QuoteIndian classical music is majestic, creates a magic and is mystic: PM
QuoteIndian classical music unifies the entire country. This is the strength of our music: PM Modi
QuoteClimate change is a pressing global challenge. Need of the hour is to protect our environment: PM
QuoteCulture and music can play a vital role in connecting the country. It can be a big step towards realising 'Ek Bharat, Shreshtha Bharat': PM
Quote'Yuva Shakti' of our nation can take the country to newer heights, says PM Modi

त्रिपुराचे राज्यपाल श्री तथागत रॉय, हरियाणाचे राज्यपाल प्राध्यापक कप्तान सिंह सोलंकी, मंत्रिमंडळातील माझे सहकारी श्री, सुरेश प्रभू, स्पिक मॅके सल्लागार मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर कर्ण सिंह, अध्यक्ष श्री. अरुण सहाय, कार्यक्रमात उपस्थित इतर मान्यवर आणि माझे तरुण सहकारी

स्पिक मॅकेच्या स्थापनेच्या 40 व्या वर्धापनदिनाच्या पार्श्वभूमीवर होणा-या या पाचव्या आंतरराष्ट्रीय परिषदेबद्दल तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. या संस्थेने शास्त्रीय संगीत, कला, साहित्य, लोक-संस्कृती यांच्या माध्यमातून भारतीय वारशाचे संवर्धन करण्यात अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली आहे. देशातील लाखो युवकांना देशाच्या संस्कृतीबाबत जागरुक आणि प्रेरित केले जात आहे. या आयोजनाबद्दल मी प्राध्यापक किरण शेठ यांचे विशेष करून अभिनंदन करत आहे. प्राध्यापक किरण शेठ गेल्या 40 वर्षांपासून या सांस्कृतिक आंदोलनाला एक कुशल नेतृत्व प्रदान करत आहेत. ते एक असे साधक आहेत ज्यांनी अनेक वर्षांच्या साधनेने भारतीय संगीत आणि संस्कृतीला युवकांमध्ये जिवंत ठेवले आहे. सहकाऱ्‍यांनो, खरा साधक आपल्या विचारांनी आपल्या धारणांनी फकीर असतात. मोह-मायेपासून लांब असतात. मी एक किस्सा वाचला होता. ज्यावेळी संगीताच्या एका साधकाला माजी राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी विचारले होते की, त्यांना सरकारकडून कोणत्या प्रकारच्या मदतीची अपेक्षा आहे. त्या साधकाने एका विशेष रागाचे नाव घेत सांगितले की, अनेक कलाकार हा रोग योग्य प्रकारे गात नाहीत त्याची थट्टा करतात. या प्रकाराला सरकार आळा घालू शकेल का? त्यांचे हे उत्तर ऐकून डॉक्टर राजेंद्र प्रसाद हसून मान खाली घातली होती. संगीताच्या क्षेत्रात शासन नाही तर अनुशासन म्हणजे शिस्त आवश्यक असते. गेल्या 40 वर्षात तुमच्या सोसायटीने ज्या शिस्तबद्ध पद्धतीने केवळ एकाग्र चित्ताने देशाच्या कानाकोप-यातील शाळा आणि महाविद्यालयात जाऊन गाव आणि शहरांना या कार्यक्रमाशी जोडले आहे, अतिशय कमी मानधन घेऊन कलाकारांना आपल्यासोबत काम करायला तयार केले आहे, साधने एकत्र केली आहेत, संसाधने जमा केली आहेत, ही बाब खरोखरच अतुलनीय आहे. या संस्थेने आपल्या समर्थकांच्या माध्यमातून एका अशा कुटुंबाची निर्मिती केली आहे ज्याने भारतीय संस्कृतीला भौगोलिक सीमांच्या परीघातून बाहेर काढत जगाला जागरुक करण्यात मोठी भूमिका बजावली आहे. आज आंतरराष्ट्रीय परिषदेच्या या प्रसंगी मी तुम्हा सर्वांबरोबरच त्या सर्व महान कलाकारांनाही शुभेच्छा देत आहे, जे गेल्या 40 वर्षांपासून या कामासाठी आपले पाठबळ देत आले आहेत. त्या सर्व व्यक्ती आणि संघटनांनाही मी शुभेच्छा देत आहे ज्यांनी प्रदीर्घ काळापासून या सांस्कृतिक आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.

