी मोफत भोजनाची व्यवस्था केल्याचेही त्यांनी सांगितले. "नवीन काशी ही नवभारताची प्रेरणा म्हणून उदयाला आली आहे" असे सांगून श्रद्धेचे केंद्र कशाप्रकारे सामाजिक आणि राष्ट्रीय संकल्पांसाठी ऊर्जेचे केंद्र बनले आहे, ते पंतप्रधानांनी विशद केले. काशीमधून येणारे युवक हे जगामध्ये भारताच्या ज्ञान, परंपरा आणि संस्कृतीचे ध्वजवाहक असतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

आपले ज्ञान, विज्ञान आणि आध्यात्मिकतेच्या  विकासात अतिशय मोठे योगदान देणाऱ्या अनेक भाषांपैकी संस्कृत ही एक प्रमुख भाषा आहे. भारत ही एक कल्पना आहे तर संस्कृत त्याची प्रमुख अभिव्यक्ती आहे. भारत एक प्रवास आहे, संस्कृत हा त्याच्या इतिहासाचा मुख्य अध्याय आहे. भारत ही विविधतेत एकता जपणारी भूमी आहे तर त्याचे मूळ संस्कृत आहे, असे पंतप्रधान म्हणाले. एके काळी खगोलशास्त्र, गणित, औषध, साहित्य, संगीत आणि कला यांतील संशोधनासाठी संस्कृत ही मुख्य भाषा होती. भारताला या सर्व शाखांमधून स्वतःची ओळख मिळाली, असे त्यांनी सांगितले. काशी आणि कांचीमध्ये होणारे वेदांचे पठण हे ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ च्या नोंदी आहेत. आज काशीकडे वारसा आणि विकास यांचा आदर्श म्हणून बघितले जाते. परंपरा आणि आध्यात्मिकतेच्या चौकटीत कशाप्रकारे आधुनिकतेचा विस्तार होऊ शकतो, हे संपूर्ण जग पाहत आहे.  नवीन बांधलेल्या  मंदिरात प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा झाल्यावर अयोध्या नगरी अगदी काशी प्रमाणेच बहरत आहे, याचा त्यांनी उल्लेख केला.  पंतप्रधानांनी कुशीनगर येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाचा उल्लेख केला आणि केंद्र सरकार कशाप्रकारे बुद्धांच्या जीवनाशी निगडित स्थानांना पायाभूत सेवा सुविधांनी विकसित करण्यासाठी प्रयत्न करत आहे, ते सांगितले. येत्या पाच वर्षात देशाच्या विकासाला एक नवीन गती मिळेल आणि यशाचे नवनवीन आकृतिबंध  पाहायला मिळतील असे ते म्हणाले. “ही मोदींची हमी आहे आणि मोदींची हमी म्हणजे हमी पूर्ण होण्याची हमी, असे पंतप्रधानांनी सांगितले मतदानाच्या माध्यमातून निवडलेली प्रदर्शनातील सर्वोत्तम छायाचित्रे पर्यटकांसाठी चित्र पोस्टकार्ड म्हणून वापरावीत, असे पंतप्रधानांनी सांगितले. स्केचिंग अर्थात रेखाचित्रांची स्पर्धा घेऊन  सर्वोत्कृष्ट स्केचेसचे  चित्र पोस्टकार्ड बनवण्याची सूचनाही त्यांनी केली. काशीचे राजदूत आणि दुभाषी तयार करण्यासाठी गाईड च्या स्पर्धा घेण्याच्या सूचनेचा त्यांनी पुनरुच्चार केला. काशी मधील लोक हे सर्वात मोठे सामर्थ्य असून काशी मधील प्रत्येक नागरिकाला एक मित्र आणि एक सेवक या नात्याने मदत करण्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.

 

यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उत्तर प्रदेश सरकार मधील मंत्री उपस्थित होते.

 

संपूर्ण भाषण वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Oman, India’s Gulf 'n' West Asia Gateway

Media Coverage

Oman, India’s Gulf 'n' West Asia Gateway
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Prime Minister condoles passing of renowned writer Vinod Kumar Shukla ji
December 23, 2025

The Prime Minister, Shri Narendra Modi has condoled passing of renowned writer and Jnanpith Awardee Vinod Kumar Shukla ji. Shri Modi stated that he will always be remembered for his invaluable contribution to the world of Hindi literature.

The Prime Minister posted on X:

"ज्ञानपीठ पुरस्कार से सम्मानित प्रख्यात लेखक विनोद कुमार शुक्ल जी के निधन से अत्यंत दुख हुआ है। हिन्दी साहित्य जगत में अपने अमूल्य योगदान के लिए वे हमेशा स्मरणीय रहेंगे। शोक की इस घड़ी में मेरी संवेदनाएं उनके परिजनों और प्रशंसकों के साथ हैं। ओम शांति।"