|

या कार्यक्रमात सहभागी होणारे देशातील आणि परदेशातील विद्यार्थी अतिशय भाग्यवान आहेत कारण त्यांना भारतातील प्रतिष्ठित कलाकारांच्या एका नव्हे तर अनेक संगीत समारंभांना उपस्थित राहण्याची संधी मिळाली आहे. या संगीत समारंभात तुम्ही देशाच्या सांस्कृतिक विविधतेचा, त्याच्या भव्यतेचा, सुंदरतेचा, शिस्तीचा, विनम्रतेचा, सहृदयतेचा अनुभव घ्या. ही आपल्या महान देशाची प्रतीके आहेत, आपल्या भारत मातेची प्रतीके आहेत. 

मित्रांनो, आपल्या देशाच्या मातीतून निर्माण झालेले हे संगीत, इथल्या निसर्गातून जन्माला आलेले संगीत केवळ ऐकण्याचा आनंद देत नाही तर हे संगीत हृदय आणि मेंदूपर्यंत पोहोचते. भारतीय संगीताचा प्रभाव व्यक्तीच्या विचारांवर, त्याच्या मनावर आणि त्याच्या मानसिकतेवरही पडत असतो. 

जेव्हा आपण शास्त्रीय संगीत ऐकतो, त्यावेळी शैली कोणतीही असो, ठिकाण कोणतेही असो, जरी आपल्याला ते समजले नाही तरीही जर आपण काही काळ ते लक्षपूर्वक ऐकले तर एका वेगळ्याच शांततेची अनुभूती मिळते. आपल्या पारंपरिक जीवनशैलीतही संगीत सर्वत्र ठासून भरले आहे. जगासाठी संगीत एक कला आहे, अनेक लोकांसाठी संगीत उपजीविकेचे साधन आहे पण भारतात संगीत एक साधना आहे, जीवन जगण्याची एक पद्धत आहे. 

वैभव, जादू आणि गूढ ही त्रिगुणी भारतीय संगीताची संपदा आहे. हिमालयाची उंची, माता गंगेची खोली, अजिंठा-एलो-याचे सौंदर्य, ब्रह्मपुत्रेची विशालता, सागराच्या लाटांसारखे पदलालित्य आणि भारतीय समाजात रुजलेली आध्यात्मिकता या सर्वांचे एकत्रित प्रतीक बनते. म्हणूनच संगीताच्या शक्तीला समजून घेण्यात  आणि समजावण्यात लोक आपले आयुष्य खर्ची घालतात. भारतीय संगीत, मग ते लोकसंगीत असो वा शास्त्रीय संगीत असो किंवा अगदी चित्रपट संगीतही का असू नये, या संगीताने नेहमीच देश आणि समाजाला जोडण्याचे काम केले आहे. धर्म-पंथ-जातीच्या सामाजिक चौकटींना तोडून सर्वांना एका स्वरात एकजूट होऊन , एकत्र राहण्याचा संदेश संगीताने दिला आहे. उत्तरेचे हिंदुस्तानी संगीत, दक्षिणेचे कर्नाटक संगीत, बंगालचे रवींद्र संगीत, आसामचे ज्योती-संगीत, जम्मू-काश्मीरचे सूफी संगीत हे आपल्या गंगा-यमुनेची संस्कृती या सर्वांचा पाया आहे. ज्यावेळी परदेशातून भारतात कोणी संगीत आणि नृत्य कला शिकण्यासाठी, त्या जाणून घेण्यासाठी येतात तेव्हा आपल्याकडे पाय, हात, शिर आणि शरीराच्या मुद्रांवर आधारित कितीतरी नृत्य शैली आहेत ते ऐकल्यावर अचंबित होऊन जातो. या नृत्य शैली वेगवेगळ्या कालखंडात, वेगवेगळ्या भागात विकसित झालेल्या आहेत, त्यांची वेगळी ओळख आहे. त्यांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे आपल्याकडील लोकसंगीत, विविध जातीजमातींनी आपल्या निरंतर साधनेने विकसित केले आहे. त्या काळातील सामाजिक व्यवस्थांना, कुप्रथांना तोडत त्यांनी आपली शैली, सादरीकरणाची पध्दत आणि कथा सांगण्याच्या आपल्या पद्धती विकसित केल्या. लोकगायक, नर्तकांनी स्थानिक लोकांच्या गोष्टींचा उपयोग करून आपल्या शैलीची निर्मिती केली. या शैलीत कठोर प्रशिक्षणाची गरज नव्हती आणि त्यात सर्वसामान्य जनताही सहभागी होऊ शकत होती. तुमच्यातील बहुतेक लोकांना आपल्या संस्कृतीच्या या बारकाव्यांची आणि तिच्या विस्तारांची चांगली जाण आहे. पण सध्याच्या तरुण पिढीतील बऱ्‍याच जणांना याविषयी माहिती नाही. याच उदासीनतेमुळे अनेक वाद्ये आणि संगीताचे प्रकार लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. लहान मुलांना गिटारच्या विविध प्रकारांची माहिती असते पण सरोद आणि सारंगीतील फरक फारच थोड्यांना माहित असेल. ही परिस्थिती योग्य नाही. भारताचे संगीत, हा वारसा, या देशासाठी, आपल्या सर्वांसाठी एका आशीर्वादासारखा आहे. एक महान सांस्कृतिक वारसा आहे. त्याची स्वतःची शक्ती आहे, उर्जा आहे. आपल्या शास्त्रांमध्ये सांगितले गेले आहे की राष्ट्रयाम जाग्रयाम वयम सार्वकालीक दक्षता हेच स्वातंत्र्याचे मोल आहे. आपल्याला प्रत्येक क्षण दक्ष राहिले पाहिजे. आपल्याला आपल्या वारशासाठी प्रत्येक क्षण काम केले पाहिजे. आपल्या वारशाबाबत आपण बेफिकीर राहून चालणार नाही. आपली संस्कृती, आपली कला, आपले संगीत, आपले साहित्य, आपल्या वेगवेगळ्या भाषा, आपला निसर्ग आपला अमूल्य वारसा आहेत. कोणताही देश आपल्या वारशाचे विस्मरण करून पुढे जाऊ शकलेला नाही. या वारशाचा सांभाळ करणे, तो सशक्त करणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. 

मित्रांनो, आज जागतिक पर्यावरण दिवस देखील आहे आणि आपले संगीत, आपली कला आपल्या निसर्गाला वाचवण्याचा सातत्याने संदेश देत असते. 

सध्याच्या काळात संपूर्ण जगात हवामान बदल एक चिंतेचा विषय बनलेला आहे. भावी काळातील पिढ्यांसाठी, भविष्यासाठी आपल्याला आपल्या पर्यावरणाचा बचाव करावाच लागेल. गेल्या तीन वर्षात पर्यावरण रक्षणासाठी भारताने जी पावले उचलली आहेत आज संपूर्ण जगात त्याचीच चर्चा आहे. जग भारताकडे पाहत आहे आणि म्हणूनच देशातील तरुणांना पर्यावरण संरक्षणाबाबत, आपल्या वारशाचे रक्षण करण्याबाबत जागरुक केले पाहिजे. 

तुम्ही एका वर्षात सात ते आठ हजार कार्यक्रम करता, देशातील शेकडो शहरांमध्ये, गावांमध्ये, वाड्यांमध्ये लाखो लोकांशी विशेषतः तरुणांशी संवाद साधता. जर तुम्ही तुमच्या कार्यक्रमामध्ये पर्यावरणाविषयी जागरुकतेला प्राधान्य दिले तर ही देखील मानवतेची एक मोठी सेवा ठरेल. 

तुम्ही सर्व एक भारत-श्रेष्ठ भारत अभियान मजबूत करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावू शकता. एक भारत-श्रेष्ठ भारत अभियान देशाची सांस्कृतिक विविधता बळकट करण्याचा, देशाच्या नागरिकांना आपल्या देशाच्या भूमीवर अस्तित्वात असलेल्या वेगवेगळ्या परंपरा, भाषा, जेवणा-खाण्याच्या पद्धती, राहणीमान यांच्याशी परिचित करून देण्याचा एक प्रयत्न आहे. याअंतर्गत दोन वेगवेगळ्या राज्यांना एका व्यासपीठावर आणून त्यांची जोडी तयार केली जात आहे. जोडी तयार केल्यावर एका राज्याच्या लोकांना दुस-या राज्याच्या बाबतीत जागरुक करण्याचा प्रयत्न केला जात आहे. दुस-या राज्याच्या भाषेवर आधारित प्रश्नमंजुषा, नृत्यस्पर्धा,खाण्यापिण्याच्या स्पर्धा अशा वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धांचं आयोजन केले जात आहे. 

तुमच्या सारखी संस्था या पातळीवर देखील या साखळीला पुढे नेऊ शकते. तुम्ही वेगवेगळ्या राज्यातील ज्या शाळांमध्ये जाता त्यांना परस्परांमध्ये अशा प्रकारची जोडणी तयार करायला प्रेरित करू शकता, शाळेच्या व्यवस्थापनाशी संवाद स्थापित करू शकता. 

गेल्या 40 वर्षांपासून तुम्ही तरुणांच्या उर्जेला एक दिशा देण्याचा प्रयत्न करत आहात. आता तर आपला देश जगातील सर्वात तरुण देश आहे. तरुणाईची उर्जा आणि युवा जोश यांनी भरलेला आहे. या उर्जेला राष्ट्रनिर्मितीच्या कार्यात सहभागी करण्यासाठी तुमच्या सारख्या संस्था बरेच काही करू शकतात. ज्या देशात तरुणाईची शक्ती संघटित होऊन राष्ट्रनिर्मितीच्या कार्यात गुंतत जाते तो देश विकासाच्या नव्या उंचीवर पोहोचला आहे, याचा इतिहास साक्षीदार आहे. 

मित्रांनो, 2022 मध्ये आपला देश स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षात प्रवेश करणार आहे. त्या काळापर्यंत आपल्या देशाला ब-याचशा कुप्रथांपासून, अनेक दोषांपासून दूर करून पुढे न्यायचे आहे. नवीन भारत निर्माण करायचा आहे. नवीन भारताचा हा संकल्प देशातील प्रत्येक व्यक्तीचा, प्रत्येक कुटुंबाचा, प्रत्येक घराचा, प्रत्येक संस्थेचा, प्रत्येक संघटनेचा, प्रत्येक शहराचा-गावाचा- गल्लीबोळाचा संकल्प आहे. या संकल्पाला पूर्ण करण्यासाठी आपल्या सर्वांना एकत्र होऊन काम करावे लागेल. 

माझा तुम्हाला आग्रह आहे की, तुम्ही देखील वर्ष 2022 लक्षात घेऊन आपल्यासाठी काही करण्याचे लक्ष्य नक्की निर्धारित करा. 

सहकाऱ्‍यांनो, परंपरांचा वर्तमानाशी संवादच संस्कृती जिवंत राखत असतो. स्पिक मॅके वर्तमान देखील आहे आणि संवाद देखील आहे. तुमचा प्रत्येक प्रतिनिधी देशाची संस्कृती आणि सभ्यतेचा ध्वजवाहक आहे. हा ध्वज असाच फडकत राहिला पाहिजे, नित्य नव्या उर्जेने भरलेला पाहिजे, हीच शुभेच्छा व्यक्त करून माझे बोलणे पूर्ण करत आहे. या आयोजनाबद्दल पुन्हा एकदा सर्वांचे खूप खूप अभिनंदन. 

धन्यवाद !!!

 

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
India Eyes Rs 3 Lakh Crore Defence Production By 2025 After 174% Surge In 10 Years

Media Coverage

India Eyes Rs 3 Lakh Crore Defence Production By 2025 After 174% Surge In 10 Years
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 26 मार्च 2025
March 26, 2025

Empowering Every Indian: PM Modi's Self-Reliance Mission